Wednesday, April 19, 2023

मनपा गुरू डोंगरे साहेबांची भेट आणि सायकल निष्ठांची मांदियाळी

मनपा गुरू डोंगरे साहेबांची भेट आणि सायकल निष्ठांची मांदियाळी

 ठरविल्याप्रमाणे सायकल वरुन एका दमात कुंभार्ली घाट पादाक्रांत करून काल चिपळुणातून मुंबईकडे प्रस्थान केले...

वाटेत  महापालिका जल विभागाचे माझे गुरु श्री डोंगरे साहेब यांचा फोन आला... त्यांनी आठवण काढली होती... त्यांना सांगितले सायकलिंग करत उद्या सकाळी तुमच्या घरी येतो... मग निवांत गप्पा मारुया...

आज सकाळची सायकल रपेट सुरू झाली... वांद्रे लिंकींग रोड वरुन राईड करत असताना... एक सरदार सायकलिस्ट पापाजी ओव्हरटेक करून पुढे गेला... "एकसे भले दो" या नात्याने छोटी स्प्रिंट मारून पापाजीला गाठले... गप्पा सुरू झाल्या...

 अंगात घातलेल्या टीशर्ट बद्दल पापाजीने विचारले... एकट्याने, सेल्फ सपोर्ट "आदी कैलाश ओम पर्वत" सायकल वारी केल्याबद्दल तसेच सायकल वरुन भारत भ्रमंती बद्दल कळल्यावर... जुहू जवळ थांबवून आपल्या सर्व सायकलिस्ट मित्रांना बोलावले... सायकल भ्रमंतीचे काही किस्से सांगितल्यावर सर्व मित्रांच्या मनात सायकल टूरींग बद्दल जिज्ञासा निर्माण झाली ...   दहा मिनिटापूर्वी भेटलेले सर्व सायकलिस्ट माझे जिगरी दोस्त झाले होते... सरदारजी अंबरीर सिंग यानी फोन नंबर शेअर केला... तर सायकलिस्ट पटेल यानी MTB घेण्याचे नक्की केले... पुन्हा भेटण्याचे ठरवून सर्व मित्रांची रजा घेतली...

आता सुरू झाली राईड... अंधेरी चारबंगल्या जवळील डोंगरे साहेबांच्या घराकडे... बरोबर सकाळी आठ वाजता साहेबांच्या घरात आलो... झक्कास चहाने कडक स्वागत झाले आणि सुरू झाली गप्पांची मैफल... लडाख सायकल सफर... नर्मदा सायकल परिक्रमा... स्पिती व्हॅली सायकल वारी... मुंबई कन्याकुमारी... मुंबई दिल्ली... पंढरपुर पंजाब ईत्यादी सायकलिंगच्या सुरस कथांचा ओघ सुरू झाला...

लता वहिनी नर्मदा सायकल वारीच्या गोष्टी तल्लीन होऊन ऐकत होत्या... त्यांच्या मनात बसने नर्मदा परिक्रमा करण्याचे विचार घोळू लागले...

 "आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केले... आता स्वतःसाठी जगता आले पाहिजे"  हे म्हणणे वहिनींना तंतोतंत पटले... तसेच सायकलिंग करण्यासाठी डोंगरेना आडकाठी करणार्‍या वहिनी... त्यांनी सायकल घ्यावी यासाठी  तयार झाल्या... ओघाओघाने खुप दिवस सायकलसाठी मागे लागलेल्या नातू अथर्वला सुद्धा सायकल घेण्याचे नक्की झाले... 

सायकलिंगद्वारे करत असलेली निसर्ग भ्रमंती... खुप मोठ्या लोकांशी होणार्‍या भेटीगाठी... नितांत सुंदर आणि जीवनात आमूलाग्र बदल घडविणारे अनुभव...   सूनबाई अदिती आणि आजी शांताबाई मनःपूर्वक ऐकत होत्या... मुलगा नीलेशचे वर्क फ्रॉम होम चालू होते... त्याच्याशी सुद्धा बोलणे झाले...

आज एका सुखी आणि समाधानी कुटुंबाच्या संपर्कात आलो होतो... सायकलिंगचे आणि निसर्ग भ्रमंतीचे स्फुलिंग सर्व कुटुंबाच्या मनात रुजवीले होते... याचा खुप आनंद होत होता...

 ८६ वर्षाच्या डोंगरेंच्या सासू... आजी शांताबाईंच्या चेहर्‍यावरील सकारात्मक सुहास्य भाव एकदम भावले... त्यांना म्हणालो "तुमच्या शंभरीला फोटो काढायला येणार आहे... तसेच माझ्या शंभरीला तुम्ही आवर्जून यायचे आहे" या बोलण्यावर आजी खळखळून हसल्या... अजूनही खडानखडा वर्तमानपत्र वाचणार्‍यां आजींनी... ईमारतीच्या पटांगणात चालायला जाण्याचे कबूल केले...

हे सर्व कामकाज चालू असताना; मस्तपैकी चटपटीत पावभाजीवर ताव मारला... गप्पांच्या ओघात अदितीच्या फक्कड चहाची चव सुद्धा चाखली... आणखी एक पाव घेऊन... चहात बुडवून पाव खाल्ला... आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला...

 गप्पांमध्ये दोन तास कसे गेले कळलेच नाही... सर्वांचा निरोप घेऊन ईमारतीखाली उतरलो... ७८ वर्षाच्या डोंगरेंनी भन्नाट सायकलिंग केले... त्यांच्या चेहर्‍यावरचा सुखद भाव... आनंदी जीवनासाठी अनमोल ठेवा सापडल्याचे सांगत होते...

अदिती म्हणाली, "काका खुप खुप धन्यवाद... सर्व कुटुंबाला नवसंजीवनी दिल्याबद्दल" 

सर्वांचा निरोप घेऊन आनंद लहरीवर तरंगत अंधेरीच्या सोसायटीमध्ये गेलो...  पान दुकान चालविणारा भाडेकरू प्रमोद ऊर्फ छोटूला  भेटलो... बोरिवलीच्या एका पान दुकानात बरीच वर्ष काम करणार्‍या छोटूने दुकान भाड्याने घेऊन आलिशान पानाचे दुकान थाटले आहे... 

 मेहनतीने आणि सचोटीने काम करणार्‍या छोटूचा भविष्यकाळ अतिशय उज्वल आहे... याची जाणीव त्याच्याशी बोलताना जाणवली... एकदम कलात्मक पद्धतीने सजवलेले दोन मीठा पान छोटूने घरच्यांसाठी बांधुन दिले... नवीनच दुकान थाटलेल्या छोटूला शगून म्हणुन पैसे दिले... छोटूला सुद्धा पानाची डिलीव्हरी करायला सायकल हवी आहे... 

आज सकाळची विविध रंगांनी नटलेली ४८ किमीची सायकल राईड... क्वालिटी टाईमचे प्रतिक होती...  डोंगरे साहेबांच्या सर्व कुटुंबियांची भेट... नवीन सायकलिस्ट मित्रांची सोबत... आणि मोठा आवाका असलेला भाडेकरू छोटूची गाठ... ही माऊलीच्या उक्ती प्रमाणे प्रेमाच्या एका समान धाग्यात गुंफलेली मांदियाळीच होती... 

घराकडे परतताना आनंद चित्रपटातील डायलॉग आठवला... "बाबू मोशाय... जिंदगी बडी होनी चाहिये... लंबी नही".... त्याच धर्तीवर सायकल सखी हसली आणि तिच्या विचारांचे तरंग उमटले...

  "किती किलोमीटर सायकल चालवली... यापेक्षा किती लोकांना भेटलास... त्यांच्या मनात जगण्याचे... नवीन विचारांचे स्फुलिंग निर्माण केलेस... यालाच सुख म्हणतात ना !!! 

मंगल हो !!! 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे... 

Sunday, April 2, 2023

दौलत दादा कोंडकेंची... या कार्यक्रमाची अभिरुची संपन्न निवेदिका... व्यासंगी आणि मराठी भाषेच्या सौंदर्याची जाणकार... सूत्रसंचालिका गीता डांगे...

दौलत दादा कोंडकेंची... या कार्यक्रमाची अभिरुची संपन्न निवेदिका... व्यासंगी आणि मराठी भाषेच्या सौंदर्याची जाणकार... सूत्रसंचालिका गीता डांगे...

शाहीर दादा कोंडके यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्ताने मराठी भाषा पंधरवड्यात दौलत दादा कोंडकेंची हा युगुल गीतांचा बहारदार कार्यक्रम दिनांक १८ मार्च रोजी पार पडला. या कार्यक्रमाची संकल्पना, रचना आणि दिग्दर्शन मुंबई महापालिका कर्मचार्‍यांच्या सोगो संगीत संस्थेने केले होते. महापालिकेच्या आजीमाजी  ३२ गायक कलाकारांचा सहभाग या कार्यक्रमात होता. 

अतिशय अप्रतिम आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला... या कार्यक्रमामधील प्रत्येक युगुलगीत... कलाकार जोडीने सादर करताना दादा कोंडके आणि त्यांच्या चित्रपटातील नायिका यांचा पेहराव परिधान केल्यामुळे या कार्यक्रमाने एक वेगळीच उंची गाठली होती. 

या कार्यक्रमात प्रकर्षाने जाणवलेली आणि भावलेली एक गोष्ट म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन... 

सर्वसाधारणपणे गीतसंगीताच्या कार्यक्रमात प्रत्येक गाणे साडेतीन चार मिनिटांचे असते..  तसेच दोन गाण्यामध्ये  सूत्रसंचालकास  एक ते दीड मिनिटाची वेळ दिली जाते... परंतु  आजच्या या कार्यक्रमात सूत्रसंचालिकेने आयोजकांकडून दोन गाण्यामध्ये तीन मिनिटांचा वेळ मागून घेतला होता... सोगो आयोजकांनी पण ते मान्य केले होते... 

कार्यक्रम सुरू झाल्यावर दोन गाण्याच्या मधल्या वेळात सूत्रसंचालिकेने दादांचा जीवनपट उलगडायला सुरुवात केली... आणि जाणीव झाली की दादा कोंडकेंसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा जीवनपट इतक्या कमीवेळेत, अचूक अन् मोजक्या आणि आक्षेपविरहित शब्दांत मांडण्यासाठी  सूत्रसंचालिकेने प्रचंड अभ्यास केला आहे...

 युगुलगीताला साजेशा वाक्यरचनेतून गीतांबरोबरच, चित्रपटाचा अभ्यास... तसेच दादांचा जीवनपट उलगडून दाखविण्यासाठी सूत्रसंचालकाने भरपूर वाचन केलं आहे...  

अतिशय मार्मिक आणि दखलपात्र निवेदन करण्यासाठी भाषेवर तितकच प्रभुत्व असणं आवश्यक असते... ते पदोपदी निवेदिकेच्या शब्दांमधून जाणवत होते... त्यामुळे गाण्याबरोबरच दादांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकाधीक  बळावत होती.....

दादांचा जीवनपट उलगडून दाखविण्यासाठी सूत्रसंचालिकेने दादांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून गाण्याला अनुरूप आणि विषयाला साजेसे असे वेचक मुद्दे निवडून ते तारतम्यतेने आणि मनोवेधकपणे सादर केले होते... 

सूत्रसंचालिकेची जिज्ञासू वृत्ती आणि विषयाचा व्यासंग यामुळेच सूत्रसंचालनाची  कला अतिशय उत्तमपणे आत्मसात केल्याचे तिच्या निवेदनातून पदोपदी जाणवत होते...

 सूत्रसंचालिकेच्या या प्रशंसनीय कामगिरी मुळेच तिच्या कामाची दाखल घेऊन शाबासकी देण्यासाठी आणि दादांच्या चित्रपट जीवनासाठी हा पत्रप्रपंच आहे...

एकापाठोपाठ एक अशा सलग नऊ चित्रपटांचा रौप्य महोत्सव  साजरा करून गिनीज बूक मध्ये जागतिक विक्रमाची नोंद करणारे दादा... आपल्या विनोदाने सार्‍या महाराष्ट्राला हसवणारे दादा... आपल्या स्वतःच्या आयुष्यात कसे एकटा जीव सदाशिव होते... याचा प्रत्यय सर्व रसिक प्रेक्षकांना येत होता...

दादांनी आपल्या चित्रपटांतून तात्कालिक समाज आणि राजकारणातील  वैगुण्यांवर नेमके भाष्य केले होते...

द्व्यर्थी संवादफेकीचा बादशहा ...  विनोदाची मर्मभेदी जाण असणारा.. नेमक्या ठिकाणी पॉज घेऊन हशा घेणारा विनोदवीर... निर्माता... लेखक... दिग्दर्शक... गायक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले दादा वैयक्तिक जीवनात एकटा जीव सदाशिव होते...   याची जाणीव झाली... 

दादांच्या जीवनात घडलेला प्रत्येक प्रसंग अंतर्मुख करणारा होता... किंबहुना दादांची जीवन कहाणी ऐकताना हसू आणि आसू यांचे संमिश्र भाव  मनात येत होते... 

अतिशय भोळा भाबडा नायक... नायिकेला का भावतो... याचे समर्पक उत्तर प्रत्येक चित्रपटात आपल्याला मिळते... याच वैशिष्टयपूर्ण खासियतीमुळे ग्रामीण प्रेक्षकांबरोबर शहरी प्रेक्षकांना सुद्धा दादांचे चित्रपट पसंतीला उतरत.. 

त्यांच्या जीवन चरित्रपटातील ठळक वैशिष्ठ्यांचा आढावा सूत्रसंचालकाने प्रत्येक गाण्याच्या मध्ये घेतला होता... त्याची झलक खालील प्रमाणे... 

समाजातील  रुढी, परंपरा, बुवाबाजी यावर उपहासात्मक किंवा व्यंगात्मक चित्रण म्हणजे सटायर चित्रपटातून सादर करणे ह्यात दादांचा हातखंडा होता... त्यामुळे त्या काळातील प्रस्थापित बुवाबाबांचा रोष सुद्धा दादांनी ओढावून घेतला होता... 

शांताराम बापू आणि दादा कोंडके यांच्यातील चित्रपट शीतयुद्ध जगजाहीर होते... बापूंच्या असला नवरा नको ग बाई  या चित्रपटावर कडी म्हणून  ह्योच नवरा पाहिजे  ह्या  चित्रपटाचे नाव दादांनी जाहीर केले... त्यावेळी त्यांच्याकडे चित्रपटाचे कोणतेही कथानक सुद्धा नव्हते... पण प्रचंड जिगर मात्र होती... 

सेवादलाच्या सांस्कृतिक विभागात काम करताना सदानंद वर्दे, वसंत बापट, नाथ पै अशा नामवंत मंडळींच्या ओळखी झाल्या.. तसेच सेवादलाच्या कार्यक्रमात निळू फुले, राम नगरकर हे कलाकार दादा सोबत एकत्र आले... येथून त्यांची पथनाट्य कारकीर्द सुरू झाली... 

विच्छा मधील दादांचे काम पाहून चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांनी तांबडी माती या चित्रपटात दादांना काम दिले. हा चित्रपट अपयशी झाला. त्याचे खापर पत्रकारांनी दादांवर फोडले... परंतु पेंढारकरांनी ते अपयश आपल्या माथ्यावर घेतले आणि दादांना चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन वर्तमानपत्रात येणार्‍या बर्‍यावाईट बातम्यांकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला... 

वसंत सबनीस, दादा आणि भालजी यांनी सोंगाड्याचे पटकथा लेखन केले. या चित्रपटाचे   यश  तुझे असेल तर अपयश पूर्णतः माझे असेल आणि   हा चित्रपट अपयशी झाला तर संपूर्ण खर्च मी उचलेन असे भालजींनी दादाला आश्वासन दिले...  त्यामुळे साकार झाला दादांचा सोंगाड्या  चित्रपट... आणि तो तुफान यशस्वी झाला... शून्यातून विश्व निर्माण करण्याचे दादांचे प्रयत्न फळाला आले... विच्छा मधील माळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी आणि  काय ग सखू काय ग साखू ही दोन गाणी दादांनी सोंगाड्या मध्ये घेतली होती... 

चांगले कथानक असलेला  ये रे माझ्या मागल्या हा भालजींचा चित्रपट आपटला... त्यावर दादांनी रिमेक बनविला आली अंगावर...  हा चित्रपट सिल्वर ज्युबिली झाला. चांगल्या कथानकाबरोबर चित्रपटाचे शीर्षक आकर्षक आणि विनोदी असेल तर रसिक प्रेक्षक आपोआप खेचला जातो... याचे हे उत्तम उदाहरण आहे.. 

दादांचा सडेतोडपणा खालील प्रसंगात दिसतो...

 येऊ का घरात या चित्रपटात दादांनी उषा नाईक या अभिनेत्रीला नायिका म्हणुन घेतले होते... हसताना तिचा चेहरा रडवेला दिसतो... हे दादांच्या लक्षात आल्यावर... हसताना आपण कशा दिसतो याचे निरीक्षण करण्यास  तिला सांगितले... आणि नीट हसा असा सल्ला दिला... 

माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दादांच अतिशय सुंदर मैत्रीच नातं होत... बाळासाहेबांना कलेविषयी आणि कलाकारांबद्दल वाटणारा आदर... झटपट निर्णय घेण्याचा स्वभाव, स्पष्टवक्तेपणा यामुळे दादांना बाळासाहेबांबद्दल खूप आदर होता... दादांच्या चित्रपटातील एखादी गोष्ट आवडली नाही की बाळासाहेब ती परखडपणे सांगत... त्यामुळे दादा आपला चित्रपट सेन्सॉरला पाठविण्या अगोदर बाळासाहेबांना दाखवत असत... 

अनेक राजकारणी व्यक्तींसोबत सुद्धा दादांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते... तात्कालिक मुख्यमंत्री वसंत दादा पाटीलांच्या आग्रहाखातर पंतप्रधान इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमावर गंगाराम वीस कलमे हा चित्रपट दादांनी बनविला... पण चित्रपट प्रदर्शित होताना इंदिरा गांधीची राजवट जाऊन जनता दलाचे राज्य आले होते...

एकटा जीव सदाशिव मधील राणी नावाची बकरी दादां सोबत प्रसिद्ध पावली... तिला कॅडबरी खूप आवडायची... एका सीनमध्ये दादा वडिलांबरोबर जायला निघतात तेव्हा बकरी पळत येते आणि दादांचा सदरा धरते. राणीने सदरा पकडावा म्हणून दादांनी सदऱ्यात कॅडबरी लपविली होती... राणी बकरीच्या सदरा सीनला प्रेक्षक आवर्जून टाळ्या द्यायचे... या बकरीला दादांनी मरेपर्यंत सांभाळलं... 

चित्रपटातील नायिका  दादांसारख्या  बावळट, गबाळा, लांब नाडीवाली हाफपँट  घालणाऱ्या नायकावर का भाळते?  या बाबत पटकथाकार मुजूमदार यांच्याशी बराच खल व्हायचा... त्यामुळेच  प्रेक्षकांना पटेल असे कारण चित्रपटात असे... 

त्याकाळी रंगीत चित्रपट बनविण्यासाठी खुप खर्च यायचा... सकस कथानक, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, काटेकोर दिग्दर्शन तसेच गाणी आणि संगीत दमदार असेल तर कृष्णधवल चित्रपट सुद्धा पाहायला प्रेक्षक येतात... यावर दादांचा विश्वास होता... रंगीत चित्रपटापेक्षा कथानकात आणि कलाकाराच्या अभिनयात रंग असले की प्रेक्षकांना ते भावतात... असे दादा म्हणत... म्हणुनच पांडू हवालदार हा चित्रपट कृष्णधवल बनविला होता. 

दादांच्या बोट लावीन तेथे गुदगुल्या  या भरपुर हास्यमय पंचेस असलेल्या चित्रपटावर पत्रकारांनी कथा नसलेला चित्रपट अशी टीका केली होती... दादांचे म्हणणे होते की विनोदी चित्रपटात कथानक रंगवत नेले की पंचेस कमी होतात... त्यासाठी चार्ली चॅपलीनच्या चित्रपटाचे उदाहरण द्यायचे... 

सर्व लोकांना आपल्या द्व्यर्थी संवादाने खिळवून ठेवणारे दादा आपल्या कुटुंब सौख्याबाबत मात्र अपूर्णच राहिले... लग्नानंतर चौथ्या वर्षीच त्यांचा घटस्फोट झाला... त्यांचा पुतण्या विजय कोंडके यांनी  आर्थिक बाबीत दादांना अडचणीत आणले... विजय कोंडकेंच्या माहेरची साडी या चित्रपटाला तोडीस तोड असा  सासरचं धोतर हा चित्रपट दादांनी काढला... 

चित्रपटाच्या नावात द्व्यर्थी मिनींग नसलेला दादांचा सातवा चित्रपट बोट लावीन तिथ गुदगुल्या  हा होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर... पुण्यातील झाडून सर्व पत्रकारांनी दादांचा "सातवा मजला कोसळला" असं मोठ्या हेडिंग मध्ये वर्तमानपत्रात लिहिले होते... पण गुदगुल्या सुपरहिट झाला... पुण्याच्या एका चित्रपटगृहात तर तो पंच्याहत्तर आठवडे चालला... ह्या चित्रपटाच्या ज्युबिली समारंभात पत्रकारांना दादांनी आवर्जून बोलावले होते... आणि सांगितले "तुमच्या लिखाणाचा माझ्या चित्रपटावर काहीच परिणाम होत नाही"... "प्रेक्षक माझा आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे"... तुम्ही आणखी पेपर छापा... लहान मुलांना नक्कीच कामाला येतील... 

प्रत्येक माणसाने अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण केले तर यश आपोआपच येतं... दादांचे सुद्धा असंच होतं... त्यांचा कुठलाही गाजलेला चित्रपट काही काळानंतर त्यांनी पाहिल्यावर त्यांना वाटायच हा सीन जास्ती चांगला करू शकलो असतो... एखादा विनोदी प्रसंग थोड्या वेगळ्या पद्धतीने केला असता तर प्रेक्षकांचा आणखी हशा मिळवू शकलो असतो...  त्यामुळेच चित्रपट पूर्ण झाल्यावर सुद्धा नवनवे सीन दादा चित्रपटात टाकत असत.. 

शांताराम बापू आणि दादा यांच शीतयुद्ध असायचं... पिंजरा चित्रपटात बापूंनी दादांना खूप टोमणे मारले होते... त्यानंतर दादांनी एका चित्रपटात नायक गटारातून मोडका पिंजरा बाहेर घेऊन येताना दाखविला होता... 

परंतू दोघांना एकमेका बद्दल नितांत आदर होता... बापू दादांचे सर्व चित्रपट राजकमल स्टुडिओत प्रिंट मागवून पाहत असत... 

राजेश मुजूमदार आणि दादा पांडू हवालदार च्या निमित्ताने एकत्र आले. दादांनी एखादा पंच सांगितला की मुजुमदार पुढचा पंच तयार करायचे.. अशा प्रकारे कथानक तयार व्हायचे... 

राम कदम यांनी दादांच्या चित्रपटांना संगीत द्यायला नकार दिल्यावर... दादांना नव्या संगीतकाराची गरज होती...  एकॉर्डीयन प्लेअर लक्ष्मण पाटील आणि सुरेंद्र हेंद्रे यांनी कलातरंग ऑर्केस्ट्रा सुरू केला होता.. दादांनी त्यांना आपल्या काही गाण्यांना चाली करायला दिल्या... त्यांच्या चाली भावल्यामुळेच दादांनी त्यांना रामलक्ष्मण हे नाव दिले आणि पुढे रामलक्ष्मण यांनी दादांच्या चित्रपटांना संगीत दिले. 

*एकटा जीव* च्या यशानंतर शुल्लक कारणावरून दादांची जुनी टीम दादांना सोडून गेली... त्यामुळे  आंधळा मारतो डोळा या चित्रपटात दादा सोबत सर्व नवी मंडळी काम करत होती. हा सुद्धा चित्रपट ज्युबली झाला... याचे कारण म्हणजे दादा स्वतःच एक चित्रपट इंडस्ट्री होते... 

त्यांच्या चित्रपटात काम करण्याऱ्या नायिकांमुळे दादांना खुप अडचणींना सामोरे जावे लागले..  परंतु कितीही त्रास झाला, संकटे आली तरी दादा कधीच डगमगले नाहीत... 

 दादांचं सेन्सॉर बोर्डाशी असलेले हाडवैर जगजाहीर होतं.. सेन्सॉर बोर्डाने द्व्यर्थी संवादाबद्दल दादांना खूप त्रास दिला... पण दादा नमले नाहीत... ते आपला मुद्दा नेटाने मांडत... तुमच मन मलीन असल्यामुळे शब्दांचे अश्लील अर्थ तुम्ही लावता... पुढेपुढे तर सेन्सॉरशी वाद घालता यावा म्हणुन दादा मुद्दाम द्व्यर्थी संवाद टाकू लागले...
 
 दादा एक गोष्ट प्रांजळपणे मान्य करतात की सेन्सॉर बोर्डामुळे माझ्या चित्रपटांची खूप चर्चा व्हायची... त्यामुळेच चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळायची... म्हणूनच माझे चित्रपट तुफान चालल्याचे दादा कबूल करतात.... 

दादांना  शिकारीचा प्रचंड नाद होता... शिकारीसाठी जनावर शोधण्यात ते एव्हढे मग्न व्हायचे की सार जग विसरून जायचे... शिकारीला गेल्यावर ते खुप रिलॅक्स होत असत... त्यामुळे चित्रपटातील जास्तीत सीन, गाणी दादांनी जंगलात  लिहीली आहेत... 

शिकारीत असताना एखादा अचानक वळवाचा जोरदार पाऊस आला... म्हणुन सर्वजण एका झाडाखाली थांबले... पाऊस थांबल्यावर झाडातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांना पाहून तिथल्या तिथे एक गाणे तयार केले... ते म्हणजे अतिशय प्रसिद्ध झालेलं  ढगाला लागली कळ... पाणी थेंब थेंब गळ... हे गाण होय... दादांची कलासक्ती जंगलात बहरून यायची याचेच हे उदाहरण आहे... 

नववा ज्युबिली चित्रपट आली अंगावर  मुळे दादांचे खूप कौतुक झाले... सलग नऊ ज्युबिली चित्रपट म्हणुन जागतिक विक्रम झाला... पण दादांना आनंद वाटत नव्हता... त्यांनी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला... विच्छाच्या अफाट यशामुळे आता मिळणार्‍या यशाचे दादांना महत्त्व वाटत नव्हते... या मानसिक दोलायमान परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दादांनी खूप उपचार केले पण फारसा उपयोग झाला नाही... त्यांची निरीच्छ वृत्ती वाढत गेली... 

अमाप पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर, मानसन्मान मिळून सुद्धा दादा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात एकटा जीव  राहिले... 

पुढचा जन्म देवाकडे मागताना "मला पैसाअडका काहीही नको फक्त जिवाभावाची माणस दे" हेच दान मागितले... 

मित्रांनो... 

दादांचा हा सर्व जीवनपट उलगडून सांगितला सूत्रसंचालिका गीता डांगे यांनी... दादांचे आत्मचरित्र एकटा जीव सदाशिव तसेच इतर लेखकांनी सांगितलेल्या माहितीचे समग्र रसग्रहण करून गीता ताईंनी मेहनतीने संकलित केलेली माहिती रसिक प्रेक्षकांना  सादर केली... त्याबद्दल निवेदिकेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. 

खरं तर गीता ताईंनी लिहिलेलं दादांच्या जीवन चरित्राचे रसग्रहण कोणत्याही वर्तमानपत्रात दादांच्या आत्मचरित्राची समीक्षा म्हणुन सुद्धा प्रसिद्ध करता येईल... 

दादांचा माहितीपट उलगडताना गीता ताईंची संवादफेक, शब्दांतील चढउतार, देहबोली यातून दादा एकदम मनाला भिडले... त्यांच आत्मचरित्र वाचण्यासाठी मन अधीर झाले ... 

तसेच गीता ताईंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सुद्धा सविस्तर  मनोगत लिहावे ही उर्मी जागृत झाली... 

मंगल हो !!! 

सतीश जाधव 
9869560266

Thursday, February 23, 2023

सन्मान... एका छंदाचा...

सन्मान...  एका छंदाचा... 

माझ्या कार्यालयीन सहकारी सोनाली जोशींना नुकतीच प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली...

आपली माणसं जेव्हा वरीष्ठ पदावर पोहोचतात तेव्हा खुप आनंद होतो... आणि हाच आनंद साजरा करण्यासाठी जोशी बाईंना भेटायला मुलुंडस्थित महापालिकेच्या टी विभाग कार्यालयातील जल विभागात गेलो होतो...

आधी सांगितले असल्यामुळे जोशी बाई आतुरतेने वाट पाहत होत्या... बाईंची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी मंगल आशिर्वाद दिले...

  जल विभागातील सहाय्यक अभियंता श्री बोरसे साहेब यांची भेट झाली... त्यांनी रक्तदानाच्या आणि  सायकलिंग क्षेत्रातील माझ्या भरीव कामगिरी बाबत जल विभागातर्फे सन्मान सोहळा आयोजित केला होता.. हे तर माझ्यासाठी अनपेक्षित  होते... परंतु सर्व कार्यालयीन कर्मचारी, अधिकार्‍यांशी सुसंवाद करायला मिळणार म्हणुन आनंद झाला होता...

जोशी बाईंनी सर्वांना माझा परिचय करुन दिला... आता पर्यंत केलेले ११२ वेळा रक्तदान तसेच सायकलिंग करत एकट्याने आदि कैलास आणि ॐ पर्वत पादाक्रांत करून केलेल्या जागतिक विक्रमाची ओळख करून दिली... आणि कार्यालयातर्फे सुंदर भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ श्री बोरसे साहेबांच्या हस्ते देऊन सन्मान केला... 

श्री बोरसे साहेबानी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज आम्हा सर्वांना जाधवांनां ऐकायचे आहे... सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जपलेले छंद... याची ओळख करुन घ्यायची आहे... फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने जल देयकांच्या डिमांड रिकव्हरी साठी अतिशय निर्णायक आणि संवेदनाक्षम असतात... या दिवसात येणार्‍या ताणतणावाच्या वातावरणात  श्री जाधवांनां ऐकणे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असेल...

सर्वांशी सुसंवाद साधताना सांगितले की, मनपा मध्ये सेवा करत असताना कार्यबाहुल्यामुळे सतत ताणतणावाला सामोरे जावे लागते... आपल्या छंदांना मुरड घालावी लागते... तसेच आपल्या प्रकृतीकडे सुद्धा दुर्लक्ष होते... 

म्हणुनच  उत्स्फुर्तपणे जीवन जगायचे असेल आणि सतत नवचैतन्यमय राहायचे असेल तर आपले छंद जपा-जोपासा... वेळ काढून भ्रमंती करा... नवनवीन मित्र जोडा... 

"चरैवेती". म्हणजे संधी मिळेल तेव्हा भटकणे हे सतत उर्जावान ठेवण्याचे जीवनाचे सूत्र आहे... या फिरण्याच्या वेडापायीच सेवानिवृत्त झाल्यावर सायकलिंगला सुरुवात केली... आतापर्यंत भारत भ्रमंती करत बेचाळीस हजार किमी सायकलिंग केली आहे... तसेच एक जागतिक विक्रम नावावर आहे... या सायकलिंग मुळेच मित्र परिवार प्रचंड वाढला आहे तर मोठ्या मोठ्या लोकांच्या गाठी भेटी झाल्या आहेत... सायकलिंगमुळे भारताच्या विविध प्रांतातील लोकांचे जनजीवन अतिशय जवळून पाहता आले... लडाख सारख्या ठिकाणी  बर्फवृष्टीमुळे आठ महिने दळणवळण बंद असते... अशा ठिकाणी राहणार्‍या जनतेचे खडतर जीवन अनुभवता आले... त्यामुळेच  जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय विशाल झाला... कोणत्याही ताणतणावात न अडकता... आलेली कठीण परिस्थिती संधी म्हणुन स्वीकारत गेलो आणि एखाद्या झर्‍यासारखे  प्रवाही राहीलो... झाडासारखे दातृत्व स्वीकारले...

निसर्ग आपला सर्वात मोठा गुरु आहे... आपण जेव्हा मोटरसायकल, कार, रेल्वे ईत्यादीने फिरतो तेव्हा ग्रंथाची पान फडफडल्या सारखा निसर्ग पाहतो... परंतु सायकलने आपण निसर्गाच्या खूप जवळ जातो... त्यात रमतो आणि आपणच निसर्ग होऊन जातो... 

आपण समाजाचा एक घटक आहोत याची जाणीव होते आणि लोककल्याणासाठी आपले उत्तरदायित्व आहे हे ध्यानात येते... निरपेक्ष वृत्तीने समाजोन्नत्ती करण्यासाठी प्रेरित होतो...

 याचाच भाग म्हणून प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन भारत भ्रमंती चालू आहे... नर्मदा परिक्रमा करताना "नर्मदा स्वच्छता अभियान राबविले होते... लडाख मध्ये" प्रिजर्व लडाख... Don't liter Save Water" ही संकल्पना घेऊन फिरलो... तर स्पिती व्हॅली मध्ये "एक बुटा (झाडाचं रोपटं) बेटी के नाम" याचा प्राचार केला... 

सायकलिंग आपले प्रकृती स्वास्थ्य झकास तर ठेवतेच आणि ते एक प्रकारे मेडिटेशन सुद्धा आहे... त्यामुळे मनस्वास्थ्य सुद्धा उत्तम राहते... 

विद्यार्थ्यांना-तरुणांना सायकलिंग साठी उद्युक्त करणे आणि मोबाईल संस्कृती कडून निसर्ग संस्कृतीकडे वळविणे... हा उपक्रम सुरू आहे...
भारत भर सायकल संस्कृती वाढविणे आणि सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे हा प्रकल्प हाती घेतला आहे आणि त्यासाठी परमेश्वराकडून शंभर वर्षाचे आयुष्य मागून घेतले आहे... 

आपल्या उर्वरित काळात "पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा प्रकृती कशी आहे याचीच चौकशी केली जाते... या साठीच तुमच्या आवडीचे छंद जोपासा... तसेच सायकल चालवा... आणि हिट रहा फिट रहा... 

या सुसंवादामुळे बर्‍याच कर्मचारी अधिकारी यांनी माझा मोबाईल नंबर घेतला... 

शेवटी सर्वांना एकच सांगणे आहे... छंद जोपासा... हसत रहा... फिरत रहा... हीच जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे... 

मंगल हो !!! 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे 
९८६९५७०२६६





Sunday, February 19, 2023

११२ वे रक्तदान... छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं...

११२ वे रक्तदान... छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं... 


राजा शिवाजी माजी विद्यार्थी मैत्रेय प्रतिष्ठान तर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते...

या शिबिरात प्रमुख पाहुणा आणि रक्तदाता म्हणून बोलावण्यात आले होते. 

कार्यक्रमात सायकलपटू आणि रक्तदाता म्हणून राजा शिवाजी विद्यालयाच्या गुरूवर्य माजी मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया निमगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


विशेष म्हणजे माझ्या सायकलिंग उपक्रमाबद्दल माहिती  मिळाल्यानंतर सुप्रिया ताईंनी सायकलिंग सुरू करण्याचे मनोगत व्यक्त केले...

 ११२ व्या रक्तदाना नंतर गुरूवर्य रूपवते बाईंनी प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन गौरव केला...

या कार्यक्रमात बर्‍याच रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्याचे सौभाग्य मिळाले...  खरे तर राजा शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे हे स्नेह संमेलनच होते...


एका अतिशय स्तुत्य सामाजिक  उपक्रमाचा राजा शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रेरक पायंडा पाडला होता. 

मुंबईतील सर्व मित्र परिवार होताच... तसेच एक मित्र नाशिक वरुन तर एक मित्र अँमस्टरडॅम येथून आला होता... वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या सर्व मित्रांना या निमित्ताने भेटता आले... आणि खुप नविन मित्र मिळाले...

राजा शिवाजी विद्यालयाच्या १९९१ सालात पास आऊट झालेल्या विद्यार्थी समूहाने अतिशय बहारदार उपक्रम हाती घेऊन के ई एम् रक्तपेढीला ६७  रक्त पिशव्या मिळवून दिल्याबद्दल सर्वांना शतश प्रणाम...

मंगल हो !!!

 सतीश जाधव 

Monday, December 12, 2022

एक छोटीशी चूक... बेतू शकते जिवावर...

एक छोटीशी चूक...  बेतू शकते जिवावर... 

खरतर असे प्रसंग घडू नये म्हणून प्रत्येक सायकलिस्ट  खबरदारी घेत असतो...  परंतू अनवधानाने किंवा चुकीने... ती गोष्ट घडली... की मग त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो...

कालच १०० किमी ग्लोबल पगोडा सायकल राईड दरम्यान हा प्रसंग घडला... परंतू सायकलिंगचे सर्व सेफ्टी मेजर परिधान केले असल्यामुळे थोडक्यात बचावलो...

सकाळी अंबरीष गुरव, तुषार रेडकर आणि विजय कांबळे सोबत सेना भवन कडून सायकल राईड सुरू झाली...

दहिसर चेक नाक्यावर रघुनाथ घडशी भेटला...  घोडबंदर लुप मारण्याचे ठरविले होते...  


पण सकाळी अकरा  वाजता अंधेरीच्या सोसायटी मध्ये असणारी मीटिंग गाठणे सुद्धा आवश्यक होते... म्हणून मीरा भायंदर नाक्यावरून उत्तन मार्गे ग्लोबल पगोडा राईड करण्याचे ठरले...

बरोबर सकाळी पावणे नऊ वाजता ग्लोबल पगोडा येथे पोहोचलो... वाटेत महेश दाभोळकर आणि इतर सायकलिस्ट मित्रांची भेट झाली...

पगोडाचे बाहेरूनच दर्शन घेऊन मनोरीकडे कूच केले...  मनोरी मार्वे मढ आयलंड वर्सोवा करून अंधेरीला जायचे नक्की केले..

डोळ्याच्या नजरेत मनोरी बीच दिसू लागला... आणि मनोरीला केलेल्या धम्माल मस्तीचे जुने दिवस आठवले... मन प्रफुल्लित झाले... हवेत तरंगत समुद्र न्याहाळू लागले... त्या आनंदाच्या भरात तो लांबवर दिसणारा मनोरी  बीच सोबत सायकलिंग करत असलेल्या विजयला उजवा हात समुद्राकडे करून दाखवत होतो...

क्षणार्धात काय झाले कळलेच नाही... समोरच्या  स्पिड ब्रेकर वरुन सायकल धाडकन जमिनीवर कोसळली... पाय आणि खांदा सायकल खाली आला... डोके कचकन जमिनीवर आदळले... हात रस्त्यावर घसपटले... ट्रॅक पँट फाटली... 

भानावर यायला मिनिट भर लागले... तेव्हा लक्षात आले समोर पांढरे पट्टे न मारलेला स्पिड ब्रेकर दिसलाच नाही... सायकल हॅन्डल वरुन क्षणभर सोडलेला हात... जिवावर बेतणारा होता... परंतु डोक्यात चांगल्या प्रतीचे हेल्मेट... हातात ग्लोव्हज असल्यामुळे डोक्याला कोणतीही हेड इंज्युरी झाली नाही आणि पंजा सोलपटला नाही... पण गुढग्याच्या खाली पायाला बरेच खरचटले होते... खांदा दुखावला होता... तरी बरं... मागून कोणतेही मोठे वाहन नव्हते...

तुषारने पाणी दिले तर विजयने पुरणपोळी खायला दिली... जमिनीवर एव्हढ्या जोरात आपटलो होतो की उजवा पाय आणि खांदा बधिर झाला होता... तुषार आणि रघुनाथ थोडेसे घाबरलेले वाटले... पण विजय एकदम खंबीर होता... वाकडे झालेले हॅन्डल विजयने सरळ केले... चाक सुद्धा थोडे व्होबल झाले होते... ते पुढच्या सायकल दुकानात ठीकठाक करून राईड पूर्ण करण्याचे ठरविले...

पेडलींग सुरू केल्यावर लक्षात आले पाय आणि खांदा व्यवस्थित काम करतोय... कुठेही मेजर ईंज्युरी नाही... मार्वेला रघुनाथला टाटा केला तर वर्सोवा मेट्रो स्टेशन कडे विजय आणि तुषारला बाय बाय करून अंधेरी सोसायटीत मीटिंग अटेंड केली..

पेडलिंग करत मुंबईत आलो... लोअर परळला सायकल शॉपी मध्ये खुप गर्दी असल्यामुळे सखीला उद्या ठिकठाक करण्याचे ठरविले... रात्री शाळकरी मित्र नागेश सोपारकर याने वाशीला विष्णु दास भावे  नाट्यगृहात ठेवलेल्या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात सहभागी झालो...

तेथे स्टेज वर डान्स पण केला...

 त्यामुळे खात्री झाली... सकाळी झालेला अपघात फारसा गंभीर नाही... कोठेही फ्रॅक्चर नाही... अपघात हा अपघातानेच होतो... पण  बचावलो ते निव्वळ  सेफ्टी मेजर मुळेच... डोक्यात चांगल्या प्रतीचे हेल्मेट आणि हातात ग्लोव्हज नसते तर... कालच  हॉस्पिटल मध्ये बेशुद्धावस्थेत पोहोचलो असतो... पण तसे न घडल्यानेच १०० किमी राईड पुर्ण झाली होती... 

मित्रांनो... सर्वांना एकच सांगणे आहे... सायकल वरुन  हात एका क्षणांसाठी सोडल्यामुळे काय घडू शकते... याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे... म्हणूनच सर्व सेफ्टी मेजरसह सावधपणे सायकल चालवा... आणि मस्त एंजॉय करा... 

आज सखीची काळजी घ्यायची आहे तसेच पायाला आणि खांद्याला आराम द्यायचा आहे... 

मंगल हो... 


सतीश जाधव... 
मुक्त पाखरे 

Thursday, December 8, 2022

४२ हजार किमी सायकलिंग आणि १११ वे रक्तदान...

४२ हजार किमी सायकलिंग आणि  १११ वे रक्तदान...
दि. ८ डिसेंबर २०२२

पंढरपुर ते पंजाब (घुमान) ही सायकल वारी नुकतीच पुर्ण झाली होती... संत शिरोमणी श्री एकनाथ महाराज यांनी समता, शांतता आणि बंधुता हा मानव कल्याणाचा  विश्वसंदेश घेऊन भागवत धर्माच्या प्रचारासाठी संपूर्ण भारत भ्रमंती केली होती... त्यांच्या पदकमलाने पावन झालेल्या मार्गावरूनच सदरची सायकल वारी संपन्न झाली... 

याच सायकल वारीच्या अनुषंगाने ४२ हजार किमीचा सायकलिंग टप्पा लीलया पार झाला होता.. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सायकलिस्ट तसेच पालखी सोहळ्याचे सदस्य, पत्रकार, भजनी मंडळातील वारकरी, भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ आणि नामदेव समाजोन्नती परिषद असे जवळपास दीडशे वारकरी कायमचे मित्र झाले आहेत...


 पांडुरंगाच्या कृपेने सायकलिस्ट मंडळींची सेवा करण्याची सुद्धा संधी मिळाली... त्यासाठी या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री सूर्यकांत भिसे गुरुजी यांचा शतशः ऋणी आहे...

याची पुढील आवृत्ती म्हणजे.... महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहासष्टव्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त सुरक्षा रक्षक दल (पाणी खाते) यांनी आज भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते... या रक्तदान शिबिरात मुख्य अतिथी म्हणुन उपस्थित राहण्याची संधी माझे गायक मित्र श्री गणेश हेटगे यांच्यामुळे मिळाली... 

विशेष म्हणजे प्रमुख सुरक्षा अधिकारी श्री अजित तावडे साहेब यांनी  आतापर्यंत केलेल्या रक्तदान कामगिरी बद्दल माझा सन्मान केला.
 

तर विभागीय सुरक्षा अधिकारी श्री सुशील बडेकर यांच्या समवेत मला १११ वे रक्तदान करण्याचा योग लाभला...
 

तेथील सर्व कर्मचारी वृंदाबरोबर रक्तदानाच्या माहितीसाठी सुसंवाद करण्याची संधी मिळाली...

आता मला सांगा...  सुख म्हणजे नक्की काय असत... आपल जीवन इतरांच्या कामी यावे... यातच परम सुखाची परिसीमा आहे... हाच संदेश महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जीवनकार्यातून मिळतो...

या दोन्ही थोर व्यक्तिमत्वांना ४२ हजार किमी सायकलिंग आणि  १११ वे रक्तदान सादर समर्पण...

मंगल हो...

सतीश जाधव...
मुक्त पाखरे... 

Sunday, October 2, 2022

सायकल वरुन भारत भ्रमंतीला निघालेला अवलिया... दि. ०२.१०.२०२२

सायकल वरुन भारत भ्रमंतीला निघालेला अवलिया ... 
 दि.  ०२.१०.२०२२

बुलढाणा जिल्ह्यातील माझा परममित्र श्री संजय मयुरे (वय ६८ वर्ष) यांनी आज महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून  २० हजार किमी ची सायकल राईड मुंबईतील गेट वे ऑफ़ इंडिया येथून सुरू केली...

ते दररोज १०० किमी अंतर पार करणार आहेत...

 मुंबई पासून कोकणमार्गे कन्याकुमारी पुढे चेन्नई आणि कलकत्ता पर्यत त्याची सायकलवारी समुद्र किनाऱ्याने होणार आहे... पुढे आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मीझोराम, नागालँड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात मार्गे परत मुंबईला येणार आहेत.

 प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा संदेश  संपूर्ण भारतभर देणार आहेत... तसेच त्यांची ही सायकल वारी देशाच्या शूरवीर जवानांना समर्पित आहे...

कुटुंबीयांची विशेष करून सौ मयुरे वहिनींची भरभक्कम साथ असल्यामुळेच संजय सायकलने परदेशवाऱ्या तसेच भारत भ्रमंती करू शकला आहे... "जी ले अपनी जिंदगी" हाच संदेश  मयुरे वहिनी देत आहेत...
या प्रसंगी माननीय श्री बजरंग बनसोडे साहेब (NIA पोलीस आयुक्त) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले... 

माणसाच्या मनात आंतरिक सकारात्मक ऊर्जा असेल तर तो कोणत्याही वयात काहीही करू शकतो... त्याचेच मयुरे काका हे उदाहरण आहे. मयुरे काकांची २० हजार किमी भारतभूमीची सायकलवारी सर्वांसाठी आदर्श असेल.. यात प्रदूषणमुक्ती तसेच फिट इंडियाचा संदेश आहे... "काका तुम्ही असेच इतिहास रचत जावेत... त्या पाऊलखुणावर चालवण्याची ऊर्जा आम्हाला सतत मिळत राहील" ... 

माननीय बजरंग बनसोडे साहेब (NIA पोलीस आयुक्त) यांनी श्री संजय मयुरे यांच्या भारतभूमीच्या सायकल वारीला हिरवा झेंडा दाखविला... 

या कार्यक्रमाला बुलढाणा रॉयल रायडर्सचे सायकल प्रेमी  तसेच संजयचा मित्रपरिवार आणि कुटुंबिय आवर्जून उपस्थित होते. 


रिगल चित्रपट गृहा समोर असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला  संजयने अभिवादन केले... 

मुंबईतून सुरू केलेल्या या सायकल वारीला समरपयामी सायकल परिवारातर्फे श्री लक्ष्मण नवले यांनी शुभेच्छा दिल्या. 

आजची संजयची ग्रेटभेट अतिशय स्फूर्तिदायी होती... 

सतीश जाधव...
मुक्त पाखरे... 

Tuesday, September 20, 2022

भेटली माऊली माझी....भेटला विठ्ठल माझा...

भेटली माऊली माझी....भेटला विठ्ठल माझा... 

शारदाश्रम शाळेतील १९७४,  एसएससी बॅच च्या आम्ही सर्व मित्रांनी शाळेतील शिक्षकांना भेटण्याचे नक्की केले. 
तो योग जुळून आला मित्र शरद पाटीलच्या अथक प्रयत्नाने. पुण्याजवळील औंधला स्थाईक झालेल्या तळवळकर बाईना भेटण्याचे नक्की झाले. मित्र गृपवर सर्वांना मेसेज पाठवला. 

आज सकाळी  एका गाडीतून माझ्यासह विकास होशिंग, कुणाल ठाकूर, कैलास गौड तर दुसर्‍या गाडीतून दिनेश नाडकर्णी, शरद पाटील, नागेश सोपारकर आणि संजय कोळवणकर पुण्याकडे निघाले. माधव केळकर थेट बाईंच्या घरी येणार होता.  गाडीत गप्पांना बहर आला. 

खालापूर टोल नाक्याजवळील फूड मॉल मध्ये प्रभु गौर गोपाल दासजी महाराजांची भेट झाली. 


शाळेतील गुरूंना भेटायला निघालो असताना आध्यात्मिक गुरुजींची भेट व्हावी हा  शुभ शकुन होता. तळवळकर बाईंना फोन लावला आणि तासाभरात पोहोचतोय... याची वर्दी दिली. उडपी फूड मॉल मध्ये  बटाटा वडापाव आणि इडली वडा सांबार वर ताव मारला. फक्कड चहा पिऊन औंधला निघालो. 

घराच्या खिडकीत आमची वाट पहात बाई थांबल्या होत्या... बाईंनी दरवाजा उघडला... शुभ्र पेहराव आणि गोर्‍यापान चेहर्‍यावर आनंदमय तेज मनाला एकदम भावले... सर्वजण नतमस्तक झालो... अठ्ठेचाळीस वर्षानंतर बाईंची भेट झाली होती... नव्वदीतील हसतमुख तळवळकरबाई क्षणार्धात आम्हा सर्वांना शारदाश्रम शाळेच्या आठवणींच्या वर्गात देऊन गेल्या... 


प्रत्येकाने आपली ओळख करून दिली आणि बाईं बरोबर व्यतीत केलेल्या शाळेतील आठवणी शेअर केल्या.  या वयात सुद्धा बाई अतिशय खुष होत्या... सकारात्मकतेचे  तेजोमय वलय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवले... सर्वजण भारावून गेलो होतो... भरभरून बोलत होतो... 

आज आम्ही विद्यार्थी झालो होतो... आवर्जून शाळेचा युनिफॉर्म घालून बाईंच्या घरी आलो होतो... तुम्ही सर्वजण आठवणीने भेटायला आलात या बद्दल त्यांना खूप खूप आनंद झाला होता... बाईंच्या घरातले सात्विक वातावरण गुरुप्रेमाच्या उत्कटतेने भारून गेले होते... शाळेतील गप्पांना बहर आला होता. मुख्याध्यापक गवाणकर गुरुजींची आठवण निघाली. शाळेत केलेल्या गमतीजमती, खोड्या... गुरुजींचा खाल्लेला मार... प्रत्येकजण भरभरून सांगत होता... ते निखळ आनंदाचे दोन तास जीवनाचा अत्युच्च ठेवा झाले होते. 


बाईंचा निरोप घेताना त्यांना सांगितलं... तुमच्या शंभराव्या वाढदिवसाला आम्ही सर्वजण पुन्हा भेटायला येणार आहोत. आनंदाचा प्रचंड साठा मनात साठवून बाईंचा निरोप घेतला... 

खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत...  ज्यांनी आम्हाला घडविले... त्यांचे प्रेम पुन्हा मिळविण्याची संधी परमेश्वराने आम्हाला दिली... 

त्या गुरुंचरणी आणि ईश्वरचरणी भावांजाली... 

चुकलो जिथं मी...  तिथं  दाविली तू वाट... 

तुझामुळं उमगलो... मीच मला थेट... 

सुखदुःख एकमेकां वाटलं वाटलं... 

भेटली गुरुमाऊली माझी....भेटला विठ्ठल माझा... 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे...