Sunday, July 12, 2020

विपश्यना (भाग दोन)

कर्म सिद्धांत आणि विपश्यना
(संतोष कारखानीस यांच्या ब्लॉग वरून संकलित)


 भगवान गौतम बुद्धांनी या जीवनातील दु:खावर उपाय शोधताना अनेक प्रयोग केले. त्यातून तथागत भगवान बुध्दांना जे ज्ञान झाले त्यात कर्म सिद्धांताला  महत्व आहे. 

भगवान बुद्धांनी याला  'कर्म'  नाव न देता 'संस्कार' (पाली भाषेत 'संखर') असे नाव दिले.
 तथागतांनी  'भवचक्र' ('भव' म्हणजे 'असणे' 'भवचक्र' म्हणजे परत परत जन्म घेणे ) कसे चालते हे सांगताना या संस्कारांची किंवा कर्माची त्यामागे  काय भूमिका असते हे स्पष्ट केले आहे. 
 भगवान बुद्धांचा आग्रह प्रत्यक्ष अनुभूतीवर होता.
 ही अनुभूती मिळविण्यासाठी आणि त्याद्वारे दु:खातून आणि भवचक्रातून सुटका होण्यासाठी बुद्धांनी  विपश्यना (विपस्सना) ध्यानाचा मार्ग सांगितला आहे. विपश्यनेत प्रगती केल्यावर  संस्कार (कर्म) साठविण्याची प्रवृत्ती, तिचा जीवनावर होणारा  परिणाम याची स्पष्ट अनुभूती होते.

विपश्यना ह्या विद्येचे पुनरुज्जीवन भगवान गौतम बुद्धांनी केलं आणि ह्या विद्येच्या मार्गाने जाऊन निर्वाण अवस्था प्राप्त केली.

बुद्धांनी सांगितलेला सिद्धांत अगदी सरळ, सोपा आहे.

आपल्या पाच इंद्रियांना आणि मनाला बाह्य गोष्टीचा स्पर्श होतो. उदा, डोळ्याला काहीतरी दिसते, त्वचेला स्पर्श होतो, कानावर आवाज पडतो, जिभेवर चवीची जाणीव होते, नाकाला वास येतो, मनात विचार येतात. आपली  इंद्रिये ही केवळ ती संवेदना ग्रहण करण्याचे काम करतात.

ही संवेदना  मेंदूपर्यंत पोचल्यावर मेंदूचा एक हिस्सा जागृत होतो आणि त्या संवेदनेचे विश्लेषण करतो. आपल्या पूर्व-स्मृतीतून अशी संवेदना या पूर्वी कधी झाली होती काय हे आठवतो.


ही आठवण झाल्यावर मेंदूचा दुसरा हिस्सा काम करू लागतो आणि ही पूर्वी संवेदना सुखद होती का दु:खद याची चाचपणी करतो. 

यावेळी पूर्वीचे संस्कार (कर्मे) जागृत होतात आणि वेगाने मनाच्या पृष्ठभागावर येऊ लागतात. हे संस्कार सुखद असतील तर संपूर्ण शरीरावर सुखद तरंग अनुभवास येतात, दु:खद असेल तर दु:खद तरंग अनुभवास येतात. सुखद तरंग सुद्धा काही काळच टिकतात. तसेच सुखद तरंगांच्या इच्छेमुळे परत दु:खच वाट्याला येते.

हे संस्कार शरीरावर प्रकट झाल्यावर आपण अनवधानाने प्रतिक्रिया देतो. हे संस्कार आपल्या अंध प्रतिक्रियेमुळे वृद्धिंगत होतात, त्यांना बळ मिळते आणि ते परत अंतर्मनात खोलवर जातात. पुन्हा संधी मिळताच ते उफाळून वर येतात. परंतु प्रतिक्रिया न दिल्यास त्यांची उर्जा संपते (निर्जरा होते) आणि ते नष्ट होतात.

हे संस्कार देहाच्या (रूपस्कंद) पुढील क्षणाला सतत जन्म देतात आणि आपल्याला देहाचे सातत्यीकरण जाणवते.

माणसाच्या मृत्युच्या क्षणी यातील एखादा संस्कार (इच्छा) डोके वर काढते आणि हे संस्कारांचे (पूर्वसंचीत कर्मांचे ) गाठोडे नवीन  शरीराला (रूपस्कंद) जाऊन चिकटते आणि नवा जन्म मिळतो. यालाच भवचक्र म्हणतात.  हा मृत्युच्या क्षणी जागा झालेला संस्कार आपले पुढील आयुष्य ठरवितो.

विपश्यनेत ध्यानात खोलवर गेल्यावर हे पूर्वसंस्कार जागृत कसे होतात आणि आपण नकळत त्याला प्रतिक्रिया करून त्यांचे सामर्थ्य कसे वाढवितो हे स्पष्ट जाणवते. संस्कार जागृत झाल्यावर त्याला प्रतिक्रिया न करणे आपल्या हातात असते. त्यामुळे पूर्वसंस्कार (कर्मे) निर्जरा होऊन नष्ट होतात आणि मानसिक शांतता अनुभवास येते. 

हा वैयक्तिक अनुभव असल्याने त्याचे सामाजीकरण होऊ शकत नाही.

सुखद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पुण्यकर्म म्हणता येईल तर दु:खद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पापकर्म म्हणता येईल. पुण्यकर्म आणि पापकर्म हे एकमेकांना Cancel करीत नाहीत.

 पुण्यकर्म आणि पापकर्म यांना पांढऱ्या आणि काळ्या दगडांची उपमा देता येईल. माणूस या पुण्यकर्म आणि पापकर्म या दगडांनी भरलेली झोळी घेऊन फिरत असतो. काळ्या आणि पांढऱ्या दोन्ही प्रकारच्या दगडांना वजन असते आणि ते नेताना तो माणूस थकून जातो.

विपश्यना ध्यान हे संस्कारांना प्रतिक्रिया न देण्याची प्रक्रिया आहे. त्याचा कोठल्याही देवाशी, परमेश्वराशी संबंध नाही. 

 संस्कार जागृत होतात तेव्हा सावध राहून प्रतिक्रिया न दिल्यास अंतर्मनात दडलेले (अनुशय) संस्कार वेगाने बाह्यमनावर येतात आणि प्रतिक्रिया न दिल्याने त्यांची निर्जरा होते.

ज्यावेळी सर्व कर्मसंस्कार शून्य होतात तेव्हा माणूस कैवल्यावस्थेत / मुक्तावस्थेत / निर्वाण अवस्थेत पोहोचतो. 

तसेच कोठलेही काम करताना मनाच्या समतोल अवस्थेत असलो म्हणजेच,  चांगले/वाईट, हर्ष/दु:ख याच्या पलीकडे जाऊन मन समतोल असेल तर नवी कर्मे निर्माण होत नाहीत. 
विपश्यना ध्यानाच्या सहाय्याने अशा समतोल अवस्थेपर्यंत पोचता येते.
कर्माचा अर्थ बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अनुभवातून समजण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. 

विपश्यनेच्या नियमित साधनेद्वारे स्थितप्रज्ञ अवस्थेत पोहचून, आत्मिक समाधान, शांती प्राप्त करता येते.


सतीश विष्णू जाधव

Saturday, July 11, 2020

भयसापळा आणि मोहसापळा

 भयसापळा आणि मोहसापळा
(संतोष कारखानीस यांच्या ब्लॉग वरून संकलित)

         आपण नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट उलगडा करणारा एक दृष्टांत संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला आहे.


    पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपट आकर्षित होईल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. 
    
जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते.

 खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो.  पण हे "ज्ञान‘ त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेल्या अवस्थेत  राहतो व पकडणाऱ्याच्या हाती सापडतो.  याला  भयसापळा  असे म्हणता येईल.
 "जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते"  व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे.
 "हा आधार गेला तर," अशी भीती असते तेव्हा जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. 
पडायची शक्‍यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही!

----------------------------------------------------------------------------------------

           माकडे पकडायची देखील एक खास पद्धत आहे.

 एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्‍यात एक फळ असते.  माकड ते फळ काढण्यासाठी मडक्‍यात हात घालते. मडक्‍याचे तोंड हे अगदी नेमक्‍या आकाराचे बनविलेले असते;  असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल. पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकतो.

  माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हातही मडक्याबाहेर काढता येत नाही.  निर्णय न घेता येण्याच्या या  अवस्थेत माकड मनाने अडकते व   शरीराने मडक्‍यापाशी.
  
 या सापळ्याला  मोहसापळा असे म्हणता येईल.
 आपले ज्या परिस्थितीत "माकड‘ झाले असेल, त्यात असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये.

 हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा !

थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? 

निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग" नक्कीच मुक्तिदायक नाही काय?

----------------------------------------------------------------------------------------

एक जण कमरेइतक्या पाण्याच्या हौदात  उतरून बराच थयथयाट करतोय.  हातांनी पाणी खळबळवतोय. या हौदानं माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून मी संतापलोय.

 "अरे तू शांत हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ दिसेल व वस्तूही सापडेल !" कोणीतरी समजावत आहे. पण तो  ऐकूनच घ्यायला तयार नाही.

"हौदाचा तळ रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ होता,  हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर तो पाणी फेसाळलेलं ठेवत नसेल?"

---------------------------------------------------------------------------------------

"दमलास?  चल परत जाऊ.

 आज इतकं पुरे. पुन्हा कधीतरी जाता येईलच.

"नाही गुरुजी...  मी दमलोय;  पण आपण इतके वर आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच !  कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय, असं झालंय मला.‘‘

"माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत, जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते सत्य सांगेन‘ असं म्हणालो होतो.‘‘

"होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे...‘‘

"कितीही वर आलो असू !  तरी मी सांगतो म्हणून, हे सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस का नाही ?‘‘

"ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर परत जाऊ या.‘‘

""शाबास ! आता मी तुला ते सत्य सांगतो‘‘.

""पण शिखर न येताच ?‘‘

""तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून !

 ते सत्य हे आहे...  की शिखर असं नाहीच. ही अंतहीन चढण आहे आणि ज्या तळापासून आपण निघालो ना, तेच खरं पोहोचण्याचं स्थान होतं !  
तू उत्तीर्ण झालास. चल आता तिथं जाऊ, जिथं आपण असतोच; फक्त "पोहोचलो" असं वाटत नसतं इतकंच !

----------------------------------------------------------------------------------------

पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा...

माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं...

थयथयाट करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा...

चढणाऱ्यानं एकदा तरी शिखराचा हट्ट सोडून पाहावा...

 हे जमायला अवघड नसतं. पटायला अवघड असतं.

भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.

----------------------------------------------------------------------------------------

माकडें मुठीं धरिलें फुटाणे । 

गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥

काय तो तयाचा लेखावा अन्याय ।

हित नेणे काय आपुलें तें   ॥ध्रु.॥ 


शुकें निळकेशीं गोवियेले पाय । 

विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥


तुका म्हणे एक ऐसे पशुजीव ।

न चले उपाव कांही तेथें ॥३॥ 


वरील तुकोबांच्या गाथेतील अभंगात,  मानवी मनाचे अत्यंत मार्मिक विश्लेषण दिले आहे.

जय जय रामकृष्ण हरी

सतीश जाधव

Thursday, July 9, 2020

गुरू

*गुरू*
(व्हाट्स अँप वरून साभार)

तो धिटाईने वृद्ध गुरु समोर उभा होता. गुरु अनुभवी नजरेने त्याचे निरीक्षण करत होते.
कोवळं वय, असेल साधारण नऊ-दहा वर्षाचा. त्याला डावा हातच नव्हता. एका अपघाताने तो हिरावून घेतला होता म्हणे.

 तुला माझ्या कडून काय हवे आहे?"  गुरूने त्या मुलाला विचारले.

"सर, मला तुमच्या कडून ज्युडो-कराटेची विद्या शिकायची आहे !"

शरीराला एक हातच नाही आणि ज्युडो शिकायचं आहे? अजब मुलगा दिसतोय.
"कशाला?"

"शाळेत मला मुलं त्रास देतात. थोटक्या म्हणून चिडवतात.  मोठी माणस नको तितकी कीव करतात. 

त्यांच्या या वागण्याचा त्रास होतो !  मला माझ्या हिमतीवर जगायचंय !  कोणाची दया नको. हात नसताना मला माझं रक्षण करता आलं पाहिजे !"

"ठीक !  पण मी आता तो  'शिक्षण' देणारा गुरु राहिलो नाही. मी आता वृद्ध झालोय आणि आत्मचिंतनात मग्न असतो. तुला माझ्याकडे कोणी पाठवलं ?"

"सर, मला एक हात नसल्याने खूप जणांनी  'विद्यार्थी' म्हणून नाकारलं. त्यातल्याच एकाने तुमचे नाव सांगितले. "तुला फक्त तेच शिकवू शकतील, कारण त्यांना खूप वेळ असतो आणि त्यांच्याकडे एकही विद्यार्थी नाही!" असे ते म्हणाले होते.

'तो उन्मत्त शिक्षक' कोण हे गुरूंनी तात्काळ ताडले. अश्या अहंकारी माणसांमुळेच ही विद्या गुंड प्रवृत्तीच्या हाती गेली, याचे त्यांना नेहमीच वाईट वाटे.

ठीक आहे !  आज पासून तुला मी माझा 'शिष्य' करून घेत आहे.  या शिष्यत्वाचे नियम तुला आज पहिल्यांदा आणि शेवटचे सांगतो.  लक्षात ठेव !  आपल्या गुरूवर पूर्ण विश्वास ठेवायचा.  मी माझ्या लहरी प्रमाणे शिकवीन ते शिकून घ्यायचे.

 ज्युडो-कराटे ही खूप घातक विद्या आहे. तिच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो !  म्हणून ही विद्या फक्त आत्मरक्षणासाठीच वापरायची. नेहमी नम्र रहायचे. समजले ?"
"हो सर, समजले. मी आपल्या या आज्ञांचे पालन करीन."   मुलाने गुरूच्या पायावर डोके ठेवले.
आपल्या एकुलत्या एक शिष्याच्या शिक्षणास गुरूंनी आरंभ केला.

एकच डाव गुरूंनी त्याला शिकवला आणि तोच  तोच डाव त्याच्याकडून सराव करून घेऊ लागले. सहा महिने हेच चालू राहिले. एक दिवशी मुलाने गुरूचा चांगला मूड बघून हळूच विषय काढला.

"सर, सहा महिने झालेत. एकच डाव तुम्ही माझ्या कडून करून घेत आहात. नवीन डाव असतीलच ना?"

"आहेत ! अनंत डाव आहेत !  ते आत्मसात करायला, तुला तुझं आयुष्य कमी पडेल !  पण तुला मी शिकवतो आहे त्याचीच गरज आहे  आणि इतकेच तुझ्यासाठी पुरेसे पण आहे !"

गुरुवचनावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला.

  ०००००००


बऱ्याच  दिवसानंतर ज्युडोचे सामने जाहीर झाले. गुरूंनी आपला एकमेव शिष्य यात उतरवला.

पहिले दोन सामने त्या शिष्याने सहज जिंकले !

पहाणारे आश्चर्यचकित झाले. एक हात नसलेला मुलगा जिंकलाच कसा ?  कोण गुरु असावा ?

तिसरा सामना थोडासा कठीण होता, पण त्या मुलाच्या  सफाईदार आणि वेगवान हालचालींनी तो ही सामना त्यानेच जिंकला !

आता त्या मुलाचा आत्मविश्वास बळावला. आपणही जिंकू शकतो, ही भावना त्याला बळ देत होती.
बघता बघता तो अंतिम सामन्यात पोहोचला.

ज्या शिक्षकाने, त्या मुलास म्हाताऱ्या गुरुंकडे पाठवले होते, त्या अहंकारी माणसाचा शिष्यच, त्या मुलाचा अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी होता !

प्रतिस्पर्धी त्या मुलाच्या मानाने खूपच बलवान होता. वयाने, शक्तीने, अनुभवाने सरस होता. या कोवळ्या वयाच्या पोराला तो सहज धूळ चारणार  हे स्पष्ट दिसत होते.

 पंचांनी एकत्र येऊन विचार केला.
"हा सामना घेणे आम्हास उचित वाटत नाही. कारण प्रतिस्पर्धी विजोड आहेत. एक बलवान आणि एक दिव्यांग आहे. हा सामना मानवतेच्या आणि समानतेच्या दृष्टिकोनातून आम्ही थांबवू इच्छितो.

 " प्रथम विजेतेपद विभागून देण्यात येईल !  अर्थात दोन्ही प्रतिस्पर्धी यास तयार असतील तरच."  मुख्य पंचाने आपला निर्णय जाहीर केला.

"मी या चिरगुट पोरापेक्षा श्रेष्ठ आहे यात दुमत असण्याचे कारण नाही.  हे सगळ्यांना स्पष्ट दिसतच आहे. तेव्हा मला विजेता आणि या पोराला उपविजेता म्हणून घोषित करावे!"  तो प्रतिस्पर्धी उग्रपणे म्हणाला.

"मी लहान असेन. तरी मला हे  लढाई न करता दिलेले  जेतेपद नको आहे !  माझ्या गुरूंनी प्रामाणिकपणे लढण्याचे शिक्षण दिलेले आहे.  मी ठरलेला सामना खेळून जे माझ्या हक्काचे जेतेपद आहे ते स्वीकारीन !"
त्या लढवय्या मुलाचे उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

जाणकारांच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या. कारण हे ओढवून घेतलेले संकट होते. थोडे कमी जास्त झाले तर?  आधी एक हात नाही, अजून एखादा अवयव गमावला जायचा !  मूर्ख मुलगा !
सामना सुरु झाला.

--- आणि सगळी मंडळी आश्चर्याने स्तिमित झाली. त्या एका अनमोल क्षणी त्या अपंग मुलाची जीवघेणी थ्रो केलेली किक, त्या बलवान प्रतिस्पर्ध्याला चुकवता आली नाही. तो रिंगणाबाहेर फेकला गेला.

परफेक्ट थ्रो, परफेक्ट टाईमिंग, नेमका लावलेला फोर्स! अप्रतिम! केवळ अप्रतिम!

 ०००० ०००० ०००० ०००० ०००० ०००० ००००
                                                                                                                                               
गुरुगृही पोहचल्यावर, त्या मुलाने आपल्या उजव्या हातातली विजयाची ट्रॉफी गुरुजींच्या पायाशी ठेवली. त्यांच्या पायावर डोके ठेवून  गुरुजींबद्दल  आपली परमपूज्य भावना व्यक्त केली.

"सर, एक शंका आहे. विचारू?"
"विचार."
"मला फक्त एकच डाव / मूव्ह येते. तरीही मी कसा जिंकलो ?"

"तू दोन गोष्टी मुळे जिंकलास!"
"कोणत्या  सर?"
"एक तू घोटून, न कंटाळता केलेला सराव ! त्यामुळे तुझा तो डाव 'सिद्ध' झाला आहे, आत्मसात झाला आहे ! त्यात चूक होणे अशक्य होते !"

"आणि दुसरे कारण ?"

"दुसरे कारण हे,  त्याहून महत्वाचे आहे.

प्रत्येक डावाला एक प्रतिडाव असतो ! तसाच या डावाचाही एक उतारा डाव आहे !"

"मग तो, माझ्या अनुभवी प्रतिस्पर्ध्यास  माहीत नव्हता का ?"

"तो त्याला माहित होता ! पण तो हतबल झाला.

 कारण -----कारण या प्रतिडावात, हल्ला करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचा डावा हात धरावा लागतो !"

आता तुम्हांला समजले असेल की, एक सामान्य, डावा हात नसलेला मुलगा कसा जिंकला ?

oooo  oooo  oooo  oooo oooo

ज्या गोष्टीला आपण आपली कमजोरी समजतो, तिलाच जो आपली शक्ती बनवून जगायला शिकवतो, विजयी व्हायला शिकवतो, तोच खरा गुरु !

आतून आपण कोठे ना कोठे 'दिव्यांग' असतो,  कमजोर असतो.

त्यावर मात करून जगण्याची कला शिकवणारा 'गुरु' हवा आहे.

आहे का तुमच्या पहाण्यात असा कोणी ?

सतीश जाधव

Wednesday, July 8, 2020

उपनिषद

उपनिषद
(ज्ञानसाधना पुस्तकालय आणि संतोष कारखानीस यांच्या ब्लॉग मधून संकलित)


 वेदांची मांडणी तीन भागात करता येते.

कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. 

वेदांच्या ज्ञानकांडाचे नाव 'उपनिषद' आहे.

एकूण एकशेबारा उपनिषदे प्रसिद्ध आहेत. 

उपनिषदांत अत्यंत थोड्या शब्दात जीवनाचे सार सांगितले आहे.

ईश्वराचे स्वरूप आनंदमय आहे. हा जीव मुळात ईश्वर असल्याने त्याची सर्व धडपड आनंद मिळविण्यासाठीच असते. 

 हा आनंद अंतर्यामी शोधता येतो. माणसाला  आनंदमय स्वरूपाचा शोध आणि बोध उपनिषदांमुळे होतो.


****************************************************************************


उपनिषद् हे मानसशास्त्राची भाषा बोलतात !

उपनिषद् हे आजच्या काळात सुखी जीवनाचा मूलमंत्र देतात ! 
चिंता मुक्त जीवनासाठी सहाय्यक ठरतात !

समुपदेशक आहेत आपली उपनिषदे ! 

आपण उपनिषदांत सांगितलेली खालील प्रार्थना नेहमी करतो.

ॐ असतो मा सद्गमय ||.

तमसो मा ज्योतिर्गमय ||.

मृत्योर्मा अमृतं गमय ||.

ॐशांति: शांति: शांति: ||.

अर्थात:

 हे ईश्वरा आम्हास;
असत्याकडून सत्याकडे, 

अंधारकडून प्रकाशाकडे, 

मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जा...

ही प्रार्थना केवळ अध्यात्मिक नसून 

psychological   principal आहेत.

मनाला नकाराकडून होकाराकडे, 

निराशेतून आशेकडे, 

दुःखातून सुखाकडे घेऊन जाण्याची एक
मानसोपचार पद्धती आहे.


******************************

छांदोग्य उपनिषदातील एका श्लोकात 

मोठ्या मनाचा व्हावे...

तापणाऱ्या सूर्याची निंदा करु नये...

बरसणाऱ्या मेघाची निंदा करू नये...

ऋतूची निंदा करू नये...

पशूची निंदा करू नये...

लोकांची निंदा करू नये...

मीच सर्व आहे अशी उपासना करावी...
असे सांगितले आहे.  याचाच अर्थ  सारखी तक्रार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करावेत, हा आहे.


***********************************************************************


*आपल्याला प्रसन्न व्यक्तिमत्वाची माणसं आवडतात.*

 आपण रडक्या लोकांना, सारखी तक्रार करणाऱ्यांना  टाळू लागतो कारण त्यांचा परिणाम आपल्यावर ही होत असतो.

*प्रसन्न व्यक्तिमत्वाचे धनी असलेले मित्र हवेहवेसे वाटतात ....*

मानवी मनावर एक अस्पष्ट रुपात चिंता, भिती आणि निराशेचे सावट पसरले आहे, हे आपण सर्वत्र पाहतो.

मनाला प्रफुल्लित करण्यासाठी उपनिषदात सांगितलेल्या गोष्टी आणि प्रार्थना अतिशय प्रभावी आहेत, याची जाणीव होते.
  
 मानसिक थकवा घालव्यासाठी उपनिषद् हे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक साधन आहे.
  
बोटभर दिसणाऱ्या रुईची/मंदार  झाडाची शेंग उघडते,  त्यामधून दुरडीभर म्हाताऱ्या उडत जातात. दिसायला अतिशय लहान दिसणाऱ्या या शेंगेत जसा मोठा साठा असतो तसेच उपनिषदात कमी शब्दामध्ये जीवनाचे संगीत आणि तत्वज्ञान ठासून भरलेले आहे. जसजसे उकलत जावे तसतसे त्याचा आकार वाढत जातो.

अत्तराच्या बाटलीचे तोंड उघडे करताच परिसर दरवळून निघतो तसा या उपनिषदांचा प्रभाव होतो. थेंबभर अत्तर वातावरण सुगंधी करते.  

तसेच आहे हे उपनिषद् ! 

अतिशय कमी शब्दांमध्ये जीवनाचे रहस्य व्यक्त करतात.

उपनिषद ही भारतीय तत्त्वज्ञानाचा व संस्कृतीचा मुळ स्त्रोत आहेत. 

श्रीमद्भगवद्गीता हा महान ग्रंथ या उपनिषदांचा सार आहे !


*************************************************

उपनिषदांमध्ये "दिव्य बालक नचिकेत" याची एक गोष्ट आहे.

पिता प्रसिद्धीसाठी महायज्ञ करतो पण दान स्वरूपात मरतुकड्या आणि भाकड गायींचे दान करतो. 

पुत्र नचिकेत यावर लोभी पित्याला प्रश्न करतो...

 चांगल्या दानाची, श्रेष्ठ दानाची अपेक्षा धरतो.

लोभी  चिडलेला पिता म्हणतो, "तूच त्या योग्य आहेस. जा मी तुझेच यमदेवाला दान केले आहे." 

 हा नचिकेत सदेह यमाकडे पोहोचतो. वेळेच्या आधी आणि सदेह स्वतः होऊन आलेल्या नचिकेतला पाहून यमदेव आश्चर्यचकित होतात. त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वरदान मागण्यासाठी आग्रह धरतात. नचिकेत मात्र केवळ आत्मज्ञान मागतो !
स्वतःहून सदेह यमाकडे गेलेला बाल नचिकेत ! 

यम हे नाव घेताच माणूस थरारुन जातो, घाबरून जातो. 

नचिकेत जगातील सारे ऐश्वर्य, सुख-समृद्धी, राज्य, वैभव न मागता केवळ आत्मज्ञान मागतो !  

जे आत्मज्ञान माणसाला परमसुख मिळून देणारे आहे ! 

ते आत्मज्ञान यमदेव  त्याला सहज देत नाहीत !

त्याच्यासाठी त्याच्या परीक्षा घेतल्या जातात. 
त्याला प्रलोभने दिली जातात.

पण हा बाल नचिकेत मात्र केवळ आत्मज्ञानासाठी अडून बसतो ! 

मरणाला जिंकणाऱ्या नचिकेताची गोष्ट  कठोपनिषदामध्ये सांगितली आहे.


********************************************************

ॐ सहनाववतु ।

सहनौभुनक्तु ।

सहवीर्यं करवावहै ।

तेजस्विना वधीतमस्तु मां विद्विषावहै ।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

ही प्रार्थना आपण नेहमी म्हणतो. हा शांतीपाठ उपनिषदामधील आहे... जो आपणा सर्वांना परिचित आहे.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत, पण त्यांचा प्रत्यक्ष उगम किंवा मूळ स्रोत  माहीत नसतो.
सध्याच्या काळात वाढलेल्या चिंता आणि धावपळ पाहता मनःशांतीची सर्वांना आवश्यकता आहे. 

*त्यामुळे ही उपनिषदे मनन करावीत, अशी माझी विनंती आहे.*

|| शुभम भवतू || 

 ||  ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


सतीश जाधव

कलावती आईंच्या ग्रंथातील उतारा.

Saturday, July 4, 2020

कन्याकुमारी सायकलिंग... एक ध्येयपूर्ती

०६.११.२०१९

कन्याकुमारी सायकलिंग... एक ध्येयपूर्ती

मुंबई ते कन्याकुमारी सायकलवारी करायचा प्रस्ताव आला. परंतु दिवाळीच्या दिवसात सायकलिंगसाठी मुंबई बाहेर जायचे, याला मन तयार होईना. वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी एव्हढी मोठी सायकल सफर करावी का हा सुद्धा विचार आला. 

आतापर्यंतच्या आयुष्यात कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली होती. ह्या वर्षी निसर्गसोबत साजरी करायची. तसेच वय शरीराला असते, मनाला नाही. सारे काही शक्य आहे, हे मनाने ठरविले. कुटुंबाला सर्व विचार सांगून परवानगी मिळविली.

कन्याकुमारीचा सायकल कार्यक्रम हातात आला तेव्हा लक्षात आले, दररोज साधारण 150 किमी सायकलिंग करायचे होते. तसेच मध्ये खंडाळा, कात्रज आणि खंबाटकी घाट सुद्धा लागणार होते. पुढील रस्ता सुद्धा चढउताराचा आणि कठीण होता.

मनाची तयारी झाली होती, आता शारीरिक तयारीसाठी जोरदार सायकलिंग सराव सुरू केला. दोन वेळा खंडाळा घाट चढलो.  एका दिवसात शिर्डी आणि वज्रेश्वरीपर्यंत सायकलिंग केले. मुंबई ते अलिबाग राईड केली. परंतु या वेळी कन्याकुमारीला समानसह सायकलिंग करायचे होते, ते सुद्धा कोणतीही सपोर्ट व्हेईकल न घेता. ध्येय खडतर होते, त्या साठी कठोर परिश्रम करावे लागणार होते.

मुबंई ते पुणे सायकलिंग करताना, खंडाळा घाटात सायकलच्या मागील चाकाची एक तार तुटली. सायकल तशीच चालवत पुण्यापर्यंत आलो. तेथे सायकल दुरुस्त करून पुण्यापासून सायकलिंग करायला तयार झालो. सोबत असलेले समान खूपच जास्त आहे, याची कल्पना आल्यावर, काही समान पुण्यात काढून ठेवले. 


पुण्याहून निघताना, सकाळी दोनदा  सायकल पंचर झाली.  त्यामुळे सकाळी पाच ऐवजी, सायकल सफर सुरू करायला सहा वाजले. 

कात्रज आणि खंबाटकी घाट ओलांडताना सायकलिंगचा कस लागला होता.

पहिल्याच दिवशी १४६ किमी राईड झाली होती. दोन घाट ओलांडून एव्हढी राईड करणे फक्त दोस्तांच्या सहकार्यानेच शक्य झाले होते.

 त्यानंतर संकेश्वर, धारवाड, दावनगिरी, सिरा, बंगलोर ,सेलम, दिंडीगुल, कोवीलपट्टी आणि कन्याकुमारी असा एकूण १७६० किमी चा खडतर प्रवास ११ दिवसात सायकलने पूर्ण केला होता.
प्रवासात सायकल पंक्चर होणं, तार तुटणे,  कडक ऊन, विरुद्ध दिशेने वाहणारे जोरदार वारे, मधून मधून कोसळणारा धुवाधार पाऊस, हवामान खात्याने सूचित केलेले वादळ आणि हायवेला असलेली वाहनांची प्रचंड वर्दळ, रस्त्याची कामे, चढउताराच्या घाट्या यामुळे आम्हा सर्वांच्या ताकदीची कसोटी  लागली होती. या सफरीत शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक कणखरपणा जास्त महत्वाचा ठरला.

 "प्रदूषणमुक्तीचा" संदेश घेऊन सायकलिंग करत कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देणे हे आमचे स्वप्न होते. ते  विक्रमी वेळेत पूर्ण केल्याचे यश स्वामी विवेकानंदाना अर्पण केले. इप्सित ध्येय साध्य झाल्याचा आनंद सर्वांच्या चेह-यावर ओसंडून वाहत होता. आप्तस्वकीय कुटुंब, मित्रमंडळी, हितचिंतक यांच्या सदिच्छे मुळेच हे यश मिळाले होते.

आता पुढील शंभर वयाच्या आयुष्यात सायकलने भारत भ्रमण,  नर्मदा परिक्रमा, युरोप सायकलिंग टूर, अंटार्टीक सफर, चद्दर ट्रेक, स्काय डायव्हिंग.... असं बरंच काही उराशी बाळगून आहे.... या साठी तुमचे आशीर्वाद आणि प्रेरणा सतत मिळणार आहे, याची खात्री आहे.

मुंबईच्या सकाळ वृत्तपत्राने सुद्धा आमच्या उपक्रमाची दखल घेतली.


आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार.


श्री सतीश विष्णू जाधव

Kanyakumari Cycling 05.11.2019 कन्याकुमारी दर्शन आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश ०५.११.२०१९

०५.११.२०१९
कन्याकुमारी दर्शन आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश


आज दि. ४ जुलै, स्वामी विवेकानंदांचा ११८ वा स्मृतीदिन आहे. या दिवशी "कन्याकुमारी दर्शन" हा लेख स्वामीजींच्या चरणकमलावर अर्पण करतोय.

 सकाळी लक्ष्मण आणि मी लवकर उठून सायकलसह कन्याकुमारीच्या त्रिवेणी संगमावर सूर्योदय दर्शन घेतले. 

सूर्याचा तांबूस गोळा स्वामी विवेकानंद स्मारकावर विलसत होता. कन्याकुमारी मंदिराच्या मागच्या बाजूला सूर्योदय दर्शनासाठी जनसागर लोटला होता. तेथून सकाळची सायकल रपेट मारावी म्हणून जवळच्या सनसेट पॉइंटवर सुद्धा गेलो. कन्याकुमारीची खासियत आहे  की सूर्योदय आणि सूर्यास्त पॉईंट जवळ जवळ आहेत.  
 कन्याकुमारी हे भारतातील एकमेव ठिकाण आहे, जिथे  एकाच ठिकाणी सूर्य उगवतो आणि तेथेच मावळतो. तसेच येथेच तीन समुद्रांचा त्रिवेणी संगम होतो. 

 सकाळचा सायकल सैर सपाटा करून हॉटेलवर आलो. बाकीची मंडळी तयारच होती. समोरच्याच कन्याकुमारी ट्राफिक पोलीस चौकीला भेट दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. पी. अंबरसु यांनी आमचे स्वागत केले.

 प्रदूषण मुक्तीचा संदेश घेऊन आम्ही मुंबई पुण्याहून कन्याकुमारीला आलोय, हे सांगितल्यावर त्यांना आनंद झाला. "प्रदूषण मुक्त भारत" या बॅनरसह पोलीस अधिकाऱ्यांबरोबर फोटो काढले. त्यांच्या कडून कन्याकुमारीतील शाळा कॉलेजची माहिती घेतली. 
तेथून सेंट थॉमस एच. आर. सी. शाळेला भेट दिली. शाळेतील वरिष्ठ अध्यापक श्री सुघीलन यांची भेट घेतली. आमचा प्रदूषण मुक्तीचा उद्देश सांगितला. तसेच १० वी,१२ वी च्या वर्गामध्ये मुलांपर्यंत हा संदेश द्यायचा आहे,  हे सांगितल्यावर श्री सुघीलन आम्हाला १२ वीच्या वर्गावर घेऊन गेले. तेथे दिपकने सर्व मुलांशी सुसंवाद साधला. 

तसेच प्रदूषणाची माहिती आणि सायकलिंग करून पर्यावरण कसे प्रदूषण मुक्त करू शकतो, हे अतिशय खुमासदार पद्धतीने मुलांना सांगितले. वर्गातील एक विद्यार्थिनीने हेच भाषण सर्व मुलांना तामिळमध्ये सांगितले. सुघिलन यांनी सर्व संभाषणाचे व्हिडीओ शुटिंग सुद्धा केले.

श्री सुघीलन आणि इतर शिक्षकांसह गेट जवळ फोटो काढले.

 सुघीलन यांनी त्याच्या इयर बुक मध्ये आमच्या उपक्रमाची नोंद घेतली. 

येथून कन्याकुमारी स्टेशनला भेट दिली. भारताच्या दक्षिण टोकाचे शेवटचे स्टेशन "कन्याकुमारी", येथे आमच्या सर्व ग्रुपचा सायकलिंसह फोटो काढला.

आता नागरकोईलकडे प्रस्थान केले. कन्याकुमारीचे जिल्हाधिकारी श्री. प्रशांत वडनेरे यांनी आमच्या उपक्रमाची दखल घेऊन आम्हाला चहापानासाठी आमंत्रित केले होते.

कन्याकुमारीपासून नागरकोईल २० किमी आहे. आता बॅक वॉटरच्या किनाऱ्याने सायकल सफर सुरू झाली. नारळ आणि केळींनी हा प्रदेश बहरला होता. दुपारचे ऊन सुद्धा या हिरवळीने सुसह्य वाटत होते. 

दुपारी अडीचच्या दरम्यात IAS वडनेरे साहेबांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलो. भेटायला खूप मंडळी रांगेत असल्यामुळे आम्हाला अभ्यागत कक्षात थांबावे लागले. या दरम्यात नागरकोईल आणि कन्याकुमारी मधील काही पुढारी आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या भेटी झाल्या. त्यांनी आमचा संकल्प समजल्यावर आमचे कौतुक केले.

वडनेरे साहेबांना भेटल्यावर  त्यांच्याशी मराठीत बोलणे सुरू झाले. १५ वर्षांपासून तामिळनाडूमध्ये स्थायिक झालेले वडनेरे साहेब अजूनही मराठीपण जपून आहेत. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमचा सन्मान केला आणि प्रदूषणमुक्त भारत ही संकल्पना घेऊन कन्याकुमारीला भेट दिल्याबद्दल आमचे कौतुक केले. 

तसेच सायकलवारीसह पर्यावरणाच्या या अतिशय चांगल्या उपक्रमाबद्दल आम्हाला प्रशस्ती पत्रक दिले.

"भारताच्या प्रदूषणमुक्तीसाठी केलेल्या परिश्रमाचे चीज झाले." ही भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली. हीच संकल्पना घेऊन भारत भ्रमंतीचा विचार सुद्धा मनात आला.

 "प्रदूषण मुक्त भारत" ही संकल्पना, सायकल चालविल्यामुळे खऱ्या अर्थाने कार्यान्वित करता येईल आणि पाश्चिमात्य देशांप्रमाणे प्रदूषण मुक्ती आणि सुदृढ शरीरयष्टी यासाठी सायकलींचे वारे देशात वाहू लागतील,  हा दुर्दम्य आशावाद बाळगून कन्याकुमारीकडे निघालो.

मुंबई ते कन्याकुमारी ही लेखमाला स्वामी विवेकानंदांच्या चरणकमलावर अर्पण करतोय.

सतीश विष्णू जाधव

Friday, July 3, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Eleventh Day) 04.11.2019 मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस अकरावा) ०४.११.२०१९ कोविलपट्टी ते कन्याकुमारी सायकलिंग

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस अकरावा)
०४.११.२०१९
*कोविलपट्टी ते कन्याकुमारी*

कोविलपट्टीच्या जयलक्ष्मी हॉटेल कडून सकाळी सहा वाजता राईड सुरू केली, येथून कन्याकुमारी फक्त १३० किमी होते. मुंबई कन्याकुमारी राईडचा आजचा शेवटचा दिवस होता. सर्वजण रिलॅक्स होते.  हॉटेलजवळ  सायकल बरोबर फोटो काढले. सायकलिंनी या सफरीत अतिशय प्रेमळ आणि अप्रतिम साथ दिली होती. आज सांगता सुद्धा झकास होणार होती.

"प्रदुषणमुक्त भारत" ही संकल्पना व उद्देश घेऊन निघालेली  मुंबई - पुणे - कन्याकुमारी" ही दिर्घ पल्ल्याची सायकलवारी आता अखेरच्या टप्प्यात आली होती. 

सूर्य दर्शन झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ आणि झाडे डोलत होती. आजचे सूर्यदर्शन एक वेगळी ऊर्जा घेऊन आले होते. 

जीवनप्रवासात रेल्वेने, बसने, गाडीने पळती झाडे पहिली होती. आज पळणारी झाडे सायकल पाहणार होती.  शेतात दिसणारे दोन उंच पाम झाडे रग्बीच्या गोल पोष्ट सारखी भासली. त्यांच्या मधोमध दिसणारा सकाळचा सूर्य आम्हाला खेळायला बोलावत होता. 

पहिला टप्पा तिरुनेलवेली ४५ किमी वर होता. उजव्या बाजूला छोटे छोटे डोंगर दिसत होते. त्या माईल स्टोन जवळ सायकलने थोडा वेळ विश्रांती घेतली. 

आता सायकल, चाकाजवळ पसरलेल्या हिरवळीशी हितगुज करू लागली. "बघ, तुझ्या भेटीला मुंबईवरून आले. आता येतेस का,  स्वामी विवेकानंदांना भेटायला".  हिरवळ हसत म्हणाली, अग बाई, मी आहेच तुझ्या बरोबर कन्याकुमारी पर्यंत.  हिरवळीला हाताने हळूच कुरवाळत, हसतच सायकलवर स्वार झालो. खूप गम्मत वाटली दोघांच्या संभाषणाची....

नऊ वाजे पर्यंत ३५ किमी राईड झाली होती. वाटेतील थमिला रेस्टॉरंट मध्ये नाश्त्याला थांबलो. इडली, डोसा, मेंदूवडा, केळीच्या पानावर आला. सोबत चहा घेऊन पुढची राईड सुरू झाली. 

आज कोणाला घाई नव्हती. पण संध्याकाळच्या आत जर कन्याकुमारीला पोहोचलो तर सनसेट पॉईंट आणि कन्याकुमारी "झिरो किमी माइल स्टोन" वर फोटो काढता येतील, ही गोष्ट सोपनने सर्वांच्या कानावर घातली.

वाटेत स्पॉटेड डिअर सॅनच्युअरी लागली. आता कन्याकुमारी गाठायचे वेध लागले होते. त्यामुळे फक्त सॅनच्युअरीबाहेर फोटो काढून निघण्याच्या तयारीत होतो. तेव्हढ्यात मोटारसायकल वरून चहा विकणारा तामिळी आमच्या जवळ आला. त्याच्याशी हावभावाने संवाद केला. "तुई मुई इंडिया" त्याला कळले. सन्मान म्हणून त्याने आम्हा सर्वांना प्रेमाने चहा पाजला. 

मनातील भाव आणि संकल्प समोरच्याला भावाले की माणसे खूप जवळ येतात आणि गोड आठवणी देऊन जातात.

सकाळी दहा वाजता, आमच्या पासून ९८ किमी वर कन्याकुमारी होते, तर तिरुनेलवेली १५ किमी होते.  येथे अभिजीतने माईल स्टोनवर चक्क झोपून फोटो काढला.

उन्हे चढण्याअगोदर जास्तीत जास्त अंतर कापायचे होते. आता जंगलातील, छोट्या छोट्या घाटींचा रस्ता सुरू झाला. वाहनांची वर्दळ तुरळक होती. मी आणि लक्ष्मण पुढे होतो. काही ठिकाणी डोंगर पोखरून सपाट रस्ते बनविले होते.

 लांबवर मदुराई वरून कन्याकुमारीला जाणारी रेलगाडी दिसत होती, त्यात तिची कु...क, कु...क शिट्टी ऐकू येत होती.

जसे काही आम्हाला खुणावत होती. "या, लवकर या, स्वामी विवेकानंदांच्या भेटीला कन्याकुमारीला" एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटावे, असे चित्र होते. 
 
स्वामीजींच्या "विश्व बंधुत्व" या संकल्पनेला आमची "प्रदूषण मुक्त भारत" ही संकल्पना भेटायला निघाली होती.

आज सर्वजण वेगळ्याच मूड मध्ये होते. लक्ष्मणच्या तुटलेल्या तिरंग्याचीची काठी नामदेव जोडून देत होता.

 दिपकचे नवीन बूट माईल स्टोनच्या पांढऱ्या रंगापेक्षा चमकत होते, तर विकासाच्या एका पायाची निकॅप गायब होती. सतत राईड करून त्याचा उजवा पाय बरा झाला होता. 

नामदेव आणि विकास या दोघांच्या खांद्यावर, त्यांचे गुरू सोपान यांनी  हात ठेऊन माईल स्टोनवर फोटो काढला.

 पण  सोपानरावांनी आपले हात दोघांच्या डोक्यावर ठेवल्याचा भास मला झाला.  

सोपानरावांसोबतच विकास आणि नामदेव यांनी  सायकलिंग केले होते. सोपानरावांचा सायकलिंगचा वसा दोघांनी मनापासून पाळला होता.  मॅरेथॉन आणि सायकलिंग मुळे सोपानरावनी एका वर्षात १६ किलो वजन कमी केले होते. आता आणखी ते, काही चांगले संकल्प करणार आहेत आणि  विकासच्या गळीसुद्धा उतरवणार आहेत.

अडीच वाजता पोदिगय हॉटेल आले. हॉटेलमध्ये स्वच्छता आणि नीटनेटकेपणा जपला होता. हॉटेल मध्ये सर्व महिला काम करत होत्या.

 पानावर शाकाहारी जेवण आले. दोन भाज्या, रस्सम भात, पापड आणि ज्याला हवे त्यांना तळलेली मासळी आली.

 मालकाला बऱ्यापैकी हिंदी येत होते. वाढायला सुद्धा सर्व महिलाच होत्या. हॉटेलमध्ये महिलांची साथ असली की,  जेवणाला एक वेगळीच गोडी येते. त्यामुळे विकास मासे खाऊन दमत नव्हता. या हॉटेलचे छप्पर नारळाच्या झावळ्यांचे असल्यामुळे आता मस्त थंडावा होता. जेवणानंतर खोबरा चिक्की खायला मिळाली. 

येथून ५० किमी कन्याकुमारी होते. दिवसा उजेडी साडेपाचच्या आत कन्याकुमारीला पोहोचण्यासाठी आता जोर मारावा लागणार होता.

शेवटच्या दिवशी एक महत्वाची गोष्ट घडली.
तामिळनाडू शासनाच्या पर्यावरण मंत्रालय व वन मंत्रालया मार्फत 'लझाऊर' गावाच्या वनक्षेत्रांत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू होता.  आम्ही "प्रदूषण मुक्त भारत" हा संदेश घेऊन वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात आम्ही सामील झालो. 

आमच्या मुंबई-पुणे-कन्याकुमारी  सायकल वारीतून देण्यात येणा-या संदेशाची  या दोन्ही मंत्रालयांनी अतिशय सकारात्मक दखल घेतली.  तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाशीदेखील त्यांनी आमच्या उपक्रमाबाबत संपर्क साधलेला होता.

या दोन्ही मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आमच्या स्वागताला कन्याकुमारीला उपस्थित होते.

साडेचार पर्यंत कन्याकुमारी पासून १७ किमी अंतरावर होतो. तासाभरात हे अंतर कापणे शक्य होते, परंतु मधल्या गावांजवळच्या  छोट्या छोट्या चढाच्या पुलावरून जाण्याने दमछाक होत होती. पण आता आम्ही " मंझील के पास" आल्यामुळे पायात बळ संचारले होते. 

सूर्य अस्ताला जाण्याची तयारी करत होता. पण तो डुंबण्या अगोदर कन्याकुमारीला जायचे होते. सर्वजण जोशात दौडू लागले, बरोबर साडेपाचला कन्याकुमारीच्या शेवटच्या माईल स्टोन वर पोहोचलो आणि सर्वानी जल्लोष केला.  त्या माईल स्टोन जवळ भरपूर फोटोग्राफी केली. तेथून  अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर समुद्रांच्या त्रिवेणी संगमावर आलो. 

 मावळत्या सूर्याला नमस्कार केला. भारताचा रस्ता तेथे संपला होता, आमचे ध्येय साध्य झाले होते. खडतर परिश्रमाला फळ मिळाले होते. आनंदाच्या भरात सर्वांनी सायकल हातात घेऊन फोटो काढले. 


मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफरीमध्ये लक्ष्मण सतत माझ्या बरोबरच होता. आज शेवटच्या दिवशी सुद्धा त्याने माझी साथ दिली होती. सर्वांच्या पुढे आम्ही दोघांनी कन्याकुमारी प्रथम गाठली होती. या पूर्णत्वाचा आनंद लक्ष्मणच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

मी दोन्ही हात पसरवून सागरांच्या  त्रिवेणी संगमाला कवेत घेतले.  

डोळ्यात अश्रू तरळले, पण ते आनंदाचे, ध्येयपूर्तीचे आणि संकल्प सिद्धीचे होते. ११ दिवसात १७६० किमी सायकलिंग;  एक खडतर पण आनंददायी सफर पूर्णत्वास गेली होती.

सोपानराव नलावडे, विकास भोर, नामदेव नलावडे, दिपक निचित, अभिजित गुंजाळ आणि लक्ष्मण नवले याची साथ होती म्हणूनच सतत ऊर्जा मिळत होती. एकजुटीमुळेच संकल्प सिद्धीस गेला होता.  या घवघवीत यशामध्ये सर्वात मोठा वाटा मित्रांचा होता.


सतीश विष्णू जाधव

Saturday, June 27, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Tenth Day) 03.11.2019. मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस दहावा) ०३.११.२०१९ दिंडीगल ते कोविलपट्टी सायकलिंग

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस दहावा)  

 03.11.2019

दिंडीगल ते कोविलपट्टी सायकलिंग

सकाळी सहा वाजता स्ट्रेचिंग आणि प्रार्थना करून दिंडीगल वरून कोविलपट्टीकडे प्रस्थान केले. आज जवळपास दीडशे किमी स्ट्रेच होता.


सकाळीच सूर्य दर्शन झाले. प्रभात समयी "मित्राच्या" भेटीचा आनंद अपरिमित होता. नवा दिवस, नवीन ऊर्जा आणि ध्येयपूर्तीकडे प्रस्थान करण्याचे प्रशस्त कार्य या आदित्याच्या आगमनाने सहज सोपे झाले होते.

सात वाजता अन्नलक्ष्मी हॉटेलमध्ये नास्त्यासाठी थांबलो. आज खुप दिवसांनी पोंगलचा (तमिळ खिचडी) मस्त आस्वाद घेतला. हॉटेलमध्ये सर्व महिला काम करत होत्या.
आता मदुराई जवळ येऊ लागले. अभिजीतला मदुराईच्या मीनाक्षी मंदिराचे दर्शन घ्यायचे होते. हायवे पासून आत 27 किमी वर मीनाक्षी मंदिर होते परंतु कन्याकुमारीचा  पल्ला मोठा होता, त्यामुळे मदुराई शहरात जायचे टाळले. 

मी स्टेटस अपडेट करत होतो. सकाळीच पुण्याच्या मनोजचा फोन आला. 'कन्याकुमारीला रस्ता संपतो, तेथे डेड एन्डचा फोटो काढा'.

वाटेत सत्यमंगलम टायगर रिजर्व लागले. नऊच्या दरम्यात लक्ष्मणला झोप येऊ लागली. एक डेरेदार झाडाखाली पथारी मांडून लक्ष्मण झोपी गेला. मी सहलीचे निवांत लेखांकन करत बसलो होतो.

बाराच्या आसपास 78 किमी सायकलिंग झाले होते. वाटेत कामधेनू हॉटेल लागले.  गरमागरम  कांदा भाजी तळली जात होती. भोंडा, केळा भजी आणि गरम कांदाभजी आम्ही हादडली. इथे एक बर होतं, सांबर आणि चटणी हवी तेंव्हाढी घ्या, भरपेट खा.  पांढरी आणि लाल चटणी फर्मास होती. त्या नंतर घेतलेला चहा म्हणजे पर्वणी होती.
 येथील चहा बनवायची पद्धत एकदम निराळी. चहाची पावडर एका कापडी पोटलीत घालून उकळत्या पाण्यातील, छोट्या पाण्याच्या भांड्यात डुंबवून ठेवतात, त्यानंतर काचेच्या छोट्या ग्लासात साखर टाकून त्यावर ती चहाची पोटली धरून चहाचा अर्क ग्लासात  मिसळतात. त्यानंतर दुसऱ्या भांड्यातले गरम दूध त्या चहाच्या ग्लासात ओततात. मग एका ग्लासातून दुसऱ्या ग्लासात चहा, साखर, दुधाचे मिश्रण फेसाळत ओतले जाते.  वर टॉपिंगला आणखी चहाचा अर्क टाकून, तो ग्लास पाण्यात बुडवून प्यायला देतात. तमिळ चहा बनविण्याची पद्धत अतिशय झकास होती. शेवटी चहाच्या ग्लासाचे बुड पाण्यात बुडवितात कारण कपाच्या बुडाला लागलेला चहा तुमच्या अंगावर सांडू नये. मानले या पद्धतीला...
अजून 80 किमी राईड करायची होती. आम्ही जोर मारला आणि पुढे सर्वांना गाठले. तामिळनाडू मधील रस्ते अतिशय चांगले होते, त्यामुळे जोरदार राईड सहज होत होती. रस्त्याला रहदारी सुद्धा कमी होती.
दोनच्या सुमारास वाहीकोलम गावातील  घरगुती हॉटेल मध्ये गेलो. येथे सर्व महिला काम करत होत्या. मसालेदार तळलेले काणे मासे आणि रस्सम भात खाल्ला वर  चिक्की खाल्ली. 

दुपारी साडेतीन वाजता टिफिन हॉटेल लागले. चहा साठी थांबलो. येथे सर्व तमिळी... त्यांना दुसरी कोणतीही भाषा येत नाही, त्याच्याशी मुक्याच्या भाषेत हावभावने काय हवे ते सांगितले. माणसे हसतमुख होती. किती पैसे झाले, या साठी नोटा काढून दाखवल्या.

विरदूनगर गावात साडेचारला पोहोचलो. तेथे चहा पीत असलेल्या नागरिकांनी आमची आस्थेने चौकशी केली. पर्यावरणाचा संदेश सर्व भारतात पसरावा, हे सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी चहा आणि गोड बनपाव खायला घातला. त्यांनी आपुलकीने केलेल्या चौकशी आणि स्वागतामुळे आमचा उद्देश साध्य होतोय याची निश्चिती झाली.

याच मंडळींनी तमिळ भाषेमध्ये "तूई मुई इंडिया" म्हणजे पोल्युशन फ्री इंडिया हे सांगितले. एक तमिळ वाक्य शिकलो होतो. मला वाटते... अशा प्रकारे भारत भ्रमण केले तर भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि खानपान याचा आस्वाद नक्कीच घेता येईल.

 'तमिलची रेस्टॉरंट'  पर्यंत 115 किमी सायकलिंग झाले होते. संध्याकाळचे 6 वाजले होते. अजून 45 किमी जायचे होते. लक्ष्मणच्या डोक्यात आराम करायचे विचार होते, पण मी त्याला होकार देत नव्हतो. शेवटचे दोन दिवस संपूर्ण सायकलिंग लवकर लवकर करायचे असे मी ठरविले होते. हे लक्ष्मणच्या गळी उतरविण्यासाठी  'मौनं सर्वार्थ साधनं' हा मंत्र अवलंबला. 
नाऊडूपट्टी गावापर्यंत लक्ष्मणाला रेटले. 
शेवटी त्याला सांगितले,  'आता फक्त 13 किमी राहिले आहे सायकलिंग करूया' लक्ष्मण माझ्या मौनाचा अर्थ समजला होता, त्यामुळे तो हसत होता. राईड पूर्ण करायचे ठरले. रात्री साडेआठ वाजता कोविलपट्टीच्या जयलक्ष्मी हॉटेलमध्ये पोहोचलो. 163 किमी राईड झाली होती.

आजची सायकल सफर लांब पल्ल्याची होती, परंतु जनमाणसांच्या भेटीगाठी, त्यांचे आदरतिथ्य आणि नितांत सुंदर परिसर, हवा हवासा वाटणारा निसर्ग यामुळे सहज सोपी वाटली.

 या कोविलपट्टीवरून कन्याकुमारी फक्त 140 किमी आहे.  "याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिन गोड व्हावा" तुकोबांच्या या अभंगाचा प्रत्यय उद्या येणार होता.
सतीश विष्णू जाधव

Wednesday, June 24, 2020

राणीचा रत्नहार राईड

राणीचा रत्नहार राईड

२२, जून २०२०

आज संध्याकाळी विजयसह राईड वर निघालो. खूप दिवसांनी विजयसह रात्रीची राईड करत होतो. विजयने मिशा काढल्यामुळे एकदम तरुण दिसत होता.
दूरदर्शन, वरळी नाका, महालक्ष्मी, जसलोक, वाळकेश्वर करीत मारिन लाईन्स चौपाटीला पोहोचलो. आज सुद्धा चौपाटीवर कोणालाही बसण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मारिन लाईन्स वरील गोलाकार बस स्टॉपचा आसरा घेतला आणि संध्याकाळी दिसणारा राणीचा रत्नहार न्याहाळू लागलो. 

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसर...
मुंबईचा दिमाख मिरवणारा....
मुंबई आणि समुद्र यांचे अतूट नाते...
हा परिसर  गोलाकार असल्यामुळे तो समुद्राची गळाभेट घेताना दिसतो...
तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा.!!!

खरोखरच समुद्राच्या लाटा या किनाऱ्याला भेटताना मौल्यवान मौक्तिक अर्पण करतात....
हे पाहात असताना, सर्व समर्पणात केलेल्या त्यागाची प्रचिती येते... 
आजही ते अनुभवले...
घरोघरी देवघरात तेजाची निरांजने उजळत असताना...
या ठिकाणी संध्यासमयी, तेजोनिधी गोल आपल्या किरणांचा तेजस्वी प्रकाशाची तीव्रता कमी करून अस्ताचली निघत होता...
आकाशी काळ्या पांढऱ्या ढगांची दाटी झाली होती...
चुकार किरणे ढगाआडून समुद्र लाटांशी खेळत होती...
समुद्रलाटा सोनसळी होऊन लहरत होत्या... घराकडे उडणारे पक्षी उडता उडता त्यांच्या खेळाची मज्जा घेत होते...
मंद मंद वारे काळ्या पांढऱ्या ढगांशी खेळण्यात रमले होते...
आपल्या सोबत त्यांना पळायला लावत होते... पळताना त्यांच्या बदलणाऱ्या आकाराची नक्षी माझे चित्त सुखवित होती... 
काळ्या ढगांची  समुद्राशी असलेली सलगी शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे...
या विचारात मन रममाण झाले...
शाळेत शिकविलेल्या जलचक्राची महती पुन्हा अधोरेखित झाली...
ढग आणि समुद्राच्या पाण्याला असे नक्कीच वाटत असेल की काही काळापूर्वी आपण एकमेकांच्या जागी होतो...
आणि आतासारखे तेव्हाही परस्परांना न्याहाळत होतो...
या सूर्याच्या उष्णतेने समुद्र पाण्याची वाफ होऊन ढग झालो आणि पावसाच्या रूपाने पुन्हा समुद्राचे पाणी!!!
ह्या सूर्यशिवाय हे काही शक्य नसते झाले...
ह्या विचाराने आपल्या जीवनातील "मित्राचे" महत्त्व मनोमन पटले...
आणि म्हणूनच सूर्याला मित्र हे नामाभिधान  का पडले असावे ह्याचा उलगडा ही झाला...
     
अंधार पडू लागताच मानवी आविष्काराचे  डोळ्यांना सुखावणारे विलोभनीय दृश्य दिसू लागले...
समुद्राला वेढलेल्या गोलाकार रस्त्यावरील विजेचे दिवे पाहून ती रत्नजडीत हारातील दैदिप्यमान रत्नेच भासली...
एव्हढा मौल्यवान हार राणीच्या गळ्या व्यतिरिक्त आणखी कोठे बरं असू शकेल!! 
ही मुंबई  महानगरी भारताची राणी...
आणि  ह्या विजेच्या दिव्यांची रोषणाई म्हणजे तिच्या गळ्यातला हा अमोलिक रत्नहार !!!

 सर्व मित्रांच्या आठवणीमध्ये...
 तसेच मुंबई महानगरीचा सुज्ञ नागरिक असण्याचा रास्त अभिमान बाळगत  परतीचा प्रवास सुरु झाला....

सतीश जाधव