Wednesday, June 28, 2023

बेधुंद पावसाळी राईड


बेधुंद पावसाळी राईड

रंगबिरंगी  दिवस होता... वातावरण मदहोश करणारे होते... कारने बोरिवलीला लग्नाला जातानाच... पावसाचे प्रताप सुरू झाले... तेव्हाच ठरविले आज पावसात राईड करायची.. बेधुंद भिजण्यासाठी...

धुवाधार पावसाची सायंकाळ आली... आणि तेव्हढ्यात नवनीतचा फोन आला... चला पावसात सायकलिंग करायला... मनातले मित्राच्या ओठावर आले... आणि सखी निघाली भिजायला... पावसाचे गाणे गायला....

तुडुंब पावसात सखीवर स्वार झालो... सखी शिरशिरली... बावरली... मोहरली... आणि मग सरसावली... दिलं पाण्यात झोकून... 

नवनीतसह स्वारी निघाली नरिमन पॉइंटला... जलाधरांनी अंग अंग झाले ओलेचिंब... पाण्याचे फव्वारे काढत सुसाटत धावत होतो... चष्म्या वरून ओघळणाऱ्या जलबिंदूना जिभेच्या टोकावर घेऊन दिमाखात हवेत उडवत होतो... भन्नाट  गेलो NCPA कडे... बसलो कठड्यावर सागराची गाज ऐकत... पाऊस पडतच होता... किनाऱ्यावरून चालणारी मंडळी छत्र्या रेनकोटचे अस्तर घेऊन पावसाला थोपावत होते... भिजण्यात काय मजा असते... हे त्यांना कोण सांगणार... 

तिकडून निघालो गेट वे ऑफ इंडियाकडे... वरचे टप नसलेली मुंबई दर्शनची रिकामी बस सखीकडे टकमक पाहत होती... दीडशे रुपयात साऊथ मुंबई फिरविणारी बस आज ताज हॉटेलच्या समोर निवांत विसावली होती... 

भर पावसात फोटो काढले... आणि आलो ऑपेराहाऊसच्या तिवारी स्वीटकडे...नवनीतने मस्त ट्रीट दिली...दोघात एक स्टफिंग केलेली जंबो दही कचोरी खाताना सायकल मैत्रीण शुल्लुची आठवण झाली... 

नाना चौकातून हाजी अली कॉर्नरला आलो... स्कूटर वरच्या दोन तरुणांनी भिजताना पाहिले... पुढच्याने रेनकोट घातला होता तर मागचा छत्री घेऊन बसला होता... विचारले... "पावसात भिजताय"... होय सखिसह मस्त भिजतोय... ठरवूनच घरातून बाहेर पडलोय... बालपणीच्या आठवणी ताज्या करण्याचा हाच तर रामबाण उपाय आहे... 

सिग्नल सुरू होण्या अगोदर स्कूटरस्वाराने रेनकोट उतरवला... मागच्याने छत्री बंद केली... आणि रममाण झाले पावसात... 

आनंदाचा झरा कसा बेधुंद असतो... याची प्रचिती आली... आजची चौतीस किमी राईड सार्थकी लागली होती...

सतीश जाधव...



Sunday, June 25, 2023

सायक्लोथॉन २०२३

मध्य मुंबईत प्रथमच मनसे सायक्लोथॉन २०२३ वारीचे आयोजन करण्यात आले होते... मनसे मा. नगरसेवक श्री संतोष धुरी यांच्या मार्फत... 

या वारीचे स्लोगन होते... सायकल स्पर्धा नव्हे... पर्यावरण अभियान आहे... प्रदूषण टाळा आणि निसर्ग वाचवा... कार, मोटारसायकल, स्कूटरच्या ऐवजी जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवून शरीर स्वास्थ्याबरोबर पर्यावरण स्वास्थ्य राखणे ही काळाची गरज आहे...

सकाळी  साडेपाच वाजल्या पासूनच आदर्श नगरातील वेल्फेअर सेंटर मैदानावर सायकल प्रेमी जमायला सुरुवात झाली होती... पावसाचा शिडकावा सुरू असल्यामुळे मस्तपैकी आल्हाददायक वातावरण होते... बाहेरून येणाऱ्या सायकल वीरांना बिब वाटपाचे काम सुरू झाले होते... एका बाजूला सेल्फी पॉइंट सुद्धा बनविण्यात आला होता... ठाणे, घोडबंदर, ऐरोली, घणसोली विरार येथून सायकल वीर या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते...

 मनसे नेते श्री संदीप देशपांडे यांनी स्वतः सायकल चालवून   सकाळी साडेसहा वाजता या सायकल वारीची सुरुवात करून दिली...

चार वर्षाच्या बाळगोपाळापासून ते एकाहत्तर वर्षाच्या तरुणांपर्यंत जवळपास पाचशे सायकलिस्टनी या वारीत भाग घेतला होता... विशेष म्हणजे महिलांचा सहभाग सुध्दा लक्षणीय होता... 

आयोजकांनी जाहीर केले की ही सायकल रेस नाही... त्यामुळे प्रत्येकाने मजेत रमतगमत... पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत... फोटोग्राफी करत या सायकल वारीचा आनंद लुटावा... या सायकल सफरीत सावरकर  स्मारक प्रतिष्ठान, प्रभादेवी डिकॅथलॉन येथे हायड्रेशन पॉइंट ठेवण्यात आले होते... तसेच जागोजागी मनसेचे कार्यकर्ते मार्ग दाखविण्यासाठी झेंडे घेऊन सज्ज होते... 

 पहिल्या पावसात सायकल चालविण्याची मजा काही औरच असते...
शिवाजी पार्क मैदानातील नाना नानी उद्यानाजवळ रंगीबेरंगी छत्र्या टांगून ठेवण्यात आल्या होत्या... जणूकाही आकाशात रांगोळी काढण्यात आली होती...

 चार वर्षाचा पार्थ रेनकोट घालून सायकल चालवत होता... त्याने नंतर रेनकोट काढून पावसाचा आनंद घेतला... काही वयस्क महिलांनी तर प्रथमच या वारीत भाग घेतला होता... उत्साहाच्या भरात तरुण मंडळी तर सुसाटत निघाली होती... 
 
सिद्धिविनायक मंदिराकडून प्रभादेवी डिकॅथलॉन जवळ आल्यावर तेथे एनर्जी ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली होती... तेथून वरळी चौपाटीवर वारी वळवली होती...  ॲट्रिया  मॉलच्या पुढे वळसा मारून पुन्हा वरळी चौपाटीला आली .. बरेच सायकल वीर वरळी चौपाटीवर सीलिंकच्या लोकेशनवर फोटो काढत होते...तेथून सायकल वारीने आदर्श नगरात प्रवेश केला आणि १५ किमी वारीची सांगता झाली...

वेल्फेअर मैदानाच्या दरवाजात सर्वांना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले... तसेच सर्व सायकल वीरांना लकी ड्रॉ कूपन देण्यात आले... या वारीत भाग घेतलेल्या सर्व सायकल प्रेमींसाठी कांदापोहे उपमा केळी आणि चहाचा अल्पोपहार होता...

मनसे नेते संदीप देशपांडे आणि मा. नगरसेवक संतोष धुरी यांच्या मार्फत... वारीत भाग घेतलेल्या बाल वीरांना भेटवस्तू देण्यात आल्या... विविध क्रीडा क्षेत्रात आणि विशेष म्हणजे ११०  मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करून  भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहून जागतिक कीर्ती मिळविलेले डॉ आनंद पाटील या सायक्लोथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते...

 तसेच दिव्यांग आणि अंध सायकल वीरांचा सन्मान करण्यात आला... या वारीत भाग घेतलेल्या वयस्क तरुणांचा आणि पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला...

नंतर सुरू झाली बक्षिसांची खैरात... प्रथम पंचवीस भाग्यवंतांना सायकल घंटी बक्षीस देण्यात आली त्यानंतर सायकल पंप विजेत्यांची नावे जाहीर झाली... पाठोपाठ सायकल लॉक, गॉगल आणि हेल्मेट विजेते जाहीर झाले... सायकलप्रेमी आणि सायकलिस्ट तुषार आंब्रे यांनी गॉगल्स स्पॉन्सर केले होते... शेवटी जाहीर झाले प्रथम बक्षीस... डिकॅथलॉन प्रभादेवी यांनी स्पॉन्सर केलेली सायकल... आणि त्या सायकलचा भाग्यवान विजेता होता... सुहास कोंडुसकर... 

अतिशय शिस्तबद्ध आणि सुनियोजित अशा या सायकल वारीसाठी खूप परिश्रम घेतले ते सचिन पारकर, अंबरीश गुरव, दापोली सायकल क्लबचे सदस्य आणि सर्व मनसे स्वयंसेवक यांनी... या सर्वांचे नगरसेवक संतोष धुरी यांनी विशेष आभार मानले...

सचिन आणि अंबरीश यांचा यथोचित गौरव केला... वरळी दादर आणि प्रभादेवी पोलिसांचे सुध्दा अतिशय मोलाचे सहकार्य लाभले या वारीला...

संपूर्ण मुंबईला भूषणावह असणारी ही सायकल वारी खूप मोठा संदेश देऊन गेली आहे सर्व जनतेला... 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकल चालवा... आणि निसर्गाच्या जवळ जाऊन शरीर स्वास्थ्य सुद्धा सुदृढ ठेवा...

आयुष्य हे सायकल चाविण्यासारखं असतं... तोल सांभाळायचा असेल तर सतत पुढे जात रहावं लागतं... हिच जीवन जगण्याची कला आहे...

माननीय श्री संतोष धुरी यांचे सायकल वारी आयोजनचे हे पहिले पाऊल सर्वांसाठी दिशादर्शक ठरणार आहे...

मंगल हो ... !!!

सतीश जाधव

Friday, June 16, 2023

जागतिक दर्जाची सायकल रेसिंग स्पर्धा... काश्मीर ते कन्याकुमारी

जागतिक दर्जाची सायकल रेसिंग स्पर्धा...
 काश्मीर ते कन्याकुमारी

काश्मीर ते कन्याकुमारी हे 3651  किमी अंतर सहा दिवस तेवीस तास आणि 39 मिनिटात पार करून जागतिक विक्रम  प्रस्थापित करणारे डॉ अमित समर्थ यांची आज भेट झाली... 

मोनिलच्या वांद्रे येथील बाईकइंडिया या सायकल शॉपी मध्ये असलेल्या टॉक शो मध्ये...

दररोज साधारण 550 किमी अंतर पार करत... दिवस-रात्रभरात फक्त एक तास झोप घेत ही सायकल रेस विक्रमी वेळात पूर्ण करून डॉ अमित यांनी  जागतिक सायकल क्षेत्रात भारताला मानाचे स्थान मिळवून दिले आहे... 

 "रेस  अँक्रॉस अमेरिका" या सायकल रेसिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी एका सायकलिस्टला पन्नास लाख रुपये खर्च येतो... तर ह्या भारतीय स्पर्धेसाठी एका स्पर्धकाला पाच लाख रुपये खर्च आला... 

या स्पर्धेत एकूण बारा स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील एक स्पर्धक साठ वयाचा होता... एक स्पर्धक सिंगल गियर सायकलिस्ट होता.. तर तीन स्पर्धक अपंग होते...  सर्वांनी नियोजित वेळेआधी यशस्वीरीत्या ही स्पर्धा पूर्ण केली...

या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन अतिशय देखणे आणि नियोजनबद्ध होते... तसेच अमेरिकन स्पर्धेच्या तोडीसतोड होते... भारतीयांनी भारतीयांसाठी  भारताच्या भूमिवर आयोजित केलेली  स्पर्धा होती... ही प्रचंड अभिमानाची बाब आहे... 

BRM / SR / LRM / RAAM इत्यादी परदेशातील सायकल स्पर्धांना पर्याय म्हणून ही स्पर्धा अतिशय उपयुक्त असून भारतीय तरुणांना आणि रेसिंग सायकलिस्टना नवनवीन जागतिक विक्रम पादाक्रांत करण्याची एक सुसंधी उपलब्ध झाली आहे भारत भूमिवर... 

डॉ. अमितच्या मार्गदर्शनाखाली पुढील स्पर्धा नोव्हेंबर 2024 मध्ये असणार आहे... साठीच्या पुढील तसेच MTB रायडर्स सुद्धा या स्पर्धेत भाग घेऊ शकतात...

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी डॉ अमित समर्थ (मोबाईल नंबर 8956433351) यांचे मार्गदर्शन सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे...

तर सुरू करा तयारी... आणि मेक इन इंडियाच्या प्रयत्नांना हातभार लावा...

 मंगल हो

सतीश जाधव 

Thursday, June 8, 2023

अनिल भोसले एक जिंदादिल माणूस...

अनिल भोसले एक जिंदादिल माणूस...

काल अनिलचा फोन आला... "सतीश, सायकल वर आहेस काय"

"मुंबईत आहे" 

हे ऐकताच अनिल म्हणाला... गॅगरीन झाल्यामुळे माझा उजवा पाय गुढग्यातून कापला आहे...

व्हील चेअरवर आहे...

सध्या एक दिवसा आड डायलिसिस करावे लागते...

सर्व दात काढल्यामुळे पातळ पदार्थांचे भोजन घेतो...

दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे...

हेवी डायबिटिजमुळे इन्सुलिनपण सुरु आहे...

काळजात धस्स झालं...

एव्हढ्या प्रचंड आजारपणात हा माणूस माझ्याशी हसत हसत बोलत होता...

हाडाचा ट्रेकर... मिश्किल स्वभावाचा... दिलदार... हरहुन्नरी... हसतमुख... YHAI चे हिमालयातील बरेच ट्रेक केलेला... दररोज भांडुप मुलुंडच्या डोंगरावर प्रभात फेरी करणारा... अमरनाथ यात्रा... लेह लडाख... आणि बऱ्याच कौटुंबिक सहलीत सहभागी असलेला माझा प्रिय मित्र अनील... अतिशय गंभीर आणि कठीण प्रसंगातून जात असताना सुद्धा... त्याच्या बोलण्यात कोणतीही खंत नव्हती... ना आजारपणा बद्दल दुःख होते...

अनिलला उद्या सकाळी भेटण्याचा निर्धार करून... गृपवर मेसेज टाकला... उद्या सकाळी साडेपाच वाजता मुलुंड सायकल राईड...

अंबरीश आणि शिवम यांनी होकार दिला...

आज सकाळीच राईड सुरु झाली...
  सायकलच्या चेनचे दाते खराब झाल्यामुळे वेग घेता येतं नव्हता... कॅसेट आणि चेन बदलणे आवश्यक होते... पण त्यापेक्षा अनिलला भेटणे अत्यावश्यक होते...

 कामावर लवकर जायचे असल्यामुळे शिवम  विक्रोळी  वरून यु टर्न घेऊन घरी परतला... दिड तासात  चेकनाक्याजवळील मुलुंड बोर्डाकडे पोहोचलो...
महेश दाभोळकर भेटायला येणार म्हणून त्याला फोन लावला... प्रतिसाद मिळाला नाही... काहीतरी कामात असावा... 

अनिल भोसलेला फोन लावला... 

सांगितले, "येतोय भेटायला"... 

अनिल एकदम खुश... 

म्हणाला... "सतीश एकदम सरप्राइज"... 

अनिल... तूच माझ्यासाठी सरप्राइज आहेस...

पत्नी अश्विनीने दरवाजा उघडला... आणि तडक अनिलचे बेडरूम गाठले... बेडच्या किनाऱ्यावर उघडा बंब बसलेला अनिल तुटका पाय हलवत हसत होता... 

हृदय हेलावले...

 दोन महिन्यांपूर्वी अंगठ्याला झालेली शुल्लक जखम डायबबिटिजमुळे चिघळली... गॅंगरीन झाले... प्रथम पायाचा अंगठा काढला मग बोटे काढली... गँगरीन वाढतच होते म्हणून उजवा पाय गुढग्यापासून काढावा लागला... गुढग्याचे टाके आता बऱ्यापैकी सुकले होते... सहा महिन्यात जयपूर पाय लावण्याचा विचार आहे... 

सर्व आजारांचा खजिना असलेला अनिल... अशा विपरीत परिस्थितीत...  प्रचंड सकारात्मक उर्जा असलेला आणि जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला अवलिया भासला... 

आनंद मधील राजेश खन्नाचे सुप्रसिद्ध वाक्य आठवले...

 " बाबुमोशाय जिंदगी बडी होनी चाहिए... लंबी नही... 
 
खरोखरच कीती जगलास... यापेक्षा कसा जगालास... हेच महत्त्वाचे आहे ना !!!

सोबत असलेला अंबरीश दिक:मुढ होऊन दोघांचे संभाषण ऐकत होता... 

अनपेक्षितपणे  तातडीने  भेट घेतल्यामुळे अनिल जाम खुश झाला होता...  बॅगेतून काढून  सुदाम्या सारखी सोबत असलेली राजगिरा चिकी खायला दिली... बोळक्या तोंडाने अनिल आनंदाने चिक्की  खात होता... चिक्कीत असलेले शेंगदाणे चावता येत नाहीत म्हणून बाहेर काढून ठेवत होता...

 इतक्यात अश्विनीने चहा बिस्किटे आणली... या माऊली मुळेच अनिल हिमालयासारखा उभा आहे याची जाणीव झाली...

अनिलसह पत्नी अश्विनी, मुलगा बाळा यांच्याशी दिड तास मस्त गप्पा मारल्या... दुःखाची किनार असलेल्या त्या हसऱ्या घरात... आनंदाचे कारंजे फुलविले... बायको स्वप्नाला घेऊन पुन्हा भेटायला येण्याचे आश्वासन देऊन भोसले कुटुंबाची रजा घेतली...

 परममित्र अनिल जयपूर फूट लाऊन पुन्हा चालू फिरू लागणार... या साठी आजची ६३ किमीची सायकल राईड समर्पित...

विक्रोळी कन्नमवार नगर जवळ अंबरीशची सायकल पंचर झाली...
 
सोबत पंचरचे सर्व साहित्य असल्यामुळे भराभर सायकल ठीकठाक करुन  दोघे घरी परतलो...
 
मंगल हो !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे...



Tuesday, May 23, 2023

नवनीत एक्सप्रेस

नवनीत एक्सप्रेस

सकाळी पाच वाजता घरून राईड सुरू झाली... पहाटेच्या कुंद वातावरणात भराभर मुलुंडपर्यंत जाऊन परत यायचे होते... आज साथीला होता ताज्या दमाचा गडी नवनीत वरळीकर... बरोब्बर सव्वा पाच वाजता दादर सर्कल जवळ त्याची भेट झाली... आणि मग सुरू झाली... भन्नाट रायडिंग...


कोटीच्या कोटी उड्डाणे... झेपावे उत्तरेकडे... या मारुती स्तोत्रातील उक्ती प्रमाणे... नवनीतच्या अंगात वारा संचारला होता... शक्यतो फ्लाय ओव्हर टाळत जोरदार आणि जोमदार राईड सुरू झाली... हवेतील आद्रतेमुळे शेवटाचे दोन फ्लाय ओव्हर चढताना अंगातून घाम टपटपू लागला...  पण उतरताना वार्‍याच्या झुळका भरपाई करून द्यायच्या... घाम गारवा देत देत सुकतो आहे... हे कळत होतं...

तासाभरात मुलुंड गाठले... नेहमीच्या पॉइंट वरील बेंच काढून टाकल्या मुळे... फुटपाथवर फतकल मारली... घरापासून पंचवीस किमी राईड झाली होती... ती सुद्धा तेवीस किमी वेगाने...

नवनीत आज प्रचंड जोशात होता... म्हणाला "निघूया आपण"   पाच मिनिटे विश्रांती घेऊन हायड्रेट होऊन परतीचा प्रवास करणे आवश्यक होते... घामामुळे आणि तोंडातून बाहेर पडणार्‍या वाफेमुळे शरीरात झालेल्या पाण्याची कमतरता भरपूर पाणी पिऊन भरून काढली... सोबत आणलेल्या खजूरांचा नवनीत सोबत आस्वाद घेतला...

"ऐरोली जंक्शन पार करतानाच हेड विंड सुरू झाली... त्यामुळे वेग कमी झाला... अशा वेळी अँरो डायनॅमिक पोझिशन घेऊन... .. हवेचा विरोध कापत वेगात पुढे जाता येते... हेच टेक्निक पंढरपुर वारीत परतीच्या राईड मध्ये अवलंबावे लागणार आहे...

चेंबूर फ्लायओव्हर खालून जाताना... जोरदार हाक ऐकू आली... तशी सायकल वळवली... समोर आयर्न मॅन दिपक निचित ठाकला... नव्या लूक मधील हसतमुख दिपकला पाहिलं आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला... दिपक सोबत मुंबई कन्याकुमारी आणि मुंबई दिल्ली सायकल राईड विक्रमी दिवसात  पूर्ण केली होती...

इतक्यात फ्लाय ओव्हर वरुन आणखी एक आरोळी कानावर पडली... जुना साथीदार ब्रिजेशची भेट झाली... सदाबहार ब्रिजेश बरोबर मनाली लेह राईड केली होती... तसेच नुकतीच हिल्स इन गोवा ही सायकल राईड केली होती... नवीन राईडचे  प्लॅन शेअर झाले... सप्टेंबर महिन्यातील हिमालयन सायकलिंग साठी ब्रिजेशने ताबडतोब होकार दिला... "हिमालयन सायकलिंग हा ब्रिजेशचा वीक पॉईंट आहे" 

 नवनीतची दोन प्रतिभाशाली रायडर बरोबर ओळख झाली... हेच आजच्या ५०  किमी फ्लाइंग राईडचे फलित होते...

मंगल हो !!!

सतीश जाधव 
मुक्त पाखरे... 

Thursday, May 11, 2023

सायकलिस्ट अमित मोने... अजब रसायन आणि माहीतीचा धबधबा...

सायकलिस्ट अमित मोने... अजब रसायन आणि माहीतीचा धबधबा...

आज परममित्र अमित मोनेच्या घरी सायकलसह भेट देण्याचा योग आला... ठाकूरद्वारच्या हमरस्त्यावर असणाऱ्या अनंतया अपार्टमेंटच्या बाराव्या मजल्यावरील घरातून दिसणारा सागराचा गोलाकार नजारा पाहताना डोळ्याचे पारणे फिटले... समुद्रावरून येणाऱ्या  आणि घरात खेळणाऱ्या वाऱ्यावर तरंगत...  मनचक्षू... सागराच्या एका किनारच्या कफ परेड वरुन दुसर्‍या किनारी असणाऱ्या राजभवनच्या गर्द हिरवाई मधून मस्त मजेत फिरून आले...

कुसुमाग्रजांच्या कवितेच्या चार ओळी अलगद ओठावर आल्या... 

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनार्‍याकडे
मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्‍यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

हसतमुख मेधाने (पत्नी) सुहास्य स्वागत केले... आणि मग अमितच्या गप्पांचा धबधबा प्रचंड वेगाने वाहू लागला... अभ्यासू वृत्तीच्या अमितला कोणत्याही विषयाचे वावगे नव्हते... त्याच्याकडे असलेला टुरींग सायकलिंगचा प्रचंड अनुभव शेअर करताना... प्रकर्षाने जाणीव झाली की त्या अनुभवांच्या आठवणींमध्ये अमित मनःपूर्वक रममाण झाला होता... स्तिमित होऊन सर्व ऐकत असतानाच मेधाने फक्कड चहा आणून दिला... पाठोपाठ खुसखुशीत कांदा पोहे सुद्धा आले... 

घरात फिरणाऱ्या समुद्री वाऱ्यासोबत घरातील खेळीमेळीचं वातावरण एकदम भावलं... दहावीच्या परीक्षेच्या ताणातून मुक्त झालेली मुलगी ईशा एकदम रिलॅक्स झाली होती... व्हेकेशनमध्ये MSCIT आणि विपश्यना टिन एजर कोर्स ती सहज पूर्ण करणार आहे... 

मनपा शाळेतून सत्तावीस वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेली आई व्हरांड्यात शतपावली करत होती... आईसाठी घरात अलेक्सा आहे... आई एकटी घरी असताना... अमित जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही असला तरी अलेक्सा  ताईच्या माध्यमातून आईशी बोलू शकतो... संपर्क करु शकतो... टेक्नोलॉजीचा वापर करून वडीलधाऱ्या मंडळींचे जीवन सुसह्य करण्याचा जबरदस्त फंडा अमितने अप्रतिम पद्धतीने घरात वापराला होता... त्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे घरात पोछा आणि साफसफाई करणारा गोल रोबोटिक  यांत्रिक झाडू... ज्याच्यामुळे घरातील प्रत्येक खोली बिनबोभाटपणे कचरामुक्त झाली होती...

अमितने अगत्याने सर्व घर दाखवले... घरात केलेल्या करामती, गमतीजमती, बारीक सारीक फंडे सांगताना, दाखवताना त्याला बाबांची आठवण झाली... खिळा न ठोकता लावलेले कॅलेंडर, टाचण्या सेफ्टीपिन सुरक्षित ठेवण्यासाठी लोहचुंबकांचा वापर, कमी वॅटचा रिमोट पंखा, आरशात असलेली LED लाईट्स... ब्लूटूथ की पॅड... यातून अमितकडे असलेली प्रचंड कल्पकता जाणवत होती... 

विपश्यनेचा विषय निघाताच... मेधा एकदम सुखावली... तिच्या मैत्रिणींनी विपश्यना केली असल्यामुळे मेधाच्या मानत विपश्यना करण्याची इच्छा उफाळून आली... शाळेतील शिक्षकांना विपश्यनेसाठी प्राधान्यक्रम असतो हे सांगितल्यावर लवकरच मेधा मुलगी ईशा बरोबर विपश्यना करणार आहे.. 

 घराचा निरोप घेताना ईशाने एक सुंदरशी लाकडी घंटा भेट दिली... सायकल सखीच्या गळ्यात ती घंटा बांधताच... सखी सुखावली... 

८५ वर्षाच्या आईची मायेने काळजी घेणाऱ्या या संपूर्ण कुटुंबाने मनात एक आदराचे स्थान पटकावले आहे... 

मंगल हो 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे... 

Wednesday, April 19, 2023

मनपा गुरू डोंगरे साहेबांची भेट आणि सायकल निष्ठांची मांदियाळी

मनपा गुरू डोंगरे साहेबांची भेट आणि सायकल निष्ठांची मांदियाळी

 ठरविल्याप्रमाणे सायकल वरुन एका दमात कुंभार्ली घाट पादाक्रांत करून काल चिपळुणातून मुंबईकडे प्रस्थान केले...

वाटेत  महापालिका जल विभागाचे माझे गुरु श्री डोंगरे साहेब यांचा फोन आला... त्यांनी आठवण काढली होती... त्यांना सांगितले सायकलिंग करत उद्या सकाळी तुमच्या घरी येतो... मग निवांत गप्पा मारुया...

आज सकाळची सायकल रपेट सुरू झाली... वांद्रे लिंकींग रोड वरुन राईड करत असताना... एक सरदार सायकलिस्ट पापाजी ओव्हरटेक करून पुढे गेला... "एकसे भले दो" या नात्याने छोटी स्प्रिंट मारून पापाजीला गाठले... गप्पा सुरू झाल्या...

 अंगात घातलेल्या टीशर्ट बद्दल पापाजीने विचारले... एकट्याने, सेल्फ सपोर्ट "आदी कैलाश ओम पर्वत" सायकल वारी केल्याबद्दल तसेच सायकल वरुन भारत भ्रमंती बद्दल कळल्यावर... जुहू जवळ थांबवून आपल्या सर्व सायकलिस्ट मित्रांना बोलावले... सायकल भ्रमंतीचे काही किस्से सांगितल्यावर सर्व मित्रांच्या मनात सायकल टूरींग बद्दल जिज्ञासा निर्माण झाली ...   दहा मिनिटापूर्वी भेटलेले सर्व सायकलिस्ट माझे जिगरी दोस्त झाले होते... सरदारजी अंबरीर सिंग यानी फोन नंबर शेअर केला... तर सायकलिस्ट पटेल यानी MTB घेण्याचे नक्की केले... पुन्हा भेटण्याचे ठरवून सर्व मित्रांची रजा घेतली...

आता सुरू झाली राईड... अंधेरी चारबंगल्या जवळील डोंगरे साहेबांच्या घराकडे... बरोबर सकाळी आठ वाजता साहेबांच्या घरात आलो... झक्कास चहाने कडक स्वागत झाले आणि सुरू झाली गप्पांची मैफल... लडाख सायकल सफर... नर्मदा सायकल परिक्रमा... स्पिती व्हॅली सायकल वारी... मुंबई कन्याकुमारी... मुंबई दिल्ली... पंढरपुर पंजाब ईत्यादी सायकलिंगच्या सुरस कथांचा ओघ सुरू झाला...

लता वहिनी नर्मदा सायकल वारीच्या गोष्टी तल्लीन होऊन ऐकत होत्या... त्यांच्या मनात बसने नर्मदा परिक्रमा करण्याचे विचार घोळू लागले...

 "आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केले... आता स्वतःसाठी जगता आले पाहिजे"  हे म्हणणे वहिनींना तंतोतंत पटले... तसेच सायकलिंग करण्यासाठी डोंगरेना आडकाठी करणार्‍या वहिनी... त्यांनी सायकल घ्यावी यासाठी  तयार झाल्या... ओघाओघाने खुप दिवस सायकलसाठी मागे लागलेल्या नातू अथर्वला सुद्धा सायकल घेण्याचे नक्की झाले... 

सायकलिंगद्वारे करत असलेली निसर्ग भ्रमंती... खुप मोठ्या लोकांशी होणार्‍या भेटीगाठी... नितांत सुंदर आणि जीवनात आमूलाग्र बदल घडविणारे अनुभव...   सूनबाई अदिती आणि आजी शांताबाई मनःपूर्वक ऐकत होत्या... मुलगा नीलेशचे वर्क फ्रॉम होम चालू होते... त्याच्याशी सुद्धा बोलणे झाले...

आज एका सुखी आणि समाधानी कुटुंबाच्या संपर्कात आलो होतो... सायकलिंगचे आणि निसर्ग भ्रमंतीचे स्फुलिंग सर्व कुटुंबाच्या मनात रुजवीले होते... याचा खुप आनंद होत होता...

 ८६ वर्षाच्या डोंगरेंच्या सासू... आजी शांताबाईंच्या चेहर्‍यावरील सकारात्मक सुहास्य भाव एकदम भावले... त्यांना म्हणालो "तुमच्या शंभरीला फोटो काढायला येणार आहे... तसेच माझ्या शंभरीला तुम्ही आवर्जून यायचे आहे" या बोलण्यावर आजी खळखळून हसल्या... अजूनही खडानखडा वर्तमानपत्र वाचणार्‍यां आजींनी... ईमारतीच्या पटांगणात चालायला जाण्याचे कबूल केले...

हे सर्व कामकाज चालू असताना; मस्तपैकी चटपटीत पावभाजीवर ताव मारला... गप्पांच्या ओघात अदितीच्या फक्कड चहाची चव सुद्धा चाखली... आणखी एक पाव घेऊन... चहात बुडवून पाव खाल्ला... आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला...

 गप्पांमध्ये दोन तास कसे गेले कळलेच नाही... सर्वांचा निरोप घेऊन ईमारतीखाली उतरलो... ७८ वर्षाच्या डोंगरेंनी भन्नाट सायकलिंग केले... त्यांच्या चेहर्‍यावरचा सुखद भाव... आनंदी जीवनासाठी अनमोल ठेवा सापडल्याचे सांगत होते...

अदिती म्हणाली, "काका खुप खुप धन्यवाद... सर्व कुटुंबाला नवसंजीवनी दिल्याबद्दल" 

सर्वांचा निरोप घेऊन आनंद लहरीवर तरंगत अंधेरीच्या सोसायटीमध्ये गेलो...  पान दुकान चालविणारा भाडेकरू प्रमोद ऊर्फ छोटूला  भेटलो... बोरिवलीच्या एका पान दुकानात बरीच वर्ष काम करणार्‍या छोटूने दुकान भाड्याने घेऊन आलिशान पानाचे दुकान थाटले आहे... 

 मेहनतीने आणि सचोटीने काम करणार्‍या छोटूचा भविष्यकाळ अतिशय उज्वल आहे... याची जाणीव त्याच्याशी बोलताना जाणवली... एकदम कलात्मक पद्धतीने सजवलेले दोन मीठा पान छोटूने घरच्यांसाठी बांधुन दिले... नवीनच दुकान थाटलेल्या छोटूला शगून म्हणुन पैसे दिले... छोटूला सुद्धा पानाची डिलीव्हरी करायला सायकल हवी आहे... 

आज सकाळची विविध रंगांनी नटलेली ४८ किमीची सायकल राईड... क्वालिटी टाईमचे प्रतिक होती...  डोंगरे साहेबांच्या सर्व कुटुंबियांची भेट... नवीन सायकलिस्ट मित्रांची सोबत... आणि मोठा आवाका असलेला भाडेकरू छोटूची गाठ... ही माऊलीच्या उक्ती प्रमाणे प्रेमाच्या एका समान धाग्यात गुंफलेली मांदियाळीच होती... 

घराकडे परतताना आनंद चित्रपटातील डायलॉग आठवला... "बाबू मोशाय... जिंदगी बडी होनी चाहिये... लंबी नही".... त्याच धर्तीवर सायकल सखी हसली आणि तिच्या विचारांचे तरंग उमटले...

  "किती किलोमीटर सायकल चालवली... यापेक्षा किती लोकांना भेटलास... त्यांच्या मनात जगण्याचे... नवीन विचारांचे स्फुलिंग निर्माण केलेस... यालाच सुख म्हणतात ना !!! 

मंगल हो !!! 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे... 

Sunday, April 2, 2023

दौलत दादा कोंडकेंची... या कार्यक्रमाची अभिरुची संपन्न निवेदिका... व्यासंगी आणि मराठी भाषेच्या सौंदर्याची जाणकार... सूत्रसंचालिका गीता डांगे...

दौलत दादा कोंडकेंची... या कार्यक्रमाची अभिरुची संपन्न निवेदिका... व्यासंगी आणि मराठी भाषेच्या सौंदर्याची जाणकार... सूत्रसंचालिका गीता डांगे...

शाहीर दादा कोंडके यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्ताने मराठी भाषा पंधरवड्यात दौलत दादा कोंडकेंची हा युगुल गीतांचा बहारदार कार्यक्रम दिनांक १८ मार्च रोजी पार पडला. या कार्यक्रमाची संकल्पना, रचना आणि दिग्दर्शन मुंबई महापालिका कर्मचार्‍यांच्या सोगो संगीत संस्थेने केले होते. महापालिकेच्या आजीमाजी  ३२ गायक कलाकारांचा सहभाग या कार्यक्रमात होता. 

अतिशय अप्रतिम आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला... या कार्यक्रमामधील प्रत्येक युगुलगीत... कलाकार जोडीने सादर करताना दादा कोंडके आणि त्यांच्या चित्रपटातील नायिका यांचा पेहराव परिधान केल्यामुळे या कार्यक्रमाने एक वेगळीच उंची गाठली होती. 

या कार्यक्रमात प्रकर्षाने जाणवलेली आणि भावलेली एक गोष्ट म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन... 

सर्वसाधारणपणे गीतसंगीताच्या कार्यक्रमात प्रत्येक गाणे साडेतीन चार मिनिटांचे असते..  तसेच दोन गाण्यामध्ये  सूत्रसंचालकास  एक ते दीड मिनिटाची वेळ दिली जाते... परंतु  आजच्या या कार्यक्रमात सूत्रसंचालिकेने आयोजकांकडून दोन गाण्यामध्ये तीन मिनिटांचा वेळ मागून घेतला होता... सोगो आयोजकांनी पण ते मान्य केले होते... 

कार्यक्रम सुरू झाल्यावर दोन गाण्याच्या मधल्या वेळात सूत्रसंचालिकेने दादांचा जीवनपट उलगडायला सुरुवात केली... आणि जाणीव झाली की दादा कोंडकेंसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा जीवनपट इतक्या कमीवेळेत, अचूक अन् मोजक्या आणि आक्षेपविरहित शब्दांत मांडण्यासाठी  सूत्रसंचालिकेने प्रचंड अभ्यास केला आहे...

 युगुलगीताला साजेशा वाक्यरचनेतून गीतांबरोबरच, चित्रपटाचा अभ्यास... तसेच दादांचा जीवनपट उलगडून दाखविण्यासाठी सूत्रसंचालकाने भरपूर वाचन केलं आहे...  

अतिशय मार्मिक आणि दखलपात्र निवेदन करण्यासाठी भाषेवर तितकच प्रभुत्व असणं आवश्यक असते... ते पदोपदी निवेदिकेच्या शब्दांमधून जाणवत होते... त्यामुळे गाण्याबरोबरच दादांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकाधीक  बळावत होती.....

दादांचा जीवनपट उलगडून दाखविण्यासाठी सूत्रसंचालिकेने दादांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून गाण्याला अनुरूप आणि विषयाला साजेसे असे वेचक मुद्दे निवडून ते तारतम्यतेने आणि मनोवेधकपणे सादर केले होते... 

सूत्रसंचालिकेची जिज्ञासू वृत्ती आणि विषयाचा व्यासंग यामुळेच सूत्रसंचालनाची  कला अतिशय उत्तमपणे आत्मसात केल्याचे तिच्या निवेदनातून पदोपदी जाणवत होते...

 सूत्रसंचालिकेच्या या प्रशंसनीय कामगिरी मुळेच तिच्या कामाची दाखल घेऊन शाबासकी देण्यासाठी आणि दादांच्या चित्रपट जीवनासाठी हा पत्रप्रपंच आहे...

एकापाठोपाठ एक अशा सलग नऊ चित्रपटांचा रौप्य महोत्सव  साजरा करून गिनीज बूक मध्ये जागतिक विक्रमाची नोंद करणारे दादा... आपल्या विनोदाने सार्‍या महाराष्ट्राला हसवणारे दादा... आपल्या स्वतःच्या आयुष्यात कसे एकटा जीव सदाशिव होते... याचा प्रत्यय सर्व रसिक प्रेक्षकांना येत होता...

दादांनी आपल्या चित्रपटांतून तात्कालिक समाज आणि राजकारणातील  वैगुण्यांवर नेमके भाष्य केले होते...

द्व्यर्थी संवादफेकीचा बादशहा ...  विनोदाची मर्मभेदी जाण असणारा.. नेमक्या ठिकाणी पॉज घेऊन हशा घेणारा विनोदवीर... निर्माता... लेखक... दिग्दर्शक... गायक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले दादा वैयक्तिक जीवनात एकटा जीव सदाशिव होते...   याची जाणीव झाली... 

दादांच्या जीवनात घडलेला प्रत्येक प्रसंग अंतर्मुख करणारा होता... किंबहुना दादांची जीवन कहाणी ऐकताना हसू आणि आसू यांचे संमिश्र भाव  मनात येत होते... 

अतिशय भोळा भाबडा नायक... नायिकेला का भावतो... याचे समर्पक उत्तर प्रत्येक चित्रपटात आपल्याला मिळते... याच वैशिष्टयपूर्ण खासियतीमुळे ग्रामीण प्रेक्षकांबरोबर शहरी प्रेक्षकांना सुद्धा दादांचे चित्रपट पसंतीला उतरत.. 

त्यांच्या जीवन चरित्रपटातील ठळक वैशिष्ठ्यांचा आढावा सूत्रसंचालकाने प्रत्येक गाण्याच्या मध्ये घेतला होता... त्याची झलक खालील प्रमाणे... 

समाजातील  रुढी, परंपरा, बुवाबाजी यावर उपहासात्मक किंवा व्यंगात्मक चित्रण म्हणजे सटायर चित्रपटातून सादर करणे ह्यात दादांचा हातखंडा होता... त्यामुळे त्या काळातील प्रस्थापित बुवाबाबांचा रोष सुद्धा दादांनी ओढावून घेतला होता... 

शांताराम बापू आणि दादा कोंडके यांच्यातील चित्रपट शीतयुद्ध जगजाहीर होते... बापूंच्या असला नवरा नको ग बाई  या चित्रपटावर कडी म्हणून  ह्योच नवरा पाहिजे  ह्या  चित्रपटाचे नाव दादांनी जाहीर केले... त्यावेळी त्यांच्याकडे चित्रपटाचे कोणतेही कथानक सुद्धा नव्हते... पण प्रचंड जिगर मात्र होती... 

सेवादलाच्या सांस्कृतिक विभागात काम करताना सदानंद वर्दे, वसंत बापट, नाथ पै अशा नामवंत मंडळींच्या ओळखी झाल्या.. तसेच सेवादलाच्या कार्यक्रमात निळू फुले, राम नगरकर हे कलाकार दादा सोबत एकत्र आले... येथून त्यांची पथनाट्य कारकीर्द सुरू झाली... 

विच्छा मधील दादांचे काम पाहून चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांनी तांबडी माती या चित्रपटात दादांना काम दिले. हा चित्रपट अपयशी झाला. त्याचे खापर पत्रकारांनी दादांवर फोडले... परंतु पेंढारकरांनी ते अपयश आपल्या माथ्यावर घेतले आणि दादांना चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन वर्तमानपत्रात येणार्‍या बर्‍यावाईट बातम्यांकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला... 

वसंत सबनीस, दादा आणि भालजी यांनी सोंगाड्याचे पटकथा लेखन केले. या चित्रपटाचे   यश  तुझे असेल तर अपयश पूर्णतः माझे असेल आणि   हा चित्रपट अपयशी झाला तर संपूर्ण खर्च मी उचलेन असे भालजींनी दादाला आश्वासन दिले...  त्यामुळे साकार झाला दादांचा सोंगाड्या  चित्रपट... आणि तो तुफान यशस्वी झाला... शून्यातून विश्व निर्माण करण्याचे दादांचे प्रयत्न फळाला आले... विच्छा मधील माळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी आणि  काय ग सखू काय ग साखू ही दोन गाणी दादांनी सोंगाड्या मध्ये घेतली होती... 

चांगले कथानक असलेला  ये रे माझ्या मागल्या हा भालजींचा चित्रपट आपटला... त्यावर दादांनी रिमेक बनविला आली अंगावर...  हा चित्रपट सिल्वर ज्युबिली झाला. चांगल्या कथानकाबरोबर चित्रपटाचे शीर्षक आकर्षक आणि विनोदी असेल तर रसिक प्रेक्षक आपोआप खेचला जातो... याचे हे उत्तम उदाहरण आहे.. 

दादांचा सडेतोडपणा खालील प्रसंगात दिसतो...

 येऊ का घरात या चित्रपटात दादांनी उषा नाईक या अभिनेत्रीला नायिका म्हणुन घेतले होते... हसताना तिचा चेहरा रडवेला दिसतो... हे दादांच्या लक्षात आल्यावर... हसताना आपण कशा दिसतो याचे निरीक्षण करण्यास  तिला सांगितले... आणि नीट हसा असा सल्ला दिला... 

माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दादांच अतिशय सुंदर मैत्रीच नातं होत... बाळासाहेबांना कलेविषयी आणि कलाकारांबद्दल वाटणारा आदर... झटपट निर्णय घेण्याचा स्वभाव, स्पष्टवक्तेपणा यामुळे दादांना बाळासाहेबांबद्दल खूप आदर होता... दादांच्या चित्रपटातील एखादी गोष्ट आवडली नाही की बाळासाहेब ती परखडपणे सांगत... त्यामुळे दादा आपला चित्रपट सेन्सॉरला पाठविण्या अगोदर बाळासाहेबांना दाखवत असत... 

अनेक राजकारणी व्यक्तींसोबत सुद्धा दादांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते... तात्कालिक मुख्यमंत्री वसंत दादा पाटीलांच्या आग्रहाखातर पंतप्रधान इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमावर गंगाराम वीस कलमे हा चित्रपट दादांनी बनविला... पण चित्रपट प्रदर्शित होताना इंदिरा गांधीची राजवट जाऊन जनता दलाचे राज्य आले होते...

एकटा जीव सदाशिव मधील राणी नावाची बकरी दादां सोबत प्रसिद्ध पावली... तिला कॅडबरी खूप आवडायची... एका सीनमध्ये दादा वडिलांबरोबर जायला निघतात तेव्हा बकरी पळत येते आणि दादांचा सदरा धरते. राणीने सदरा पकडावा म्हणून दादांनी सदऱ्यात कॅडबरी लपविली होती... राणी बकरीच्या सदरा सीनला प्रेक्षक आवर्जून टाळ्या द्यायचे... या बकरीला दादांनी मरेपर्यंत सांभाळलं... 

चित्रपटातील नायिका  दादांसारख्या  बावळट, गबाळा, लांब नाडीवाली हाफपँट  घालणाऱ्या नायकावर का भाळते?  या बाबत पटकथाकार मुजूमदार यांच्याशी बराच खल व्हायचा... त्यामुळेच  प्रेक्षकांना पटेल असे कारण चित्रपटात असे... 

त्याकाळी रंगीत चित्रपट बनविण्यासाठी खुप खर्च यायचा... सकस कथानक, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, काटेकोर दिग्दर्शन तसेच गाणी आणि संगीत दमदार असेल तर कृष्णधवल चित्रपट सुद्धा पाहायला प्रेक्षक येतात... यावर दादांचा विश्वास होता... रंगीत चित्रपटापेक्षा कथानकात आणि कलाकाराच्या अभिनयात रंग असले की प्रेक्षकांना ते भावतात... असे दादा म्हणत... म्हणुनच पांडू हवालदार हा चित्रपट कृष्णधवल बनविला होता. 

दादांच्या बोट लावीन तेथे गुदगुल्या  या भरपुर हास्यमय पंचेस असलेल्या चित्रपटावर पत्रकारांनी कथा नसलेला चित्रपट अशी टीका केली होती... दादांचे म्हणणे होते की विनोदी चित्रपटात कथानक रंगवत नेले की पंचेस कमी होतात... त्यासाठी चार्ली चॅपलीनच्या चित्रपटाचे उदाहरण द्यायचे... 

सर्व लोकांना आपल्या द्व्यर्थी संवादाने खिळवून ठेवणारे दादा आपल्या कुटुंब सौख्याबाबत मात्र अपूर्णच राहिले... लग्नानंतर चौथ्या वर्षीच त्यांचा घटस्फोट झाला... त्यांचा पुतण्या विजय कोंडके यांनी  आर्थिक बाबीत दादांना अडचणीत आणले... विजय कोंडकेंच्या माहेरची साडी या चित्रपटाला तोडीस तोड असा  सासरचं धोतर हा चित्रपट दादांनी काढला... 

चित्रपटाच्या नावात द्व्यर्थी मिनींग नसलेला दादांचा सातवा चित्रपट बोट लावीन तिथ गुदगुल्या  हा होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर... पुण्यातील झाडून सर्व पत्रकारांनी दादांचा "सातवा मजला कोसळला" असं मोठ्या हेडिंग मध्ये वर्तमानपत्रात लिहिले होते... पण गुदगुल्या सुपरहिट झाला... पुण्याच्या एका चित्रपटगृहात तर तो पंच्याहत्तर आठवडे चालला... ह्या चित्रपटाच्या ज्युबिली समारंभात पत्रकारांना दादांनी आवर्जून बोलावले होते... आणि सांगितले "तुमच्या लिखाणाचा माझ्या चित्रपटावर काहीच परिणाम होत नाही"... "प्रेक्षक माझा आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे"... तुम्ही आणखी पेपर छापा... लहान मुलांना नक्कीच कामाला येतील... 

प्रत्येक माणसाने अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण केले तर यश आपोआपच येतं... दादांचे सुद्धा असंच होतं... त्यांचा कुठलाही गाजलेला चित्रपट काही काळानंतर त्यांनी पाहिल्यावर त्यांना वाटायच हा सीन जास्ती चांगला करू शकलो असतो... एखादा विनोदी प्रसंग थोड्या वेगळ्या पद्धतीने केला असता तर प्रेक्षकांचा आणखी हशा मिळवू शकलो असतो...  त्यामुळेच चित्रपट पूर्ण झाल्यावर सुद्धा नवनवे सीन दादा चित्रपटात टाकत असत.. 

शांताराम बापू आणि दादा यांच शीतयुद्ध असायचं... पिंजरा चित्रपटात बापूंनी दादांना खूप टोमणे मारले होते... त्यानंतर दादांनी एका चित्रपटात नायक गटारातून मोडका पिंजरा बाहेर घेऊन येताना दाखविला होता... 

परंतू दोघांना एकमेका बद्दल नितांत आदर होता... बापू दादांचे सर्व चित्रपट राजकमल स्टुडिओत प्रिंट मागवून पाहत असत... 

राजेश मुजूमदार आणि दादा पांडू हवालदार च्या निमित्ताने एकत्र आले. दादांनी एखादा पंच सांगितला की मुजुमदार पुढचा पंच तयार करायचे.. अशा प्रकारे कथानक तयार व्हायचे... 

राम कदम यांनी दादांच्या चित्रपटांना संगीत द्यायला नकार दिल्यावर... दादांना नव्या संगीतकाराची गरज होती...  एकॉर्डीयन प्लेअर लक्ष्मण पाटील आणि सुरेंद्र हेंद्रे यांनी कलातरंग ऑर्केस्ट्रा सुरू केला होता.. दादांनी त्यांना आपल्या काही गाण्यांना चाली करायला दिल्या... त्यांच्या चाली भावल्यामुळेच दादांनी त्यांना रामलक्ष्मण हे नाव दिले आणि पुढे रामलक्ष्मण यांनी दादांच्या चित्रपटांना संगीत दिले. 

*एकटा जीव* च्या यशानंतर शुल्लक कारणावरून दादांची जुनी टीम दादांना सोडून गेली... त्यामुळे  आंधळा मारतो डोळा या चित्रपटात दादा सोबत सर्व नवी मंडळी काम करत होती. हा सुद्धा चित्रपट ज्युबली झाला... याचे कारण म्हणजे दादा स्वतःच एक चित्रपट इंडस्ट्री होते... 

त्यांच्या चित्रपटात काम करण्याऱ्या नायिकांमुळे दादांना खुप अडचणींना सामोरे जावे लागले..  परंतु कितीही त्रास झाला, संकटे आली तरी दादा कधीच डगमगले नाहीत... 

 दादांचं सेन्सॉर बोर्डाशी असलेले हाडवैर जगजाहीर होतं.. सेन्सॉर बोर्डाने द्व्यर्थी संवादाबद्दल दादांना खूप त्रास दिला... पण दादा नमले नाहीत... ते आपला मुद्दा नेटाने मांडत... तुमच मन मलीन असल्यामुळे शब्दांचे अश्लील अर्थ तुम्ही लावता... पुढेपुढे तर सेन्सॉरशी वाद घालता यावा म्हणुन दादा मुद्दाम द्व्यर्थी संवाद टाकू लागले...
 
 दादा एक गोष्ट प्रांजळपणे मान्य करतात की सेन्सॉर बोर्डामुळे माझ्या चित्रपटांची खूप चर्चा व्हायची... त्यामुळेच चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळायची... म्हणूनच माझे चित्रपट तुफान चालल्याचे दादा कबूल करतात.... 

दादांना  शिकारीचा प्रचंड नाद होता... शिकारीसाठी जनावर शोधण्यात ते एव्हढे मग्न व्हायचे की सार जग विसरून जायचे... शिकारीला गेल्यावर ते खुप रिलॅक्स होत असत... त्यामुळे चित्रपटातील जास्तीत सीन, गाणी दादांनी जंगलात  लिहीली आहेत... 

शिकारीत असताना एखादा अचानक वळवाचा जोरदार पाऊस आला... म्हणुन सर्वजण एका झाडाखाली थांबले... पाऊस थांबल्यावर झाडातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांना पाहून तिथल्या तिथे एक गाणे तयार केले... ते म्हणजे अतिशय प्रसिद्ध झालेलं  ढगाला लागली कळ... पाणी थेंब थेंब गळ... हे गाण होय... दादांची कलासक्ती जंगलात बहरून यायची याचेच हे उदाहरण आहे... 

नववा ज्युबिली चित्रपट आली अंगावर  मुळे दादांचे खूप कौतुक झाले... सलग नऊ ज्युबिली चित्रपट म्हणुन जागतिक विक्रम झाला... पण दादांना आनंद वाटत नव्हता... त्यांनी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला... विच्छाच्या अफाट यशामुळे आता मिळणार्‍या यशाचे दादांना महत्त्व वाटत नव्हते... या मानसिक दोलायमान परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दादांनी खूप उपचार केले पण फारसा उपयोग झाला नाही... त्यांची निरीच्छ वृत्ती वाढत गेली... 

अमाप पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर, मानसन्मान मिळून सुद्धा दादा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात एकटा जीव  राहिले... 

पुढचा जन्म देवाकडे मागताना "मला पैसाअडका काहीही नको फक्त जिवाभावाची माणस दे" हेच दान मागितले... 

मित्रांनो... 

दादांचा हा सर्व जीवनपट उलगडून सांगितला सूत्रसंचालिका गीता डांगे यांनी... दादांचे आत्मचरित्र एकटा जीव सदाशिव तसेच इतर लेखकांनी सांगितलेल्या माहितीचे समग्र रसग्रहण करून गीता ताईंनी मेहनतीने संकलित केलेली माहिती रसिक प्रेक्षकांना  सादर केली... त्याबद्दल निवेदिकेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. 

खरं तर गीता ताईंनी लिहिलेलं दादांच्या जीवन चरित्राचे रसग्रहण कोणत्याही वर्तमानपत्रात दादांच्या आत्मचरित्राची समीक्षा म्हणुन सुद्धा प्रसिद्ध करता येईल... 

दादांचा माहितीपट उलगडताना गीता ताईंची संवादफेक, शब्दांतील चढउतार, देहबोली यातून दादा एकदम मनाला भिडले... त्यांच आत्मचरित्र वाचण्यासाठी मन अधीर झाले ... 

तसेच गीता ताईंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सुद्धा सविस्तर  मनोगत लिहावे ही उर्मी जागृत झाली... 

मंगल हो !!! 

सतीश जाधव 
9869560266

Thursday, February 23, 2023

सन्मान... एका छंदाचा...

सन्मान...  एका छंदाचा... 

माझ्या कार्यालयीन सहकारी सोनाली जोशींना नुकतीच प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली...

आपली माणसं जेव्हा वरीष्ठ पदावर पोहोचतात तेव्हा खुप आनंद होतो... आणि हाच आनंद साजरा करण्यासाठी जोशी बाईंना भेटायला मुलुंडस्थित महापालिकेच्या टी विभाग कार्यालयातील जल विभागात गेलो होतो...

आधी सांगितले असल्यामुळे जोशी बाई आतुरतेने वाट पाहत होत्या... बाईंची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी मंगल आशिर्वाद दिले...

  जल विभागातील सहाय्यक अभियंता श्री बोरसे साहेब यांची भेट झाली... त्यांनी रक्तदानाच्या आणि  सायकलिंग क्षेत्रातील माझ्या भरीव कामगिरी बाबत जल विभागातर्फे सन्मान सोहळा आयोजित केला होता.. हे तर माझ्यासाठी अनपेक्षित  होते... परंतु सर्व कार्यालयीन कर्मचारी, अधिकार्‍यांशी सुसंवाद करायला मिळणार म्हणुन आनंद झाला होता...

जोशी बाईंनी सर्वांना माझा परिचय करुन दिला... आता पर्यंत केलेले ११२ वेळा रक्तदान तसेच सायकलिंग करत एकट्याने आदि कैलास आणि ॐ पर्वत पादाक्रांत करून केलेल्या जागतिक विक्रमाची ओळख करून दिली... आणि कार्यालयातर्फे सुंदर भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ श्री बोरसे साहेबांच्या हस्ते देऊन सन्मान केला... 

श्री बोरसे साहेबानी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज आम्हा सर्वांना जाधवांनां ऐकायचे आहे... सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जपलेले छंद... याची ओळख करुन घ्यायची आहे... फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने जल देयकांच्या डिमांड रिकव्हरी साठी अतिशय निर्णायक आणि संवेदनाक्षम असतात... या दिवसात येणार्‍या ताणतणावाच्या वातावरणात  श्री जाधवांनां ऐकणे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असेल...

सर्वांशी सुसंवाद साधताना सांगितले की, मनपा मध्ये सेवा करत असताना कार्यबाहुल्यामुळे सतत ताणतणावाला सामोरे जावे लागते... आपल्या छंदांना मुरड घालावी लागते... तसेच आपल्या प्रकृतीकडे सुद्धा दुर्लक्ष होते... 

म्हणुनच  उत्स्फुर्तपणे जीवन जगायचे असेल आणि सतत नवचैतन्यमय राहायचे असेल तर आपले छंद जपा-जोपासा... वेळ काढून भ्रमंती करा... नवनवीन मित्र जोडा... 

"चरैवेती". म्हणजे संधी मिळेल तेव्हा भटकणे हे सतत उर्जावान ठेवण्याचे जीवनाचे सूत्र आहे... या फिरण्याच्या वेडापायीच सेवानिवृत्त झाल्यावर सायकलिंगला सुरुवात केली... आतापर्यंत भारत भ्रमंती करत बेचाळीस हजार किमी सायकलिंग केली आहे... तसेच एक जागतिक विक्रम नावावर आहे... या सायकलिंग मुळेच मित्र परिवार प्रचंड वाढला आहे तर मोठ्या मोठ्या लोकांच्या गाठी भेटी झाल्या आहेत... सायकलिंगमुळे भारताच्या विविध प्रांतातील लोकांचे जनजीवन अतिशय जवळून पाहता आले... लडाख सारख्या ठिकाणी  बर्फवृष्टीमुळे आठ महिने दळणवळण बंद असते... अशा ठिकाणी राहणार्‍या जनतेचे खडतर जीवन अनुभवता आले... त्यामुळेच  जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय विशाल झाला... कोणत्याही ताणतणावात न अडकता... आलेली कठीण परिस्थिती संधी म्हणुन स्वीकारत गेलो आणि एखाद्या झर्‍यासारखे  प्रवाही राहीलो... झाडासारखे दातृत्व स्वीकारले...

निसर्ग आपला सर्वात मोठा गुरु आहे... आपण जेव्हा मोटरसायकल, कार, रेल्वे ईत्यादीने फिरतो तेव्हा ग्रंथाची पान फडफडल्या सारखा निसर्ग पाहतो... परंतु सायकलने आपण निसर्गाच्या खूप जवळ जातो... त्यात रमतो आणि आपणच निसर्ग होऊन जातो... 

आपण समाजाचा एक घटक आहोत याची जाणीव होते आणि लोककल्याणासाठी आपले उत्तरदायित्व आहे हे ध्यानात येते... निरपेक्ष वृत्तीने समाजोन्नत्ती करण्यासाठी प्रेरित होतो...

 याचाच भाग म्हणून प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन भारत भ्रमंती चालू आहे... नर्मदा परिक्रमा करताना "नर्मदा स्वच्छता अभियान राबविले होते... लडाख मध्ये" प्रिजर्व लडाख... Don't liter Save Water" ही संकल्पना घेऊन फिरलो... तर स्पिती व्हॅली मध्ये "एक बुटा (झाडाचं रोपटं) बेटी के नाम" याचा प्राचार केला... 

सायकलिंग आपले प्रकृती स्वास्थ्य झकास तर ठेवतेच आणि ते एक प्रकारे मेडिटेशन सुद्धा आहे... त्यामुळे मनस्वास्थ्य सुद्धा उत्तम राहते... 

विद्यार्थ्यांना-तरुणांना सायकलिंग साठी उद्युक्त करणे आणि मोबाईल संस्कृती कडून निसर्ग संस्कृतीकडे वळविणे... हा उपक्रम सुरू आहे...
भारत भर सायकल संस्कृती वाढविणे आणि सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे हा प्रकल्प हाती घेतला आहे आणि त्यासाठी परमेश्वराकडून शंभर वर्षाचे आयुष्य मागून घेतले आहे... 

आपल्या उर्वरित काळात "पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा प्रकृती कशी आहे याचीच चौकशी केली जाते... या साठीच तुमच्या आवडीचे छंद जोपासा... तसेच सायकल चालवा... आणि हिट रहा फिट रहा... 

या सुसंवादामुळे बर्‍याच कर्मचारी अधिकारी यांनी माझा मोबाईल नंबर घेतला... 

शेवटी सर्वांना एकच सांगणे आहे... छंद जोपासा... हसत रहा... फिरत रहा... हीच जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे... 

मंगल हो !!! 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे 
९८६९५७०२६६