Thursday, November 30, 2023

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले....


टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले...

पारीजातक किंवा प्राजक्त... अतिशय नाजूक आणि आवडीचे फुल... मस्त सुगंध दरवळतोय वेचलेल्या हातामध्ये...

प्राजक्ताचे फुल इतके नाजुक की हळुवार स्पर्शानेही कोमेजून जाणारे... 

उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणुनच  रात्री उमलणारे.... 

आज पहाटे फुलांनी बहरलेला प्राजक्त पाहिला...

हिरवळीवर पडलेला सडा...

जसा काही आकाशात  प्रकट झालेल्या असंख्य तारकांच...

पांढर्‍याशुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ...  निसर्गाचा हा नाजुक अविष्कार...

एखाद्या सुंदर आणि मादक ललने सारखा...

प्राजक्त पाहिला की अलगद आठवतात त्या व. पु. काळे यांच्या ओळी...

पारीजातकाचं  क्षणभंगुर आयुष्य लाभलं तरी चालेल...

पण लयलुट करायाची ती सुगंधाचीच...

मंगेश पाडगावकरांची कविता तर हृदयातील अनमोल ठेवा आहे...

टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले 

भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली ऊन-सावली विणते जाळी...

येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

दुर दुर हे सूर वाहती उन्हात पिवळया पाहा नाहती...

हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा... गाणे अमुचे लुक-लुक तारा...

पाऊस, वारा, मोरिपसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुलारे... सुरात मिसळुनि सुर चलारे... 

गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

तसेच सुवर्णतुला संगीत नाटकातील विद्याधर गोखले यांचे  पद आठवले...

अंगणी पारिजात फुलला ।

बहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला ॥

धुंद मधुर हा गंध पसरला

गमले मजला मुकुंद हसला

सहवासातुर मदिय मनाचा कणकण मोहरला ॥

सुनिताबाईंच्या "आहे मनोहर तरीही"  ग्रंथामधला प्रसंग आठवला...

पहाटे  सुनिताबाई प्राजक्ताची  फुले वेचत असताना पु.ल. नीं हळूच झाड हलविले आणि सुनिताबाईंवर प्राजक्ताचा वर्षाव झाला... 

प्रेमाला वय नसतं... हेच प्राजक्त सांगतो...

त्यामुळे बालपणीचा काळ आठवला आणि जुन्या मधुर आठवणी चाळवल्या...

माझा बालमित्र... सकाळी प्राजक्त वेचुन घरी आणताना हाताच्या उष्णतेने कोमेजतात... म्हणुन ही फुले आणण्यासाठी ओला रुमाल अंगणात घेऊन जायचा...आणि घरात आणल्यावर घंगाळ्यात पाणी घालुन त्यावर  प्राजक्त तरंगत ठेवायचा... त्यामुळे संपूर्ण दिवसभर प्राजक्ताचा मंद दरवळ घरात असायचा...

त्यामुळे नेहमी वाटायचे जिण असावं तर प्राजक्ता सारखं...

या संदर्भात आनंद चित्रपटातील डायलॉग आठवला...

बाबू मोषाय... जिंदगी बडी होनी चाहिए... लंबी नाही...

किती जगलास यापेक्षा कसा जगालास हेच महत्त्वाचे आहे...

प्राजक्तांच्या फूलाबाबत फार सुंदर कथा आहे...

 रुपनगरच्या राजकन्येचं सुर्यावर निरतिशय प्रेम होत... लग्नाच्या दिवशी सुर्यदेव मांडवात येत नाहीत...म्हणुन राजकन्या रुसून... रागावुन... धगधगत्या होमकुंडात स्वतःला झोकुन देते... 

तेथे प्रकट होते प्राजक्ताचे रोपटे...

सुर्यदेवावर राग म्हणुन हे प्राजक्ताचे फुल दिवसा फुलत नाही...

दिवस उजाडला आणि सूर्य देव आसमंतात वर येऊ लागला की प्राजक्त  कोमेजून जाते... 

परंतु पहाटेचा मंद सुगंधीत दरवळ तिच्या निस्सीम प्रेमाची साक्ष देतं राहते...

लहानपणी आजीच्या गावाला गेल्यावर  प्राजक्ताच्या फुलांच्या माळा हातात घालून लपंडाव खेळायचो... 

प्राजक्ताचे केशरी देठ चुरडले की सुगंधित केशरी रंगाने हात गंधित व्हायचे...

फुलांचा पाऊस पहायचा असेल तर पहाटे प्राजक्ताचं झाड हळुवार हलवायचं आणि त्या सड्यात न्हाऊन जायचं...

श्री कृष्ण आणि सत्यभामेची कथा सुद्धा प्रसिद्ध आहे...

श्री कृष्ण हे झाड स्वर्गातून पट्टराणी रुक्मिणीसाठी आणत असताना... वाटेत सत्यभामेन हट्ट धरला... प्राजक्त माझ्या अंगणातच लावायचा... तिच्या हट्टाखातर श्री कृष्णाने तिच्या अंगणात प्राजक्त लावला... 

रुक्मिणी रुसली... श्री कृष्ण हसला आणि म्हणाला... उद्या सकाळी माझ्याबरोबर अंगणात ये... प्राजक्ताचा सर्व सडा रुक्मिणीच्या अंगणात पडलेला होता... 

शाळेत मंदारमाला वृत्त शिकविताना गुरुजींनी वरील कथा सांगितली होती... या वृत्तात बावीस अक्षरे असतात.. तसेच त्याचे उदाहरण अजूनही लक्षात आहे...

मंदारमाला रमालाच लाभे उभा वृक्ष तो सत्यभामांगणी

पहाटेच्या प्राजक्ताने आठणींचा खजिना उघडला...  सर्वांना भरभरून वाटण्यासाठीच...

मंगल हो... !!!



Tuesday, November 28, 2023

१७.११.२३... आगरतळा सायकल सफर... दुसरा दिवस

१७.११.२३...  आगरतळा सायकल सफर...

आगरतळा येथे रात्रभर पाऊस पडत होता... रात्री गारठा वाढला होता... पूर्वेकडच्या प्रांतात पहाटेच उजाडते... ब्रम्हमुहूर्तावर श्री  जगन्नाथाची काकड आरती सुरु झाली...  प्रातर्विधी आटपून ध्यानधारणा झाली... परमेश्वराचे दर्शन घेऊन जाकीट कानटोपी आणि रेनकोट घालून चौकात चहा प्यायला गेलो... पाऊस सुरूच होता...

चहाची नवीन रेसिपी पहायला मिळाली... चहाची पावडर पाण्यात उकळवून घेतली होती. एका ग्लासात दोन चमचे दुधाची पावडर आणि एक चमचा साखर घेऊन त्यात उकळते चहाचे पाणी ओतले... आणि चमच्याने मस्त घुसळले... झाली फक्कड चहा तयार... काही जण काळी चहा पीत होते...

सात वाजता देबाशिश मुजुमदार भेटायला येणार होता...  देबाशिशचा फोन आला... सतत पाऊस सतत पडत असल्याने त्याचे भेटणे पुढे गेले होते.  नंदूची सायकल असेंबल करायची होती. प्रथम प्लॅस्टिक रॅपर फाडून काढले... टॅग कापून सायकलचे  सर्व भाग सुटे केले. छोटा बटू गोविंद वल्लभदास सायकल जोडायला मदत करत होता...

त्यानंतर हक्काने माझ्या मोबाईलवर सुपर सॉनिक कार्टून पाहत होता...

पाऊस पडत असल्यामुळे बाहेर जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मंदिरातच न्याहरी करायचे ठरविले... न्याहारीला गरमागरम डाळखिचडी मिळाली... पातळ खिचडी बोटांनी खाणे आणि ती अंगावर न सांडणे याला वेगळे कसब लागते... बाजूला बसलेल्या बाबूजीचे खिचडी खाणे पाहिले आणि यातली मेख कळली. तो हाताच्या पंजाने पातळ खिचडी ओरपत होता... यासाठी सराव करावा लागणार होता... म्हणून तूर्तास कागदी पानच तोंडाला लावले आणि खिचडी पिऊन टाकली.. तूपातील खिचडीमूळे मन तृप्त झाले...

नंदुची सायकल जोडून तयार झाली. आता दोन्ही सायकल अप टू डेट झाल्या होत्या. ... लोकल साईट पहायच्या होत्या पण पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. आज संपूर्ण त्रिपुरा पावसात चिंब झाले होते. मंदिरात आलेल्या देवांश बरोबर ओळख झाली. 

त्रिपुरा मधील महत्त्वाच्या स्थळांची माहिती मिळाली... "जवळच असलेला उज्जयंता महाल आणि रविंद्र भवन आठवणीने पाहा" देवांश म्हणाला...

दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला... येथे सर्वजण भात खातात... जेवण वाढण्याची नवीन पद्धत कळली. भातावर प्रथम पालक वाटाण्याची सुकी भाजी आली. ती भाजी आणि भाताचे चार घास खाल्ले... मग वरण वाढले गेले... पण भातावर नाही तर पत्रावळीच्या एका बाजूला... थोडासा डाळ भात खाल्ल्यावर केळीची भजी आली.. मग आली मिक्स भाजी त्यात पनीर पण होते... मग आली फ्लॉवरची भाजी... त्यानंतर आंबटगोड पायसम आणि शेवटी खीर... सर्व जेवणात भात कॉमन होता... हवा तेवढा घ्या... प्रत्येक पदार्थ गरमागरम खाण्यासाठीच ही पद्धती असावी... जेवणाची ही पद्धती विलक्षण भासली... आणि भावली सुद्धा...

अखंड पडत असलेल्या पावसामुळे आज आराम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते...जोरदार थंड वारेसुद्धा वाहत होते... कानटोपी आणि जाकीट घालूनच मच्छरदाणीत  बसलो होतो...

सायंकाळी पुन्हा भोजन प्रसादीचा लाभ घेतला... जेवणासोबत गो मातेचे दूध मिळाले... सात्विक जेवण झाल्यावर सर्वांना फोन करण्याचा आनंद घेतला...

 परममित्र नवनीतला  फोन केला तेव्हा तो भरभरून सांगत होता...  रशिया वरून एक सायकलिस्ट सायकलिंग करत... मुंबईतील वरळी किल्ला पाहायला आला होता.  त्याला घरी घेऊन गेलो आणि त्याचा पाहुणचार केला...रशियन  ॲबीशी  आता जिगरी दोस्ती झाली आहे... या घटनेचा  झालेला आनंद नवनीतच्या बोलण्यातून ओसंडून वाहत होता...  

मित्र गजानन तर फोनवर तासातासाची खबर घेऊन... हवामान अंदाज आणि आवश्यक माहिती देत होता... मुंबईची बॅक अप टीम  त्रिपुराच्या महत्त्वाच्या बातम्या पुरवत होत्या...

आज सायकलिंग करायला मिळाले नाही म्हणून नंदू थोडा नाराज झाला होता...

आले देवाजीच्या मना... तेथे कोणाचे चालेना...

तुका म्हणे उगेचि राहा... होईल ते सहज पाहा...

शांत रहा... वृत्तीने स्थिर रहा... भगवंताच्या इच्छेने जे जे घडते ते साक्षी रूपाने पाहा.. निष्कारण अस्वस्थ होऊ नका... 

हेच त्या जगन्नाथाला सांगायचे होते काय...

*मंगल हो...*

१६.११.२०२३आगरतळा सायकल सफर...

१६.११.२०२३.   आगरतळा सायकल सफर... पहिला दिवस

पहाटे साडेतीन वाजता घरातून निघालो. लगेज सामान आणि पॅक केलेल्या दोन्ही सायकली ओलाच्या ईर्टीगा मध्ये सहज बसल्या...

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर तासाभरात पोहोचलो...
 

एअर इंडियाच्या विमानात गोणी पॅक केलेले सायकल लगेज कोणतेही अतिरिक्त भाडे न घेता स्वीकारले गेले. नाजूक सामान असल्याचा स्टिकर लावल्यामुळे  सायकल लगेज अतिशय काळजीपूर्वक हाताळले गेले...
 

विशेष म्हणजे कलकत्ता आणि आगरतळा दोन्ही ठिकाणी विमान नियोजित वेळेपूर्वी पंधरा मिनिटे लवकर पोहोचले... दोन्ही विमानात नाश्ता सुद्धा मिळाला... यातील हवाई सुंदरी चक्क मराठीत बोलत होत्या... एअर इंडियाने दिवाळीच्या मोठ्या दिवसात सुखद धक्के दिले होते...

 मुंबईतून निघून आगरतळाला अर्ध्या दिवसात  पोहोचलो होतो... हाच प्रवास रेल्वे अथवा रस्त्याने केला असता तर  चार दिवस लागले असते... आजचा आगरतळा पर्यंतचा विमान प्रवास अतिशय सुखकारक झाला.. 

मित्र गजाननमुळे आगरतळा येथील जगन्नाथ मंदिराच्या डॉर्मेटरीमध्ये राहायची व्यवस्था झाली... ती सुद्धा अतिशय माफक दरात... शेजारीच तलाव असल्यामुळे मच्छरांपासून बचावासाठी प्रत्येक पलंगाला मच्छरदाणी होती... नंदूच्या मदतीने सायकल असेंबल केली...  सायकल टकाटक करायला दोन तास लागले... दुपार पासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला होता... नंदू विश्रांतीसाठी पलंगावर आडवा झाला... 

थंड पाण्याने मस्त स्नान करून जगन्नाथाचे दर्शन घेतले... 

मंदिर परिसरात बरीच भाविक मंडळी विशेषतः महिला होत्या... सभागृहात श्री कृष्णाचे भजन कीर्तन सुरू होते... प्रवचनाचे एक आवर्तन झाले की सर्व महिला हू... लू... लू... लू... लू... असा आवाज एका सुरात काढत... जसे की श्री कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या गोपिकाच...

मंदिराबाहेरच कुल्हडवाली चहा मिळाली... 

गजाननचा मित्र देबाशिस मुजुमदार उद्या सकाळी भेटायला येणार आहे... उद्या आगरतळा शहर सायकलने फिरायचे आहे... महाराजा बीर बीक्रम यांचा महाल, म्युझियम, रवींद्रनाथ टागोर सभागृह, विधान भवन,  त्रिपुरा सुंदरी मातेचे देऊळ,  बंगला देश सीमा पहायची आहे...

तसेच रिमझिम पावसाचा आस्वाद घ्यायचा आहे..

उद्याची ही सराव राईड असेल... वातावरणाशी एकरूप होण्यासाठी...

मंगल हो... !!!

Monday, November 27, 2023

डोंबुर तलाव...

डोंबुर तलाव...

त्रिपुरा मधील सुप्रसिद्ध डोंबुर तलाव साऊथ कारबुक गावावरून २५ किमी अंतरावर आहे.  त्या ठिकाणी उत्तर बाजूने सायकलिंग करून जाणार होतो. परंतु सायकल ब्रेक डाऊन झाल्यामुळे रणजित मामाच्या ऑटोने जायचे नक्की झाले. रबरच्या शेतावरून आल्यावर फ्रेश होऊन ऑटोने जतनबारीकडे प्रस्थान केले. जतनबारी वरून मुख्य रस्ता सोडून नारीकेल कुंजच्या  घाट रस्त्याने सफर सुरू झाली... 

रस्त्याची कामे सुरू असल्यामुळे ऑफ रोडींग प्रवास होता. खडबड रस्त्यावरून ऑटोतून प्रवास करणे म्हणजे शरीराचा तंबोरा वाजविणे होते... परंतु घाटाच्या दरीतून वाहणारा पाण्याचा पाट... आणि चारही बाजूची हिरवीकंच वनराई... सफर सुसह्य करत होती... 

काही ठिकाणी चढावर रिक्षा थांबत होती... पण रणजित पट्टीचा ड्रायव्हर... आम्हाला गाडीच्या खाली न उतरवता... अशी काही रिक्षा एक्सलरेट करायचा की रिक्षा चटकन चढ चढत असे...  डोंबुर वॉटर फॉल ओलांडून तीर्थमुखला पोहोचलो.

येथे गोमती नदीने असा काही गोलाकार वळसा घेतला आहे की ते  वळण डोळ्याचे पारणे फेडतो...

येथे कालीमातेचे मंदिर आहे. मकर संक्रांतीला येथे मोठी यात्रा असते... त्यासाठीच मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदी करणाचे काम सुरू होते. तेथून पाच किमी वरील मंदिर घाट गावात पोहोचलो...

येथून डोंबूर तलावातील नारिकेल कुंज आयलंडवर जाण्यासाठी बोट केली... आमच्या बरोबर पंजाबचे पाच जण होते... त्यामुळे बोटीचे भाडे सात जणात समान वाटल्यामुळे प्रत्येकी चारशे रुपयांमध्ये आमची डोंबुर तलावाची राईड सुरू झाली... 

झाडाझुडुपातील तलावाच्या ओहळातून नाव पुढे सरकत होती... जणूकाही नाव पाण्याबरोबर लपंडाव करत होती... वीस मिनिटांनी नाव विस्तीर्ण तलावात आली... आणि डोळ्याचे पारणे फिटले...

उंच डोंगरामध्ये विस्तीर्ण पसरलेला तलाव आणि आजूबाजूच्या किनाऱ्यावरील झुडपात लपलेली झावळ्यावाली आदिवासी घरे पाहून...

बालकवींच्या "त्या तिथे पलिकडे" कवितेच्या ओळी मनपटलावर तरळून गेल्या... आकाशाच्या क्षितिजावर  लांबवर पसरलेला  हिरवागार किनारा तलावाच्या पाण्यात प्रतिबिंबीत होत होता... बोटीमुळे उठणाऱ्या पाण्याच्या लहरींमुळे  त्या प्रतिमा लयबध्द डोलत होत्या...

एक टक निसर्गाच्या या रंगांचे अवलोकन करत होतो... त्यामुळे पाण्यावरून बोटीशिवाय मीच तरंगत पुढे सरकत असल्याचा भास होत होता... नभाच्या निळाईत बोटीच्या एका टोकावर काढलेला फोटो... "किती घेशील दोन्ही करांनी... देणाऱ्याचे हात हजार... याची जाणीव करून देत होते...

हा आनंदाचा बहर... माझ्या दुबळ्या झोळीतून ओसंडून वाहत होता...

तर नंदूचा आनंद त्याच्या स्मित हास्यातून परावर्तित होत होता...त्या आनंदाला दोन्ही हातांनी गच्च पकडण्याचे नंदुचे प्रयत्न थिटे पडत होते...

पाच पंजाबी पोरांचे बोटीत वेगवेगळ्या अँगलने फोटो काढणे सुरू होते... 

नारिकेल रिसॉर्टच्या किनाऱ्यावर उतरलो... हा रिसॉर्ट तलावाच्या मधोमध असलेल्या आयलंडवर बांधण्यात आला आहे... थ्री स्टार कॅटेगरीच्या या रिसॉर्ट मधील सर्व कॉटेजेस फुल होते... प्रशस्त परिसर आणि शिस्तबद्ध पद्धतीने केलेली तलाव फेसिंग असलेल्या लाकडी घरांची रचना मनाला शांततेचा फिल देत होती...

या आयलंडच्या पलिकडच्या किनाऱ्यावर तुरळक वस्ती होती... तेथे खाण्याच्या टपऱ्या लावल्या होत्या... तेथील उकडलेले पिवळे जर्द टपोरे वटाणे कांदा चटणी मिक्स करून खाताना... रसना चमचमीत झाली होती... 

आयलंडचा संपूर्ण नजारा पाहून रिसॉर्टच्या रेस्टॉरंट मध्ये दाखल झालो...  ते काहीतरी लोकल खाण्याच्या इराद्याने...  भाताबरोबर स्थानिक भाजी गोडवाखची ऑर्डर दिली...

राईची पाने वाफवून त्यात पपई, बीन आणि हर्ब घालून  घट्ट बनविलेली  स्पायसी गोडवाख भाजी भाताबरोबर खाताना... एक वेगळीच लज्जत येत होती... 

पंजाबी मुलांनी स्पीड बोटीचा आनंद घेतला... बराच वेळ झाल्यामुळे बोटवाला आम्हाला शोधायला आला होता... रिक्षावाल्या रणजितचे पण फोन येऊन गेले... बोटीने पुन्हा मंदिर घाट येथे आलो.जवळच एक ग्रामीण महिला हातमागावर भरजरी शाल तयार करत होती... तिच्या कामात अप्रतिम सफाईदारपणा होता... 

रणजितने मग डोंबुर तलावातून गोमती नदीत येणाऱ्या पाण्यावर बांधलेले धरण आणि वीज निर्मिती करून नदीत कोसळणारा धबधबा दाखविला...


तेथून डोंबुर तलावाच्या बंधाऱ्यामुळे विस्थापित झालेल्या रीफ्युजी लोकांचे गाव कलजारी दाखविले... विस्थपितांची घरे सरकारी खर्चाने बांधली जात होती... तसेच आज मोफत रेशन वाटपाचा कार्यक्रम त्या गावात सुरू होता...  टेकडीच्या दुर्गम भागात वसलेल्या ह्या आदिवासी गावासाठी पक्का रस्ता सुद्धा तयार होत होता.

त्रिपुरा मधील महत्त्वाचे  प्रेक्षणीय स्थळ  डोंबुर तलाव  आमच्या सायकल वारीचा एक भाग होता... तो उत्तर बाजूने पूर्ण करताना आम्हाला ११० किमी राईड करावी लागणार होती... तोच रिक्षाने दक्षिण मार्गाच्या शॉर्टकटने पूर्ण केला... त्यामुळे दोन दिवसांच्या सायकल वारीची भरपाई झाली होती... 

साडेचार वाजता कारबुक गावात रिक्षातून उतरताना  रिक्षापेक्षा सायकल बरी असेच भाव मनात होते... 

मंगल हो... 

Sunday, November 12, 2023

बडे दिनोमे खुशी का दिन आया...६६ किमी राईड आणि ११३ वे रक्तदान

बडे दिनोमे खुशी का दिन आया...

६६ किमी राईड आणि ११३ वे रक्तदान...

आजचा दिवस खरोखरच खूप खास आहे... आज दिपावली... उटणे लावून अभ्यंग स्नान... लक्ष्मी पूजन... आणि त्याच बरोबर माझा ६६ वा वाढदिवस... आणि लग्नाचा ४५ वा वाढदिवस... यालाच म्हणतात बडे दिनोंमे खुशी का दिन आया...

आजच्या मोठ्या दिवशी काही तरी भव्य दिव्य करायचे ठरविले होते... 

सकाळी चार वाजता उठल्यावर... बायकोने चंदनाचे उटणे लावले... अभ्यंगस्नान झाले... याच दिवशी श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला होता... त्याच्या वधाचे  प्रतीक म्हणून करीटं फोडलं...

पूजाअर्चना झाल्यावर बायकोला लग्नाच्या ४५ व्या वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या... मला सुद्धा गोड शुभेच्छा मिळाल्या...

आजच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ किमी सायकलिंग करण्याचा मानस सायकलिस्ट मित्रमंडळींनी सांगितला होता... 


सकाळीच सुरू झाली सायकल वारी... मरीन लाइन्सला पाच लूप मारण्याचे ठरविले होते... शुलू तांबे आणि तुषार रेडकर बिल्डिंग खालीच आले होते... सकाळच्या अतिशय आल्हादायक वातावरणात राईड सुरू झाली... नरिमन पॉइंटला अतुल ओझा, अंबरीश गुरव, नवनीत वरळीकर, ज्योती कोल्हे आणि तुषार वासे भेटायला आले... 

पन्नास किमी राईड झाल्यावर... एअर इंडिया बिल्डिंग शेजारील मनीज् मध्ये खादीची चळवळ सुरू झाली... उपमा चमच्याने कापून वाढदिवस साजरा झाला... ६६ किमी पूर्ण करायचे होते...  तेथून थेट हिंदुजा हॉस्पिटल शेजारील चौपाटीवर आलो... हरहुन्नरी अतुलने स्टायलिस्ट फोटो काढले...

अजून वाढदिवसाचा ज्वर उतरला नव्हता... तुषार रेडकर आणि शुलू दूरदर्शन जवळील केक शॉप मध्ये केक घेऊन वाट पाहत होते... गंमत म्हणजे केकच्या दुकानातच दुसऱ्यांदा वाढदिवस साजरा झाला... 

समुद्रा सारखेच... तरुण मित्रांच्या प्रेमाला भरते आले होते...

शिवडीच्या श्री हिंद स्वराज्य प्रतिष्ठान यांनी रक्तदान शिबिरात येण्याचे आमंत्रण दिले होते... पुन्हा फ्रेश होऊन परेल येथील भावसार सभागृहात दाखल झालो... तेथे मित्र रोहन आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी हार्दिक स्वागत केले... आतापर्यंत केलेल्या सायकलिंग बाबत तसेच रक्तदाना बाबत सभागृहाला माहिती दिली... वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान ही संकल्पना सर्व तरुणांना खूप आवडली... 

शरीर स्वास्थ्या बरोबर  प्रदूषण मुक्त भारत या संकल्पनेचा प्रचार प्रसार करण्यासाठीच सायकलने भारत भ्रमंती सुरू आहे... तसेच सायकलिंग करा आणि मोबाईल संस्कृती मधून निसर्ग संस्कृती मध्ये या... हा संदेश तरुणांना दिला... 

माझे रक्तदान सुरू असतानाच सायकलिस्ट मित्र अंबरीश गुरव आला आणि त्याने पण रक्तदान केले... चांगली गोष्ट करणे हे सर्वांनाच प्रोत्साहित करते... याचाच परिपाठ अंबरिशने आज घालून दिला होता... 

आजच्या या मोठ्या दिवशी मनाला समाधान आणि आनंद देणाऱ्या गोष्टी हातून घडल्या होत्या... 

कुटुंब, नातलग, मित्रपरिवार आणि हितचिंतक या सर्वांच्या शुभेच्छांचे गाठोडे घेऊनच १६ नोव्हेंबर रोजी सात बहिणींना (नॉर्थ ईस्ट) भेटायला... त्यांच्या सोबत सायकलिंग करायला जातोय... 

ही शुभेच्छांची शिदोरी अनंत काळासाठी पुरणार आहे...


मंगल हो... !!!



Monday, September 25, 2023

पावणेर अर्थात पाहुणचार


पावणेर अर्थात पाहुणचार.....

माणूस हा समाजप्रिय  प्राणी आहे...
समूहाने राहणे त्याल आवडते.....
त्यातूनच त्या समूहाची म्हणून एक संस्कृती उदयाला येते......

संस्कृती म्हणजे सभ्यता.....
सदवर्तनाचा दृश्य आविष्कार....

घराची शोभा ज्याप्रमाणे अंगण सांगते
त्याप्रमाणेच..
माणसांची सभ्यता शालीनता त्यास अवगत असणाऱ्या चालीरीतीतून कळते......

आपल्या घरी आलेल्या पै पाहुण्यांशी आपण जे काही वागतो बोलतो किंवा...
 त्यांचा जो काही आदर सत्कार करतो किंवा...
त्यांची जी काही उठबस करतो....
ठेप ठेवतो.... 
त्याला पावणेर किंवा पाहुणचार असं म्हणतात....

पावणेर हा तसा ग्रामीण शब्द आहे...
पण त्यात खूप अदब आहे...
पाहुणचार या शब्दात कृतीपेक्षा विचारपूस जास्त आहे.....

पूर्वी खेड्यात घर आणि अंगण एकच असल्यासारखं होतं....

त्यामुळे घरी येणारा पाहुणा लांबूनच नजरेस पडायचा....

पाहुणा किंवा पाहूणी दारात आल्याबरोबर घरातली माणसं तटातटा आदरपूर्वक उठून उभी राहायची...

लेकुरवाळी पाहुणी असेल तर भाकरतुकडा ओवाळून टाकला जायचा.......

न्हाणीघरात पायावर पाणी घेतल्या शिवाय घरात प्रवेश नव्हता.....

बसायला घोंगडी टाकली जायची....
उन्हाळ्याच्या दिवसात रांजनातील थंडगार पाण्याचा तांब्या  आणि गुळाचा खडा असा देशी पाहुणचार पाहुण्यांपुढं ठेवला जायचा..

पाहुणे तातडीने निघणार असतील तर गरम दूध आणि शेवया उकडून पितळीत पाहुण्यांच्या पुढे मांडल्या जायच्या...

हातावर पाणी पडल्याशिवाय पाहुणा घराबाहेर जाऊच शकत नव्हता...
हे पावणेर....

पाहुणे निवांत असतील तर चार दोन दिवस ठेवून घेतले जायचे.....

आवडीनिवडीचं भोजन तर व्हायचंच पण पोटभर साऱ्या गणागोताच्या गप्पा मारल्या जायच्या....
त्यात आस्थेवाईकपणा होता...
मला काय त्याचं असं नव्हतं.....

जाताना आपल्या शेतशिवारात पिकलेला वानवळा मोठ्या आवडीने दिला जायचा.....
मग ते आंबे असतील नाही तर खरवस असेल.....
खूप मजा असायची.....

माहेरवाशीण माहेरी आली तर मग तिला न्हाऊमाखू घातलं जायचं...
सासराबद्दल सखोल विचारपूस केली जायची.....

चोळी पातळ घेतलं जायचं....
हातात चुडा भरला जायचा....
हे सवाष्णीचं लेणं आहे.....

लग्न झालेल्या व माहेरी आलेल्या मुलींच्या देखील खूप काही अपेक्षा नसायच्या......

आईवडील भाऊ भावजय यांच्या राज्यात ....
तिचं जे काही पावणेर व्हायचं
त्यात ती संतुष्ट होती.....

काळ्या पोतीत ओवलेली
दोन डोरली चार सोन्याचे मणी
म्हणजे तिचं मणीमंगळ सूत्र....
पायात पावलीभर चांदी घालून घडवलेली खणखणीत जोडवी...
कानात कर्णफुले...
हातात हिरवा चुडा....
कपाळाला ठसठशीत कुंकू..
एवढ्या माफक साजशिनगारात घरी आलेली माहेरवाशीण आनंदी असायची.......

सासरी जाताना सर्व वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून मग निघायचं....

सासरी नसणारं आणि माहेरी असणारं
असं म्हणून जे जे काही असेल ते आई आपल्या या लाडक्या लेकीला गाठोड्यात गाठीवर गाठी बांधून द्यायची......

तिला मुलबाळ असेल तर त्याला अंगडं टोपडं घ्यायचं....
गाठोडं जड झालं तर आई किंवा भाऊ बैलगाडी करून या पोरीला सासरी सोडवून यायचे......

लेकीच्या सासरी पुन्हा या माहेराहून आलेल्या मंडळींचं स्वागत व्हायचं...
जेवू खाऊ घालून किमान एक रात्र मुक्काम केल्यानंतरच त्यांची सुटका व्हायची.........

त्यात एकमेकां विषयीचा मान सन्मान आदर यांचं प्रकटीकरण असायचं.....
गोडवा असायचा....

श्रद्धेने केलेल्या या आटापिटीस 
पावणेर अथवा पाहुणचार असं म्हणायचं...........

घरी आलेली पाहुणी जवळची का लांबची याचा विचार न करता हातात बांगडया तर भरल्या जायच्याच....

जाताना  पिढयावर बसवून परातीत गहू तांदूळ व खोबरं घेऊन घसघशीत हातानं हळदीकुंकू लावून खणा नारळानं ओटी भरली जायची.....

पुरुष पाहुण्यास टॉवेल अथवा उपरणे व टोपी गंध लावून दिली जायची...

यात देण्याचा भाव होता...
अंतरीचा उमाळा होता...

पदरातील ओटी काढून ठेवताना त्यातील मूठभर धान्य पुन्हा त्या परातीत टाकलं जायचं.....

त्यामुळे धनधान्यास बरकत येते अशी समजूत आहे.....
अशी ओटी भरून केलेलं पावणेर आपल्यातील कितीतरी माता भगिनींच्या वाट्याला आलं असेल....

घरोघरी आलेल्या पाहुण्यांचं ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार पावणेर व्हायचं...

अगदी शेजारच्या घरात सुध्दा रोज वाटीभर का होईना पण भाजी ज्याला खेड्यात कालवण म्हणतात नित्यनेमाने दिलं घेतलं जायचं....
बेगमीचा मसाला जरी केला तरी तो पहिला शेजीबाईच्या घरी मासला म्हणून दिला जायचा.....

नाहीचा पाढा न लावता आहे त्यातूनच घासातील घास देण्याची भावना म्हणजे पावणेर.....
आणि दिल्यानं वाढतं.....
म्हणून चहासाठी कप आणि बशी...
बशीतला पिऊ आणि कपातला देऊ...
हे सहजसाध्य अगत्य......

त्यातून सुखदुःखाची वाटणी व्हायची..
कितीएक प्रसंग तर परस्पर निभावले जायचे.....

घराचं दार सदैव उघडं....
माणसं मनानं मोकळी ढाकळी होती..

यात कृती आणि त्यामागची भावना दोन्ही महत्वाच्या मानल्या जायच्या....

*शेजी आली घरा कशी बोलते हासून..*

*मनुष्य जन्म असा काय जायचं साधून....*

माणसाचा जन्म म्हणजे पाण्यावरला बुडबुडा....
तेव्हा कपाळावर आठी न पडता हशी खुशीनं राहावं.......
प्रेमानं अदबीनं वागावं.....
तेवढंच संगती येतं असं शिकविणारा संस्कार त्याचं नाव पावणेर......

आता काळ बदलला आहे....
सगळ्या गोष्टीत नको एवढा औपचारिकपणा आला आहे....
अनौपचारिक असं काही असतं हेच मुळी लक्षात येत नाही.....

त्यामुळं माणसं मनात कुढतात...
आणि स्वहस्ते स्वतःचा ऱ्हास करून घेतात......

पाहुणचाराच्या जुन्या पद्धती जरा अंमलात आणण्याचा प्रयत्न करूया..

चेहऱ्यावर चोवीस तास संकोचाचं बेगड लावून जगणं जरा बंद करू.....
व्यक्त होऊ...

समोरच्याच व्यक्त होणं आणि आपण समरसून समजून घेणं हे सुध्दा पावणेरच आहे......

असं पावणेर वाढीस लागलं म्हणजे आपण जगातील सगळ्यात श्रीमंत झालो आहोत असं समजावं......

मंगल हो.... !!!

संकलित....

Saturday, September 23, 2023

आतला आनंद...

मोगऱ्याचा गजरा...

मैत्रिणीने दिलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध दरवळत होता. ते वाऱ्यावर बांधले आणि मन भरून त्यांच्या भेटीचा आनंद अनुभवत राहिले. फार दिवसांनी एखादे जुने ओळखीचे, प्रेमाचे माणूस भेटावे तसा त्या फुलांच्या भेटीने मला विलक्षण उल्हास वाटत होता. 

पुण्यात फुलांना तोटा नाही. गुलाब, निशिगंधा पासून तो अगदी ग्लाडिओला, जर्बेरा पर्यंत नाक्यानाक्यावर फुलांचे तुरे मिळतात. समारंभात आदरणीय पाहुण्यांना, वक्त्यांना आदरपूर्वक दिले जाणारे गुच्छ प्रत्यक्ष बघते. पण का कोण जाणे, त्या गुच्छांना एक औपचारिकपणा असतो. सहज मिळणाऱ्या फुलांचा निर्भर आनंद ती सहसा देत नाहीत. फुले एकतर झाडावरून खुडून घ्यावीत किंवा कुणीतरी अलगद ती आपल्याला द्यावीत. तीही खासगी भेटीत. जाहीरपणे फुलांचे गुच्छ स्वीकारताना संकोच वाटतो.

फुले सारीच आवडतात; पण मोगाऱ्याशी माझे भावबंध बालपणापासून जुळलेले आहेत. गावी एके ठिकाणी पाठीमागच्या अंगणात मोगऱ्याची असंख्य झाडे होती. आजोळी असताना आजीने लावलेली, जोपासलेली मोगऱ्याची झाडे नातलागांइतकी जवळची वाटत. ती फुले हळुवार हाताने खुडताना एक अनामिक आनंद लाभे. 

शाळकरी वयात पुण्यामध्ये वसंत ऋतूत 'गजरा मोतियाचा' केव्हातरी मिळे. त्याची अपूर्वाई काही वेगळीच असे. पुण्यात 'हजारी मोगरा' नावाची मोगऱ्याच्याच नात्याची फुले पहिली. त्यांना मंद गोड सुवास असे. मुंबईला असताना मदनबाण, सुरंगी, सोनटक्का अशा फुलांचा परिचय झाला. ती आवडली ही; पण मोगऱ्याच्या फुलांसारखी जवळीक जडली नाही.  सुवासाने घमघमणारा सोनचाफा, देखणं रूप आणि सुवास ल्यालेल्या फुलांचा राजा गुलाब, दिमाखदार सौंदर्याने नटलेली, कुर्रेबाज दिसणारी फुलांची राणी शेवंती, हळव्या आर्त आठवणी जागवणारी बकुळीची फुले... सारीच हवी हवीशी वाटणारी; पण माझ्या मनातले मोगऱ्याचे स्थान त्यापैकी कुणीही कधी घेतलेले नाही. 

ज्ञानेश्वरांनी आपल्या मधुर ओव्यांचे वर्णन करताना   वसंतागमींचीं वाटोळीं |  मोगरीं जैसीं ||  अशी चित्रमय उपमा वापरली आहे !

शांताबाई शेळके यांच्या आतला आनंद या ललित लेखनमालेतून...

Wednesday, September 20, 2023

आवरण... डॉ. एस एल भैरप्पा

आवरण... डॉ. एस एल भैरप्पा

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध कन्नड लेखक, साहित्यिक डॉ.एस एल भैरप्पा यांची "आवरण" ही कादंबरी वाचनात आली... माझ्या आयुष्यात एकटाकी सलग एका दिवसात वाचून काढलेली ही एकमेव कादंबरी ठरली आहे...

भारतातील छद्मी धर्मनिरपेक्षता तिच्या अडून हिंदू धर्मावर होत असलेले आणि इतिहासातील झालेले  हल्ले, पाडलेली पवित्र मंदिरे...लव्ह जिहाद आदी गोष्टी अतिशय परिणामकारकरित्या या कादंबरीत मांडण्यात आल्या आहेत...

लव्ह आणि लव्ह जिहाद मधील अंतर समजून घेताना आवरण उपयोगी पडते. लक्ष्मीच्या वडिलांचं वाक्य... मुस्लिम मुलाशी लग्न केल्यावर तुझाच मुलगा हिंदू मंदिरे पडायला पुढाकार घेईल... तेव्हा काय करशील.

भारतातील  ढोंगी सेक्युलर लोकांची लक्तरे या कादंबरीतून डॉ. भैरप्पा यांनी वेशीवर टांगून ठेवली आहेत... जे पुरोगामी (सेक्युलर) विचारांचा बुरखा तोंडावर घेऊन बसले आहेत... त्यांचा तो बुरखा डॉ. भैरप्पांनी टराटरा फाडला आहे..

 कुठल्याही विषयावर लिखाण करण्याआधी त्या विषयाचा सर्व अंगाने अभ्यास-वाचन, मनन करून... भरपूर परिश्रम घेऊन तसेच त्या विषयातील तज्ज्ञांशी विचारविमर्ष करूनच त्याची आवरण ही कादंबरी साकार झाली आहे...

 हिंदूचे आद्य आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाला दरवर्षी पंचवीस लाख लोक जातात पण तिथे ज्ञानव्यापी मस्जीद आहे तेच मूळचे काशी विश्वनाथाचे मंदीर आहे. आपण जिथे नमस्कार करतो ते मूळ मंदीर नाही  हे लक्षात आल्यावर मूळ मंदिराच्या स्थळावर नमस्कार करण्याची इच्छा तीव्र होते.

 कोट्यवधी भारतीयांच्या या इच्छेला सुप्रसिद्ध कन्नड कादंबरीकार डॉ एस.एल. भैरप्पा यांनी "आवरण" या कादंबरीतून वाचा फोडली आणि ती कादंबरी केवळ कन्नड वाचकांची न राहता भारतीयांची झाली. कन्नड भाषेत पंचवीस आवृत्या निघाल्या आणि अन्य भारतीय भाषांच्या आवृत्त्या दररोज वाढत आहेत.

फेब्रुवारी २००७ मध्ये "आवरण" प्रकाशित झाली. २००९ पर्यंतच हिची २२ पुनर्मुद्रणे झाली. तीन वर्षांत या कादंबरीवर १० चर्चासत्रे झाली. तसेच या पुस्तकावर १० पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी ४ पुस्तके ही "आवरण" वर टीका करणारी आहेत. आवरणने कन्नड पुस्तकांच्या खपाचे आजवरचे सारे विक्रम मोडून काढले आहेत.

वाचकांनी या कादंबरीला डोक्यावर घेतले आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यू.आर. अनंतमूर्ती, गिरीश कर्नाड, चंद्रशेखर कंबार अशा नामवंत कन्नड लेखक-नाटककारांनी या कादंबरीवर टीकेची झोड उठवली आहे. गंमत म्हणजे जी नामवंत विचारवंत मंडळी आवरणवर तुटून पडताहेत, टीका करताहेत त्या प्रवृत्तीची पात्रे कादंबरीत सुद्धा आहेत. सत्य झाकोळणाऱ्या या प्रवृत्तीला पुराव्यानिशी उघडे पाडणे हा या कादंबरीचा गाभा आहे.

सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करीत नाही. एका अर्थाने आवरण ही सत्यनिष्ठ कादंबरी आहे. "हिडन टॉरिझन्स : 1000 ईयर्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन' चे लेखक एन.एस. राजाराम यांनी आवरणची तुलना डॅन ब्राऊन यांच्या विश्वविख्यात "दा-विंची कोड" या कादंबरीशी केली आहे. स्वार्थी आणि प्रभावी शक्तींनी खरा इतिहास दडपून ठेवून खोट्या इतिहासाचा प्रचार करणं, हे दोन्ही कलाकृतींमधील समान सूत्र आहे.

कादंबरीची सुरुवात फ्लॅश बॅकपद्धतीने होते. ही कादंबरी ऐतिहासिक आणि वर्तमान या दोन स्तरांवर उलगडत जाते. १९९२ साली बाबरीचा ढांचा पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असते. त्यानुसार प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट निर्माण करण्याचे काम आमीर आणि रझिया कुरेशी यांच्यावर सोपविण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी दोघेही विजयनगर (हंपी) येथे येतात. तेथील उद्‌ध्वस्त मंदिरे पाहून रझिया अंतर्मुख बनते.

रझिया ही पूर्वाश्रमीची हिंदू असते. लक्ष्मी तिचं आधीचं नाव. आमीरच्या प्रेमात पडून तिने धर्मांतर केलेले असते. घरातून वडिलांचा विरोध असूनही पुरोगामी विचारांच्या प्राध्यापक शास्त्री यांच्या प्रोत्साहनामुळे आणि आमीरच्या आधुनिक विचारांमुळे ती मुस्लिम बनते. हिंदू धर्मावर टीका करणे आणि प्रस्थापित विचारवंतांच्या वर्तुळात वावरणे यामुळे ती सतत प्रसिद्धीत असते. याच सुमारास विजयनगरच्या भग्न अवशेषांनी ती अंतर्मुख होऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न करू लागते.

रझिया सत्यावर आधारित डॉक्युमेंटरीचा आग्रह धरू लागते अन्‌ आमीर मात्र सत्याशी प्रतारणा करीत असल्याचे तिच्या ध्यानात येऊ लागते. दरम्यान तिच्या वडिलांचे - आप्पांचे निधन होते. लक्ष्मी तब्बल २८ वर्षांनंतर आपल्या गावी पोहोचते. कादंबरीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते ती इथे. रझियाला छळणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा तिच्या मनात येथे निर्माण होते. तिच्या वडिलांनी एकत्रित केलेली ग्रंथसंपदा तिच्या हाती लागलेली असते. आप्पांनी काढलेली टिपणे आणि त्यांचा व्यासंग पाहून लक्ष्मी स्तिमित होते. तिथेच राहून अभ्यास करायचा निर्णय ती घेते. लक्ष्मीने परधर्मात जाऊन विवाह केल्यानंतर आप्पांनी मुस्लिम धर्म, मुस्लिम चालीरीती, त्यांची आक्रमणे, भारतात आणि भारताबाहेर घडविलेला विध्वंस यांचा अभ्यास सुरू केलेला असतो. यावर आधारित एक गंभीर पुस्तक लिहायचा त्यांचा निर्धार असतो, पण त्यांच्या मृत्यूने ते काम अधुरे राहिलेले असते. वडिलांनी जमविलेली पुस्तके आणि त्यांनी काढलेली टिपणे यांच्या सहाय्याने ते अधुरे काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी ठरवते. ही कादंबरीतील कादंबरी फारच अप्रतिम आहे. ती स्वत: वाचण्याचा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे.

दरम्यानच्या काळात आमीर रझियापासून मानसिकदृष्ट्या दूर होऊ लागतो. या वयात तो एका कोवळ्या मुस्लिम मुलीशी निकाह करतो. दरम्यान प्राध्यापक शास्त्री यांच्या आईचे निधन होते. या काळातील पुरोगामी म्हणवून घेणारे प्राध्यापक शास्त्री आणि आधुनिक विचारांचा बुरखा पांघरणारा आमीर यांचे चित्रण खूपच प्रत्ययकारी झाले आहे. या पात्रांचे वर्तन वाचताना आजच्या समाजातील ढोंगी पुरोगामी विचारवंत-लेखक आपसूकच डोळ्यांसमोर तरळू लागतात. सध्याचे वास्तवच अत्यंत अचूकपणे लेखकाने या पात्रांच्या माध्यमातून समोर आणले आहे.

याच काळात इतिहास पुनर्लेखनाविषयी प्रा. शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सरकारकडून एका परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेला रझियालाही आमंत्रण असते. मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा इतिहास पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा रझिया पुराव्यानिशी या गोष्टीला विरोध करते. शास्त्रींसाठी ही घटना अनपेक्षित असते. पुढील परिषदेसाठी रझियाचा पत्ता कट होतो. कादंबरीतला हा भाग देशातील विविध विद्यापीठांतील विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांचे चारित्र्य उघडे पाडणारा आहे. इतिहासाचे पुनर्लेखन, भगवेकरण आदी वारंवार चर्चेत येणाऱ्या वादांमागील सत्य समजून घेण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांनी हा भाग आवर्जून वाचलाच पाहिजे.

 स्वत:ला निधर्मी, सेक्युलर समजणारे विचारवंतांचे खरे स्वरूप अतिशय जिवतंरीत्या कादंबरीच्या शेवटच्या भागात साकारले आहे.

लक्ष्मीच्या कादंबरीतील नायक रजपूत राजपुत्र आहे. युद्धात पराभव झाल्याने त्याला गुलाम म्हणून राहावे लागते आहे. त्याचे बीज फोडून त्याला खोजा (हिजडा) म्हणून जनानखान्यात ठेवलेलं असतं. हा आता इस्लामच्या प्रभावाखाली आलेला असतो. या खोजाच्या माध्यमातून लक्ष्मीची कादंबरी उलगडत जाते. या राजपुत्राच्या वाट्याला काय काय येतं? काशी विश्वनाथाचे मंदिर उद्‌ध्वस्त होतानाचा प्रसंग, गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी हे सारं  कादंबरीतच चित्रमय होत... आपल्या समोरच ते प्रसंग घडत आहेत असं जाणवत.

खोजा झालेला  राजपुत्र छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजविणाऱ्या छत्रसालाकडे जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो, पण त्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला हलकल्लोळ, वेगाने घडणाऱ्या घडामोडी "आवरण'च्या शेवटच्या भागात रेखाटल्या आहे. आवरणमधील रझियाच्या कादंबरीला जो विरोध झाल्याचे आवरणमध्ये वर्णन आले आहे... तसाच विरोध आवरणला होताना दिसत आहे. कादंबरीकाराचे हे यशच म्हटले पाहिजे.

आवरणमधील रझियाच्या कादंबरीवर सरकार बंदी घालते, तेव्हा आमीरही रझियाच्या मदतील धावून येतो. कारण रझियाच्या कादंबरीने त्याचे डोळे उघडतात. रझियाने आपल्या कादंबरी लेखनासाठी ज्या इतिहास ग्रंथांचा आधार घेतलेला असतो, ती संदर्भग्रंथांची यादी न्यायालयीन लढ्यासाठी घेण्यात येते. १३६ ग्रंथांची सूची बनवून त्या आधारे कादंबरीवरील बंदी विरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार लक्ष्मी आणि आमीर करतात आणि येथे आवरण कादंबरी समाप्त होते.

डॉ. भैरप्पा यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील वर्तमान संदर्भ खूपच बोलके आणि जिवंत आहेत. गिरीश कर्नाड, यू.आर. अनंतमूर्ती आदी विचारवंत आणि साहित्यिक मंडळींचे ढोंग उघड करणारी काही पात्रे कादंबरीत अतिशय जिवंतपणे साकारली आहेत. काहीजणांना वाटते की, कादंबरीतील प्राध्यापक शास्त्री हे पात्र यू. आर. अनंतमूर्ती यांच्यावरच आधारलेले आहे. धर्मनिरपेक्षता, पुरोगामी, आधुनिक विचारांचे म्हणवून घेणारी ही मंडळी सत्याचा अपलाप कशा रीतीने करतात, हे "आवरण'मधून अतिशय खुबीने व प्रभावीपणे मांडले आहे. 

 भारतीयत्व, भारतीय संस्कृती विशेषतः हिंदू जीवन पद्धतीचा अभिमान भैरप्पा यांच्या लेखणीतून झळकतो... त्यामुळेच सेक्युलर टोळी, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी लोकांचे कळप "आवरण" वर  किंबहुना त्यांच्या साहित्यावर तुटून पडताना दिसत आहे. 

"आवरण'मधील भूमिका आणि वास्तव १३६ ग्रंथांच्या आधारे संदर्भपृष्ठांसह मांडल्याने सेक्युलरांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची आवश्यकताच राहिलेली नाही, यात डॉ. भैरप्पा यांचा व्यासंग, अभ्यास आणि चातुर्य दिसून येते. मोजक्या शब्दांत मोठा आणि मार्मिक आशय व्यक्त करण्याची लेखकाची शैली वाचकास चिंतनाला प्रेरित करते. 

पुढील काही उदाहरणे पाहा...

"विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला "आवरण' म्हणतात आणि असत्य बिंबविणाऱ्या कार्याला "विक्षेप' असे म्हटले जाते. व्यक्तिगत पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला "अविद्या' आणि सामूहिक अथवा जागतिक पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला "माया' म्हटलं जातं.''

 आपल्या व्यतिरिक्त इतर कुणाचीही आराधना करणाऱ्या भक्ताला तो सतत जाळणाऱ्या नरकात टाकून देतो. अशा प्रकारच्या देवाची निर्मिती करणारेही अशाच मत्सरी स्वभावाचे आहेत, असा याचा अर्थ नाही का होत? 

मी फक्त एकटा आहे, तिथे इतर कुणाला जागाच नाही, असं म्हणणारा; काम-क्रोध-मद-मत्सर असलेला देव निर्माण करणारा धर्म तरी कसला?''*

औरंगजेब १७०७ साली वारला. त्या नंतर त्याचा शेवटचा मुख्याधिकारी हिनायतुल्ला खान याच्या आज्ञेवरून काश्मिरच्या साकी मुश्ताक खान यानं त्याचा आवडता बादशाह औरंगजेब याचा इतिहास लिहिला आहे. दरबारात असलेल्या पुराव्याशिवाय त्यानं एकही वाक्य लिहिलेलं नाही. त्या ग्रंथाचं नाव आहे "मासिर ई आलमगीरी."  "बादशहाच्या आज्ञेनुसार त्याच्या अधिकाऱ्यांनी काशीच विश्वनाथ देवालय नष्ट केलं" अशी वर्दी आली. अशी त्यात स्पष्टपणे नोंद आहे. १६७० साली रमजान महिन्यात पवित्र कर्तव्य म्हणून मथुरेच देवालय नष्ट करावं, असा औरंगजेबाने हुकूम केला. त्याच जागी मोठी मशीद उभारली... असं त्याचं पुस्तकाच्या पुढच्या प्रकरणात लिहिलं आहे.

बादशहाच्या बाराव्या वर्षी विश्वनाथ देवालयाचा नाश झाला आणि मथूरेच  देवालय तेराव्या वर्षी पाडण्यात आलं.

औरंगजेबानं विश्वनाथ मंदिराचा विद्‌ध्वंस करून त्या जागी उभारलेल्या मशिदीचं, काटेरी कुंपण बांधून आता सशस्त्र सैनिक रक्षण करताहेत.'*

"मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.''

यातूनच इतिहासातील जळजळीत सत्य समोर येत आणि त्याला झाकोळून कट्टरपंथी मुस्लिमांचे लांगुलाचन करणारे डावे पुरोगामी यांचा बुरखा टराटर फाटून जातो...

आधुनिक शिक्षणाशिवाय कुणाचीही बुद्धी प्रखर होणार नाही... पण आधुनिक शिक्षण घेतलेली स्त्री समानतेची मागणी करणार... केवळ आर्थिक, सामाजिक आणि सहजीवनात नव्हे तर धार्मिक पातळीवरही !... मग ती प्रश्न ही उपस्थित करू शकते... देव पुरुषच का असला पाहिजे ?  स्त्री का असू नये ? हिंदू धर्मात पुरुष देवतांइतक्याच स्त्री देवता आहेत... पुरुष देवतांपेक्षा त्या अधिक शक्तिशाली ही आहेत... सगळे देव दुर्गेला शरण जातात... महिषासुरासारख्या राक्षसाला ठार मारण्याची शक्ती तिला आहे... मुस्लिम धर्माच्या स्थापनेआधी अरेबियामध्ये ही अनेक स्त्री दैवतं होती... प्रवादी(स) यांनी त्यांच्यावर बंदी घालत अल्लाह नावाच्या पुरुष दैवताला तेवढं शिल्लक ठेवलं... एखाद्या स्त्री दैवताला का शिल्लक ठेवलं नाही ? दैवताच्या पुरूष रुपाच अस्तित्व या स्त्री देवतेवर आधारित आहे... राणी मधामाशीची सेवा करणाऱ्या कष्टकरी मधमाशांसारखं !  जिज्ञासा अध्यात्मिक पातळीवर पोहोचली की प्रत्येक स्त्रीवादी व्यक्ती अशाप्रकारे वेदांती होते... शिवाय स्त्री आणि पुरुष हा भेद केवळ प्रकृतीच्या पातळीवरचा आहे. आत्म्याच्या पातळीवर पोहोचलं तर लिंगभेद नाही... परमतत्व असलेलं ब्रम्ह स्त्री ही नाही आणि पुरुष ही नाही. असंच वेदांत ही मानतो.. 

इतिहासातील सत्य उघड्या डोळ्यांनी जाणून घेऊन स्विकारल्याशिवाय इतिहासातून धडाही मिळत नाही...

दलित आणि मागासलेल्या समाजाला आरक्षण उपलब्ध करून देऊन, त्याच्याशी अपमानास्पद वागणाऱ्यांना योग्य ती शिक्षा करून त्यांना देवळात प्रवेश देऊनच नव्हे तर पुजारी म्हणून नेमणूक करत सगळा समाज ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतोय ना? अशा प्रकारे सुधारणा घडवून आणण्याची संधी मुस्लिम समाजात का उपलब्ध करून देत नाही? आणि सुधारणा व्हायच्या असतील तर आधी चुकांची जाणीव व्हायला नको का? इतिहासाचे सत्य दर्शन झाल्याशिवाय या सुधारणा कशा होतील...?

तुम्ही म्हणताय तसे मुस्लिम राजे बादशहा वागले ते खरंय अस मान्य केल, तरी त्या कारणासाठी आजच्या मुस्लिम बांधवांचा द्वेष करून समाजातलं वातावरण कलुषित करून राष्ट्रच काय हित साधणार आहे?  एका पुरोगाम्यांच्या प्रश्नावर डॉ. भैरप्पा म्हणतात...

"कुणाचा तिरस्कार करणं, हेटाळणी करणं, मन कलुषित करणं हा इतिहासाचा उद्देश कधीच नसतो. असता कामा नये. आपल्या आधी होऊन गेलेल्या चुका डोळसपणे समजाऊन घेऊन आपण आजचं जीवन शक्यतो, निदान त्या दोषापासून तरी मुक्त करून घेतलं पाहिजे. म्हणूनच ऐतिहासिक सत्याला कुठलाही रंग न देता, थेट त्याकडे  पाहण्याचा प्रामाणिकपणा हवा. पण तुम्ही त्यांना तशी संधीच देत नाही. मागे होऊन गेलेल्या मुस्लिम राजांच्या  वागणूकीला आजचे मुस्लिम जबाबदार नाहीत,  हे खर आहे. पण आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची प्रांजळपणे जाणीव करून घेऊन त्यांच्या चुकांची जबाबदारी नाकारायची असेल तर याचा अर्थ, आपण चुकांच समर्थन करतो, असाच होतो. 

अगदी अलिकडच्या काळात कोरियामध्ये आपल्या लोकांनी केलेल्या अन्यायाची जबाबदारी जपाननं स्वीकारली, याचा अर्थ काय? नाझींनी मानवते विरुद्ध जी हीन कृत्यं केली, त्यासाठी जर्मन माणसांनी पश्चाताप व्यक्त करून, यानंतर कधीही अशा घटना घडणार नाही, अशी शपथ घेतली नाही का? 

भारतीय मुस्लिम समाजाला अशा नैतिकतेशी विस्तार पावण्याची तुम्ही संधीच देत नाही. इतिहासातील सत्याचा प्रामाणिकपणे स्वीकार करण्याचं धैर्य असेल तर आपण पुन्हा त्या ऐतिहासिक चुका करणार नाही. आपणही त्यांना त्यासाठी मदत केली तर समाजातील भातृत्व, एकता यासारखे राष्ट्रीय ऐक्यासाठी आवश्यक असलेले गुण अधिक दृढ होतील आणि राष्ट्राच्या ऐक्याचा पाया अधिक भक्कम होईल, असं नाही का वाटत?"

सर्वजण समान आहोत, या तत्त्वाचा स्वीकार करून आपण आपल्या देशाचं संविधान लिहिलं नाही का? त्याच प्रमाणे परधर्माचा द्वेष करत स्वतःच्या प्रेषितानं सांगितलेला धर्म श्रेष्ठ मानून, आपल्या धर्मात न येणाऱ्यांना ठार करा असं सांगणाऱ्यांच्या मनोभावनांचा तिरस्कार करून "एकं सत् विप्रा: बहुदा वदंति" हे तत्त्व सगळ्यांवर कठोरपणे लादल्याशिवाय आपण ऐक्याच्या गोष्टी केल्या, तर त्या पोकळ ठरणार नाहीत का? 

डॉ. भैरप्पा यांनी "धर्मप्रसाराच्या कामासाठी जिहाद" केल्यावर स्वर्गात काय काय मिळतं याच अतिशय मार्मिक आणि अभ्यासपूर्ण वर्णन केलं आहे...

दूध आणि मध यांनी भरलेलं सरोवर... ऊन नाही आणि थंडीही नाही, अशी हवा असलेलं उद्यान. म्हणाल तेथे घेऊन जाणारे घोडे. रेलून बसायला सुखासन. टपोऱ्या मोत्यासारख्या तेजस्वी विशाल डोळ्यांच्या युवती, त्या ही कशा ठाऊक आहेत? कोवळ्या आकर्षक स्तनाच्या, अक्षत योनीच्या चिरयौवना. त्यांचं नाव ह्युरी. त्यांचं शरीर पारदर्शक असतं. त्यातून आतली हाडं हिऱ्या माणकातल्या रेषांसारखी दिसतात. सर्वसाधारण स्त्रीला असणारा विटाळ, गरोदरपण, बाळंतपण, एव्हढच काय, अत्यंत नैसर्गिक अशा मलमुत्रादी क्रियापासून दूर अशा अतिशुद्ध स्त्रिया असतात. आपला पती म्हणून स्वीकार केल्यावर पतीबद्दल सदैव कृतज्ञ असणाऱ्या; परपुरूषाकडे नजरही वर करून न पाहणाऱ्या स्त्रिया असतात. मुख्य म्हणजे या स्त्रियांचं वय कधीच वाढत नाही. जिहाद करून स्वर्गात प्रवेश केलेल्या प्रत्येक पुरुषाला अशा बहात्तर ह्यूरी मिळतात. त्यानं कुठल्याही वयात प्रवेश केला तरी त्याचं वय तीस वर्षाचं होत. त्यानंतर त्याच वय वाढत नाही. शिवाय शंभर पुरुषांइतकं पुरुषत्व लाभत. तसेच प्रत्येकासाठी हिऱ्यांनी बांधलेला राजवाडा आणि नऊ हजार गुलाम दिमतीला असतात.

हे वाचल्यावर बहात्तर ह्युरी म्हणजे काय याचा अर्थ प्रथमच कळला.

डॉ. भैरप्पा यांनी टिपू बद्दल केलेलं संशोधन टिपूच्या धर्मांधतेवर प्रकाश टाकते...

टिपू स्वतःच्या हस्ताक्षरात फारसी भाषेत चोपडी लिहून ठेवायचा. त्याबद्दल त्याने आयुष्यभर गोपनीयता बाळगली होती. कर्नल विल्यम कर्क पॅट्रिक याला ती  हस्तलिखित श्रीरंगपट्टणच्या राजवाड्यात शौचालयात सापडली. टिपूचा अत्यंत विश्वासू सेवक हाबिबउल्ला यानं ती ओळखली आणि ते हस्ताक्षर टिपूचंच‌ असल्याची खातरजमा केली. त्याची मुळ प्रत आणि इंग्लिश अनुवाद लंडनमधील इंडिया ऑफिस मध्ये आहे.

ती वाचल्यावर टिपू किती धर्मांध होता, याची अधिकच खात्री पटते. त्यात तो हिंदूंचा उल्लेख "काफर" असा करतो. इंग्लिश लोकांचा उल्लेख क्रिस्त असा करतो. लांबलचक दाढीवाले मुल्ला त्याच्या स्वप्नात वरचेवर येतात. प्रवादी महंमदानी टिपूला सोडून मी स्वर्गात पाऊल ठेवणार नाही, असं सांगितलं; असं एक लांब दाढीवाला सांगतो. मुस्लिम नसलेल्या सगळ्यांना मुस्लिम आणि सगळी मुस्लिमेतर राज्य मुस्लिम करण्याचं स्वप्न तो पाहतो. 

या छोट्या चोपडीत भारताच्या अधूनुकीकरणाचा सूक्ष्मसा धागा शोधूनही सापडत नाही. आपल्या मार्गातला मोठा काटा ब्रिटिश यांना पळवून लावण्याची तीव्र इच्छा तो यात वरचेवर व्यक्त करतो. या एका कारणासाठी त्याला आधुनिक जाती विरोधक आणि भारतीय तंत्रज्ञानाचा पितामह म्हणून चोपडीचा आधार घेणं कसं शक्य आहे? या प्रश्नाचं उत्तर बौद्धिक कसोटी मानणाऱ्यांना देता येत नाही.

मलबार आणि कोडगु येथील हिंदूंचं जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्या टिपूनं म्हैसूर प्रांतात हे धैर्य दाखवलेलं दिसत नाही. १९७१ मध्ये ब्रिटिशांशी मोठ युद्ध झालं, टिपू हरला. ब्रिटिशांना फार मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि दोन मुलांना युद्धकैदी म्हणून सुपूर्द केल्यानंतर शृंगेरी मठाला भेटवस्तू देऊन त्यानं हिंदूंच्या मताला गोंजरण्याचा प्रयत्न केला, या घटनेचा उपयोग करून आजचे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणारे टिपूलाही धर्मसहिष्णू म्हणताहेत.

अफगाणचा राजा जमानशाहला आणि तुर्कस्तानच्या खलिफाला भारतावर आक्रमण करून संपूर्ण देश इस्लाममय करा, असं पत्र टिपून लिहिलं होत.

 १७९६ साली म्हैसूरचा राजवाडा त्यानं लुटला, तेव्हा तिथल्या ग्रंथालयातील अमूल्य ग्रंथ, ताडपत्रवरील हस्तलिखित जळण म्हणून वापरायची आज्ञा दिली होती. मलबारचे मुसलमान मल्याळम भाषा, तमिळनाडूचे मुसलमान आजही तमिळ भाषा बोलतात. पण म्हैसूरचे मुसलमान आजही उर्दू बोलतात. कन्नड बोलायला लिहायला नकार देतात, ते टिपूनं सुरू केलेल्या उर्दू फारसी शिक्षणाच्या  पद्धतीमुळे ! आपल्या हिंदू सेनाधिकाऱ्यांना पकडून त्यांचं धर्मांतर करायची सूचना देणारी, टिपूची कितीतरी पत्र आजही आपल्याला वाचायला मिळतील.

त्याच क्रौर्य, इतर धर्मांवराचा  त्याचा द्वेष आणि या प्रदेशातील मूळ रहिवाशां विषयी असलेला तिरस्कार यां सारख्या शेकडो घटनांची पुराव्यानिशी नोंद आहे.

इतिहासात झालेल्या अन्याय, जुलूम जबरदस्ती, दहशतवाद आणि त्या अनुषंगाने झालेले धर्मांतरण मान्य करून अशा चुका  पुन्हा  होणार नाहीत... याची खबरदारी घेणे... या साठीच इतिहासाचे सत्य स्वरूप सर्वांना आकलन होणे आवश्यक आहे...

डॉ भैरप्पा यांचे हे अभ्यासपूर्ण संशोधन डोक्याला झिनझिण्या आणतं... या कादंबरीत डॉ भैरप्पा यांनी अभ्यासलेल्या १३६ ग्रंथांची यादी दिली आहे... त्यामुळेच आवरण ही कादंबरी सत्यावर आधारलेली आणि इतिहासावर जळजळीत प्रकाश टाकणारी ठरली आहे...

ही कादंबरी वाचून... पुढच्या पिढीला सुद्धा हा सत्य  इतिहास अवगत करून देणं... हेच आपले परम कर्तव्य आहे...

मंगल हो !!!

 






Tuesday, September 19, 2023

जपणूक छंदाची

जपणूक छंदाची

आजच्या काळात प्रत्येकाचं जीवन इतकं धकाधकीचं आणि धावपळीच झालंय की कधी कधी श्वास  घ्यायला ही उसंत नाही असे वाटते... परंतु आपल्या जीवनात असलेले छंद कसोशीने जपले... तसेच छंद जोपासण्यासाठी नवनवीन ठिकाणी भ्रमंती केली की नव्या तजेल्याने... ऊर्जेने आपण नेहमीच्या जीवनात परतू शकतो..


असच काहीसं जाणवलं ज्योतिबा दख्खन हील मॅरेथॉनमध्ये.... नियमित सायकलिंग करणे हा माझा छंद... परंतु नवनीत आणि निलेश या सायकलिस्ट मित्रांच्या मॅरेथॉन प्रेमाने मला धावण्यासाठी उद्युक्त केले... 

 आज पहाटेलाच कारने ज्योतिबा डोंगराकडे निघालो... घाट सुरु झाला आणि धुक्याच्या लाटा अंगावर येऊ लागल्या... गाडीच्या लाईटच्या प्रकाशात पुढील पाच फुटावराचे पण दिसत नव्हते...सकाळचं झुंजुमुंजू झालं होत... पण कुंद वातावरणामुळे पहाटेच्या उजेडाचे कवडसे सुद्धा घुरकट झाले होते...

उजाडलं...  अन् ज्योतिबाच्या पायथ्याचा प्रदेश झाडाझुडपातूनी शेतांनी भरलेला असल्यामुळे मोर शिंपी, बुलबुल, खंड्या यांचा किलबिलाट कानावर पडत  होता... सुखद गारवा आणि पावसाच्या शिडकाव्यासह जागोजागी वाहणारे ओहळ... हिच तर निसर्गाची नयनरम्य देणगी होती...

PWD मैदानात पोहोचलो. तेथे मॅरेथॉनची जोरदार तयारी सुरू होती. थोड्याच वेळात वॉर्मअप झुंबा सुरू झाला...  झुंबावर डान्स करणे... म्हणजे संपूर्ण बॉडी रिलॅक्स करणे होते...

प्रथम २१ आणि १५ किमी  मॅरेथॉन सुरू झाली... त्याच्या पाठोपाठ पंधरा मिनिटांनी ५ आणि १०  किमी मॅरेथॉन सुरू झाली... दाट धुक्यात धावणे... एक पर्वणी होती... त्या कुंद वातावरणात ज्योतिबाचा डोंगर अडीच किमी खाली उतरत निघालो... सोबत नवनीत आणि निलेश होता... 

सुरुवातीलाच नवनीतने आघाडी घेतली... पाठोपाठ निलेश सुद्धा पुढे गेला... खूप वर्षांनी उतारावर धावत असल्यामुळे गुढग्यावर  प्रेशर येत होते म्हणून पुढच्या चौड्यावर भार देऊन धावत होतो... थोड्याच वेळात रिदम मिळाला... आणि पळण्याचा वेग वाढला... हळूच निलेशला ओव्हरटेक केलं... अडीच किमी वळणावर निलेशने मला गाठलं... तेथे केळ आणि पाणी घेतलं... 

आता चढाकडे धावणे सुरू झाले... बऱ्यापैकी उजाडले होते... त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या माणसांची वर्दळ तसेच  गाड्यांची रहदारी वाढली होती... चढावर धावण्याचा वेग बऱ्यापैकी कमी झाला होता... परंतु एका रिदमने  धावल्यामुळे दम लागत नव्हता...  बरोबर सव्वा तासात पाच किमी धावणे पूर्ण झाले होते...


पाठोपाठ निलेश ही आला... नवनीतने तर एका तासाच्या आतच मॅरेथॉन पूर्ण केली होती...

मेडल मिळाले... सोबत उपिट सह कांदापोहे आणि चहाची न्याहरी मिळाली... फोटो सेशन पाठोपाठ रिलॅक्ससाठी झुम्बा सुरू झाला...  पंधरा वीस मिनिटे अक्षरश: नाचलो...  झुंबा प्रकार एकदम भावला...  

या मॅरेथॉनचे गोड फलित म्हणजे... सातारा, इंदापूर, सांगलीच्या धावपटूंच्या ओळखी होणे... विशेष म्हणजे त्यातील बरेच धावपटू सायकलिस्ट पण होते... सायकल सोबत क्रॉस ट्रेनिंग म्हणून सुरू केलेले मॅरेथॉन धावणे अगणित आनंददायी होते... एक नवा अध्याय सुरू झाला आहे... मित्रांच्या संगतीने...

मंगल हो... !!!