दिंडीगड राईड
२६ जुलै २०२०
सकाळी पावणे पाच वाजता सायकल राईड सुरू झाली. बरोबर पाच वाजता दादरच्या प्रीतम हॉटेल जवळ विजय तयारच होता. सायकलच्या हँडलला लावलेला हाय पॉवर हेड लाईट आणि हेल्मेटला लावलेला लाल ब्लिन्कर लाईट चालू केला. सकाळच्या पावसाळी वातावरणात नवीनच घेतलेला हेड लाईट अतिशय प्रखर उजेड रस्त्यावर टाकत होता. आम्ही दोघेही सर्व सेफ्टीगियरसह सज्ज होतो.
आज दिंडीगड सायकल राईड करायची होती. विशेष म्हणजे आजच्या राईडचे प्लॅनिंग चिरागने केले होते. पंधरा दिवसापूर्वी समर्पयामीचे दहा शिलेदार याच दिंडीगड सायकल सफरीवर जाऊन आले होते. त्यांचे फोटो पाहिल्यावर आपण ही राईड नक्कीच करायची हे आझाद पंछी सदस्यांना वाटतच होते आणि त्याला मूर्तरूप चिरागने दिले होते.
कालच खास निलेश शिंदेच्या समवेत घोडबंदर फाउंटन हॉटेल राईड केली होती. तेव्हाच चिरागने आजच्या राईडचे शिक्कामोर्तब केले होते.
दादरवरून सकाळी पाच वाजता, ब्रम्हमुहूर्तावर राईड सुरू झाली होती. रात्री पाऊस पडून गेला होता, त्यामुळे रस्ता ओलसर होता. अतिशय आल्हाददायक आणि अंमळ शांतनिवांत वातावरण होते. सुंदर गुलाबी वारे सुटले होते. विजयची साथ असली की सायकलिंग साठी एक रिदम असतो. कधी तो पुढे कधी मी पुढे, अशी जुगलबंदी आम्हा दोघांत चालली होती. एका विशिष्ट वेगाने आम्ही सायकलिंग करत होतो.
सायन रुग्णालयाजवळ अद्ययावत शौचालय दिसले. खास महिलांसाठी शौचालय आहे हे वाचून खूप आनंद झाला.
पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळी उड्डाणपुलावर पोहीचलो आणि सूर्यनारायणाची प्रभा, तांबूस सोनेरी रंग उधळत नभांगणात अवतीर्ण झाली होती.
जसे की, भास्कराच्या आगमनाची दवंडी पिटत होती. ह्या सोनेरी रंगाचा मुकुट रुपेरी ढगांनी परिधान केला होता. रस्त्याच्या एका बाजूला हिरव्यागार झाडांना झाकून टाकणाऱ्या जाळीदार वेली आणि दुसऱ्या बाजूला मऊ मुलायम गवताचा हिरव्या रंगाचा घनदाट गालिचा पसरला होता. सकाळ सकाळीच पाखरांची इकडून तिकडे उडण्याची लगबग आणि किलबिल निसर्गाच्या मनमोहक रंगांना संगीताचा साज चढवत होता.
खरोखरच... निसर्गाचे हे विराट रूप पाहताना हरखून जायला होते. जाणीव होते, "देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी". निसर्गाच्या या विश्वात रममाण झाल्यावर सायकलिंग म्हणजे आनंदाचा झोका असतो. तेथे दमछाकीला थारा नसतो
तासाभरातच सकाळी सहा वाजता मुलुंड चेक नाक्यावर पोहोचलो. विजय सोबत आज पंचवीस किमीची भन्नाट सायकलिंग झाली होती.
विजयने आजच्या राईडसाठी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. त्याची सुट्टी घेण्याची कल्पना एकदम फर्मास होती. आम्ही मुलुंडला हायड्रेशन ब्रेक घेतला तेव्हा विजयने आपल्या साहेबाला, 'मी आज रजेवर आहे' हे सांगितले.
आता भूक लागली होती. विजयने फर्मास साजूक तुपाचा शिरा बनवून आणला होता. टोलनाक्या जवळील बाकड्यावर बसून शिरा फस्त केला. चिराग इतर सदस्यांबरोबर साडेसहा वाजता तीन हात नाक्यावर येणार होता, त्यामुळे पंधरा मिनिटात पुढची राईड सुरू केली.
टोल नाका पार करण्याअगोदरच सायकलच्या मागच्या चाकातून खर्र खर्र आवाज येऊ लागला. मी सायकलला ओढतोय असे जाणवले. सायकल थांबवून मागचे चाक फिरवले तर ते वेडेवाकडे फिरत होते. तारा तपासल्या. चार पाच तारा तुटल्याचे लक्षात आले. तातडीने मयुरेश आणि आदित्यला फोन लावले. त्यांचे फोन लागले नाहीत. मग हिरेनला फोन लावला. त्याने सायकल येऊरला घेऊन यायला सांगितले.
बऱ्याच तारा तुटल्यामुळे अतीशय सावधगिरीने आणि संथगतीने ठाण्याकडे निघालो. तीन हात नाक्यावर पोहोचायला दहा मिनिटे उशीर झाला. तेथे चिराग, प्रशांत, अतुल, प्रिन्स यांची भेट झाली. तेवढ्यात राजेशचा फोन आला, पावणे सात वाजता तो खारेगाव टोल प्लाझाला उभा राहणार होता.
सायकलचे काम केल्याशिवाय मला दिंडीगडला जाणे शक्य नव्हते. अतुलने फोनाफोनीला सुरुवात केली. यशवंत जाधव माझ्यासाठी सायकल घेऊन यायला तयार झाले. अतुलने आणखी एका मित्राला फोन केला. इतक्यात काका उर्फ आदित्य देवासारखा हजर झाला. आदित्य म्हणजे सर्व अडचणीचे उपाय असणारा सायकलचा डॉक्टर आहे. त्याने सायकलची अवस्था पाहिली आणि हिरेनला फोन करून एक स्टँड बाय चाक आणायला सांगितले.
इतक्यात यशवंत जाधव यांचे सुद्धा आगमन झाले. चिराग, प्रशांत आणि प्रिन्सला डॉ राजेशच्या भेटीला खारेगाव टोल नाक्याकडे पाठवले. सायकलचे चाक रिपेअर करून मी, विजय आणि अतुल त्यांना जॉईन होणार होतो. वर्तकनगर जवळ हिरेन स्टँडबाय चाक घेऊन आला. आदित्यने ताबडतोब चाक बदलले आणि सायकल तयार झाली.
आता आदित्य काका, यशवंत जाधव सुद्धा दिंडीगड राईडला तयार झाले. आदित्य येतोय याचा सर्वात जास्त आनंद मला झाला. अतुलने सर्वांसाठी केळी घेतली. अतुल, राजेश, प्रशांत आणि प्रिन्स टोल नाक्यावरून पुढे निघाले होते. माझ्यासह विजय आणि यशवंतने सायकलिंग सुरू केली. कॅडबरी जंक्शन जवळ अतुल आणि आदित्य; सिद्धार्थ येणार म्हणून त्याची वाट पाहत थांबले.
खारेगाव टोल नाका पार करून अंजुर फाट्याकडून पाईप लाईनच्या आत आम्ही शिरलो. येथून सोनाले फाट्यापर्यंत सोळा किमी राईड करायची होती. पाईप लाईनचा रस्ता जणू काही आम्हा सायकलिस्ट साठीच मोकळा होता. दोन्ही बाजूला पाण्याचे भलेमोठे पाईप आणि मध्ये छोटा रस्ता. पाईपच्या पायथ्याला हिरवी खुरटी गवताळ झाडे वाऱ्यावर डोलत होती. ओवाळे फाट्याजवळ मागून येणारे आदित्य, अतुल आणि सिध्दार्थ यांची भेट झाली.
अजून दहा किमी राईड करायची होती. आम्ही सहाजण भराभर पेडलिंग करत सोनाळे गावाकडे निघालो. या पाईप लाईनच्या उजव्या बाजूला मुंबई नाशिक हायवे आहे, तर डाव्या बाजूला मोठी मोठी वेअर हाऊसेस आहेत. इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या जमिनी मोठ्या मोठ्या कंपन्यांना विकून ह्या या वेअर हाऊसेसची निर्मिती केली आहे. हा सर्व परिसर ड्रायपोर्ट म्हणूनच आता उदयाला आला आहे.
पुन्हा आम्ही सर्व पाईपलाईन मधून मार्गक्रमण करू लागलो. या पाईप लाइनचे एक वैशिष्ट्य आहे. त्या अजस्त्र पाईप कडून दूरवर पाहिलं की दोन्ही पाईप एकमेकांना मिळाल्याचे दिसतात आणि मधला रस्ता नाहीसा होतो. हे तर मृगजळासारखे असते. एक सुसाट अनुभव गाठीला आला होता. आदित्य आज जॉईन झाल्यामुळे आजची सफर भन्नाट आणि जबरदस्त होणार याची मला खात्री झाली होती.
मुंबई महापालिका या पाईपचा अतिशय चांगला मेंटेनन्स ठेवते. त्यामुळे जागोजागी पाईपच्या रंगरंगोटीची खबरदारी घेतलेली दिसत होती. तसेच या रस्त्यात कुठेही अतिक्रमण झालेले नव्हते.
साडेनऊ वाजता आम्ही सोनाळे फाट्यावर पोहोचलो वाटेत राजेश आम्हाला रिसिव्ह करायला सायकलिंग करत आला होता. राजेशने वजन खूपच कमी केले आहे. सोनाळे फाट्यावर गरमागरम वडापाव आणि अतुलने आणलेली केळी हादडली.
सोनाळे गावात लोकवस्तीपेक्षा कारखानेच दिसत होते. आदित्य काकाने दिंडीगड चढताना काय काय काळजी घ्यायची याची सविस्तर माहिती सर्वांना दिली.
काका म्हणाला, 'काही ठिकाणी एक बाय एक गियर सुद्धा जास्त वाटेल, त्यामुळे दोघांमध्ये योग्य अंतर ठेवा, चिंचोळा रस्ता आणि अतिशय उंच चढाई असल्यामुळे झिकझाक सायकल चालावा. एखाद्याला थांबायचे असेल तर रस्त्याच्या किनाऱ्याला थांबा. मागून येणाऱ्याला वाट द्या'.
सोनाळे गावातून दिडेश्वर महादेव मंदिर फाट्यावरून उंच चढाई सुरू झाली. तीन किमी चढाई होती. आदित्य, राजेश, चिराग, प्रिन्स पुढे सरकले. माझ्या सोबत विजय, अतुल, यशवंत, प्रशांत आणि सिद्धार्थ अतिशय धीम्या गतीने चढाई करत होतो. थोड्याच वेळात अतुल सायकल ढकलायला लागला. माझ्या मागोमाग विजय अतिशय आत्मविश्वासाने घाट चढत होता. दहा वाजून गेल्यामुळे सूर्याचा पारा चढला होता. पंधरा वीस मिनिटातच मी नाका ऐवजी तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात केली. आता हायड्रेशन ब्रेक घेणे गरजेचे होते.
माझ्या पुढे यशवंत, प्रशांत आणि सिद्धार्थ होते. पाऊण तासातच त्यांची दमछाक झाली. हळूहळू पुढे सरकताना, यशवंत म्हणाला, 'तुम्ही व्हा पुढे, आम्ही थांबतो इथेच'.
जवळपास पाऊण घाट चढून गेलो होतो. एका झाडाखाली पाणी प्यायला थांबलो. पाच मिनिटे विश्रांती घेऊन सायकलला पेडल मारायचा प्रयत्न केला, परंतु तो पॅच एकदम स्टीफ होता. त्यामुळे सायकल ढकलतच तो चढ चढावा लागला. पुढे थोडा प्लेन रस्ता आल्यावर पुन्हा पेडलिंग सुरू केले. शेवटचा शंभर फुटाचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होता. तसेच पावसामुळे तेथे शेवाळ जमलेले होते. तो पॅच पुन्हा सायकल ढकलत चढावा लागला.
आदित्य आणि चिराग पुन्हा खाली गेले आणि यशवंत, प्रशांत, विजय यांना ऊर्जा देऊन, त्यांना सुद्धा वर घेऊन आले. जवळपास दीड तास लागला संपूर्ण चढ पार करायला. आदित्य आणि चिरागची कमाल होती. कोणालाही गिव्ह अप करू दिलं नाही. आदित्यच एकच म्हणणं होतं. वरून दिसणारा अप्रतिम निसर्ग तुम्हाला खालून दिसणार नाही. थोडे आणखी परिश्रम घ्या आणि निसर्गाचा आनंद लुटा.
मंदिराच्या पायथ्याला सर्व सायकली लॉक करून शेवटचा पाचशे फुटाचा ट्रेक सुरू केला. एका उंच टेकाडावर दिंडीगड महादेवाचे मंदीर होते. ओम नमः शिवाय चा घोष सुरू होता. अतिशय पवित्र वातावरणात, निसर्गाचा हिरवागार आविष्कार पाहताना मन अतिशय उल्हसित झाले. चढाचा थकवा क्षणात नाहीसा झाला. चिरागच्या प्रयत्नांना मूर्त रूप मिळाले होते.
आजच्या सायकल सहलीची गम्मत एक होती. सुरुवातीला फक्त पाच सदस्य होते, परंतु ऐनवेळी दहा सदस्य झाले होते. आजच्या नेतृत्वाचा झेंडा आदित्यच्या साथीने चिरागच्या खांद्यावर होता. त्याने समर्थपणे तो पेलला होता. डॉ राजेशने त्याला स्पेशल थँक्स दिले. देवदर्शन झाले, आता निसर्ग दर्शन होते. राजेशने कल्याण परिसर आणि डोंबिवली परिसर दाखवला. दोन्ही बाजूंनी जाणारी पाईप लाईन पहिली. त्या मध्ये ठाणे खाडीचा तयार झालेला पाचूचा हार पहिला.
त्यातून जाणारी रेल्वे लाईन आणि गर्द हिरवाई, जसेकाही एखाद्या विमानातूनच आमचे निसर्गदर्शन सुरू होते.
आकाशाची अथांग गहिरी निळाई, शुभ्र ढगांच्या पक्ष्यांचा विहार, तजेलदार हिरवीगार झाडे, पायवाटे जवळची हिरवट पोपटी झुडुपे, त्यात हळूच डोकावणारी नाजूक लहानशी पिवळी तृण फुले वाऱ्यावर डोलताना डोळ्यांना सुखावत होती. मंद वाऱ्यासोबत हिरव्यागार पानांची हळुवार चाललेली कुजबुज कानी येत होती.
ती मंद सुरावट मन आनंदित करत होती. झाडांच्या हिरव्या रंगाचा ओला दर्प नाकाला जाणवत होता . वातावरणातील हिरवाई डोळे, नाक, कान याद्वारे मनाला आनंद देत होती. आजूबाजूला बागडणारी असंख्य फुलपाखरे निसर्गाचा आनंद आणि जिवंतपणा साजरा करीत होती. एकमेकांच्या पंखाला पंख लावून या फुलावरून त्या फुलावर त्याचे विहरणे मला बालपणात घेऊन गेले.
फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू ।।
या वेलीवर फुलांबरोबर
गोड किती हसते फुलपाखरू ।।
पंख चिमुकले निळे जांभळे
हालवुनी झुलते फुलपाखरू ।।
डोळे बारिक करिती लुकलुक
गोल मणी जणु ते फुलपाखरू ।।
मी धरू जाता येइ न हाता
दूरच ते उडतें फुलपाखरू ।।
निसर्गाचा मनोरम नजारा मनाच्या गाभाऱ्यात ठासून भरला.
आता परतीची राईड सुरू झाली. पायथ्याला आलो. सर्वांना भूक लागली होती. खाली एका दुकानाजवळ थांबलो. अमूल दूध आणि मिठाईवर ताव मारला.
काका आणि राजेशला महत्वाचे काम असल्यामुळे दोघे तातडीने ठाण्याकडे निघाले. आता आम्ही कल्याण ठाणे हायवे वरूनच परतीची सफर सुरू केली. उन्हाचा पारा चढला होता. तसेच गाड्या, ट्रेलर यांची उदंड रहदारी सायकलचा वेग सीमित करत होती.
ठाणे गाठण्यासाठी दोन ठिकाणी हायड्रेशन ब्रेक घेतला. दुपारचे अडीच वाजले ठाण्यात पोहोचायला. येथून चिराग, प्रशांत, यशवंत, प्रिन्स आणि सिद्धार्थ ठाण्यातच राहत असल्यामुळे जेवायला घरी जाणार होते. परंतु अतुल, विजय आणि मला आणखी तीस किमी राईड करायची होती. त्यामुळे माजीवडे जंक्शन जवळ दुर्गा हॉटेल मधून पार्सल दालखीचडी घेऊन हॉटेलच्या पायरीवर बसून जेवलो.
जेवण झाल्यावर अतुल घोडबंदर मार्गे गोरेगावकडे निघाला, तर मी आणि विजय पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईकडे निघालो. दुपारचे ऊन आणि पोटातले जेवण यामुळे अतिशय धीम्या गतीने आम्ही सायकलिंग सुरू केले. सायंकाळी पाच वाजता सुखरूप घरी पोहोचलो. आज 105 किमी राईड झाली होती.
आजच्या सायकलिंग मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आदित्य आणि चिरागने गृपमध्ये मोटिव्हेशनचे काम केले, त्यामुळेच सर्वजण दिंडीगड टॉपला पोहोचू शकले.
दिंडीगड सायकल राईड हा माईंड गेम होता
आझाद पंछी....