Wednesday, July 29, 2020

दिंडीगड सायकल सफर

दिंडीगड राईड

२६ जुलै २०२०


सकाळी पावणे पाच वाजता सायकल राईड सुरू झाली. बरोबर  पाच वाजता दादरच्या प्रीतम हॉटेल जवळ विजय तयारच होता. सायकलच्या हँडलला लावलेला हाय पॉवर हेड लाईट आणि हेल्मेटला लावलेला लाल ब्लिन्कर लाईट  चालू  केला. सकाळच्या पावसाळी वातावरणात नवीनच घेतलेला  हेड लाईट अतिशय प्रखर उजेड रस्त्यावर टाकत होता. आम्ही दोघेही सर्व सेफ्टीगियरसह सज्ज होतो.

आज दिंडीगड सायकल राईड करायची होती. विशेष म्हणजे आजच्या राईडचे प्लॅनिंग चिरागने केले होते. पंधरा दिवसापूर्वी समर्पयामीचे दहा शिलेदार याच दिंडीगड सायकल सफरीवर जाऊन आले होते. त्यांचे फोटो पाहिल्यावर आपण ही राईड नक्कीच करायची हे आझाद पंछी सदस्यांना वाटतच होते आणि त्याला मूर्तरूप चिरागने दिले होते. 

कालच खास निलेश शिंदेच्या समवेत घोडबंदर फाउंटन हॉटेल राईड केली होती. तेव्हाच चिरागने आजच्या राईडचे शिक्कामोर्तब केले होते.

दादरवरून सकाळी  पाच वाजता, ब्रम्हमुहूर्तावर  राईड सुरू झाली होती. रात्री पाऊस पडून गेला होता, त्यामुळे रस्ता ओलसर होता. अतिशय आल्हाददायक आणि अंमळ शांतनिवांत वातावरण होते.  सुंदर गुलाबी वारे सुटले होते. विजयची साथ असली की सायकलिंग साठी एक रिदम असतो. कधी तो पुढे कधी मी पुढे, अशी जुगलबंदी आम्हा दोघांत चालली होती. एका विशिष्ट वेगाने आम्ही सायकलिंग करत होतो. 

सायन रुग्णालयाजवळ अद्ययावत शौचालय दिसले. खास महिलांसाठी  शौचालय आहे हे वाचून खूप आनंद झाला.

पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळी उड्डाणपुलावर पोहीचलो आणि सूर्यनारायणाची प्रभा, तांबूस सोनेरी रंग उधळत नभांगणात अवतीर्ण झाली होती. 

जसे की,  भास्कराच्या आगमनाची दवंडी पिटत होती. ह्या सोनेरी रंगाचा मुकुट रुपेरी ढगांनी परिधान केला होता. रस्त्याच्या एका बाजूला हिरव्यागार झाडांना झाकून टाकणाऱ्या जाळीदार वेली आणि दुसऱ्या बाजूला  मऊ मुलायम  गवताचा  हिरव्या रंगाचा घनदाट गालिचा  पसरला होता.  सकाळ सकाळीच पाखरांची इकडून तिकडे उडण्याची लगबग आणि किलबिल निसर्गाच्या मनमोहक रंगांना संगीताचा साज चढवत होता.

खरोखरच... निसर्गाचे हे विराट रूप पाहताना हरखून जायला होते. जाणीव होते,  "देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी". निसर्गाच्या या विश्वात रममाण झाल्यावर सायकलिंग म्हणजे आनंदाचा झोका असतो. तेथे दमछाकीला थारा नसतो

तासाभरातच सकाळी सहा वाजता मुलुंड चेक नाक्यावर पोहोचलो. विजय सोबत आज पंचवीस किमीची भन्नाट सायकलिंग झाली होती. 

विजयने आजच्या राईडसाठी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. त्याची सुट्टी घेण्याची कल्पना एकदम फर्मास होती.  आम्ही मुलुंडला हायड्रेशन ब्रेक घेतला तेव्हा विजयने आपल्या साहेबाला,  'मी आज रजेवर आहे'  हे  सांगितले. 

आता भूक लागली होती. विजयने फर्मास साजूक तुपाचा शिरा बनवून आणला होता. टोलनाक्या जवळील बाकड्यावर बसून शिरा फस्त केला. चिराग इतर सदस्यांबरोबर  साडेसहा वाजता तीन हात नाक्यावर येणार होता, त्यामुळे पंधरा मिनिटात  पुढची राईड सुरू केली.

टोल नाका पार करण्याअगोदरच सायकलच्या मागच्या चाकातून खर्र खर्र आवाज येऊ लागला. मी सायकलला ओढतोय असे जाणवले. सायकल थांबवून मागचे चाक फिरवले तर ते वेडेवाकडे फिरत होते. तारा तपासल्या. चार पाच तारा तुटल्याचे लक्षात आले. तातडीने मयुरेश आणि आदित्यला फोन लावले. त्यांचे फोन लागले नाहीत. मग हिरेनला फोन लावला. त्याने सायकल येऊरला घेऊन यायला सांगितले. 

बऱ्याच तारा तुटल्यामुळे अतीशय सावधगिरीने आणि संथगतीने ठाण्याकडे निघालो. तीन हात नाक्यावर पोहोचायला दहा मिनिटे उशीर झाला. तेथे चिराग, प्रशांत, अतुल, प्रिन्स यांची भेट झाली. तेवढ्यात राजेशचा फोन आला, पावणे सात वाजता तो खारेगाव टोल प्लाझाला उभा राहणार होता.

सायकलचे काम केल्याशिवाय मला दिंडीगडला जाणे शक्य नव्हते. अतुलने फोनाफोनीला सुरुवात केली. यशवंत जाधव माझ्यासाठी सायकल घेऊन यायला तयार झाले. अतुलने आणखी एका मित्राला फोन केला. इतक्यात काका उर्फ आदित्य देवासारखा हजर झाला. आदित्य म्हणजे सर्व अडचणीचे उपाय असणारा सायकलचा डॉक्टर आहे. त्याने सायकलची अवस्था पाहिली आणि हिरेनला फोन करून एक स्टँड बाय चाक आणायला सांगितले.

इतक्यात यशवंत जाधव यांचे सुद्धा आगमन झाले. चिराग, प्रशांत आणि प्रिन्सला डॉ राजेशच्या भेटीला खारेगाव टोल नाक्याकडे पाठवले.  सायकलचे चाक रिपेअर करून मी, विजय आणि अतुल त्यांना जॉईन होणार होतो. वर्तकनगर जवळ हिरेन स्टँडबाय चाक घेऊन आला. आदित्यने ताबडतोब चाक बदलले आणि सायकल तयार झाली. 

आता आदित्य काका, यशवंत जाधव सुद्धा दिंडीगड राईडला तयार झाले. आदित्य येतोय याचा सर्वात जास्त आनंद मला झाला. अतुलने सर्वांसाठी केळी घेतली. अतुल, राजेश, प्रशांत आणि प्रिन्स टोल नाक्यावरून पुढे निघाले होते. माझ्यासह विजय आणि यशवंतने सायकलिंग सुरू केली. कॅडबरी जंक्शन जवळ अतुल आणि आदित्य; सिद्धार्थ  येणार म्हणून त्याची वाट पाहत थांबले.

 खारेगाव टोल नाका पार करून अंजुर फाट्याकडून पाईप लाईनच्या आत आम्ही शिरलो. येथून सोनाले फाट्यापर्यंत सोळा किमी राईड करायची होती. पाईप लाईनचा रस्ता जणू काही आम्हा सायकलिस्ट साठीच मोकळा होता. दोन्ही बाजूला पाण्याचे भलेमोठे पाईप आणि मध्ये छोटा रस्ता.  पाईपच्या पायथ्याला हिरवी खुरटी गवताळ झाडे वाऱ्यावर डोलत होती. ओवाळे फाट्याजवळ मागून येणारे आदित्य, अतुल आणि सिध्दार्थ यांची भेट झाली. 

अजून दहा किमी राईड करायची होती.  आम्ही सहाजण भराभर पेडलिंग करत सोनाळे गावाकडे निघालो. या पाईप लाईनच्या उजव्या बाजूला मुंबई नाशिक हायवे आहे, तर डाव्या बाजूला मोठी मोठी वेअर हाऊसेस आहेत. इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या जमिनी मोठ्या मोठ्या कंपन्यांना विकून ह्या या वेअर हाऊसेसची निर्मिती केली आहे. हा सर्व परिसर ड्रायपोर्ट म्हणूनच आता उदयाला आला आहे. 

पुन्हा आम्ही सर्व पाईपलाईन मधून मार्गक्रमण करू लागलो. या पाईप लाइनचे एक वैशिष्ट्य आहे. त्या अजस्त्र पाईप कडून दूरवर पाहिलं की दोन्ही पाईप एकमेकांना मिळाल्याचे दिसतात आणि मधला रस्ता नाहीसा होतो. हे तर मृगजळासारखे असते. एक सुसाट अनुभव गाठीला आला होता. आदित्य आज जॉईन झाल्यामुळे आजची सफर भन्नाट आणि जबरदस्त होणार याची मला खात्री झाली होती. 
मुंबई महापालिका या पाईपचा अतिशय चांगला मेंटेनन्स ठेवते. त्यामुळे जागोजागी पाईपच्या रंगरंगोटीची खबरदारी घेतलेली दिसत होती. तसेच या रस्त्यात कुठेही अतिक्रमण झालेले नव्हते.

साडेनऊ वाजता  आम्ही सोनाळे फाट्यावर पोहोचलो  वाटेत राजेश आम्हाला रिसिव्ह करायला सायकलिंग करत आला होता. राजेशने वजन खूपच कमी केले आहे. सोनाळे फाट्यावर गरमागरम वडापाव आणि अतुलने आणलेली केळी हादडली. 

 सोनाळे गावात लोकवस्तीपेक्षा कारखानेच दिसत होते. आदित्य काकाने दिंडीगड चढताना काय काय काळजी घ्यायची याची सविस्तर माहिती सर्वांना दिली.

काका म्हणाला, 'काही ठिकाणी एक बाय एक गियर सुद्धा जास्त वाटेल, त्यामुळे दोघांमध्ये योग्य अंतर ठेवा, चिंचोळा रस्ता आणि अतिशय उंच चढाई असल्यामुळे झिकझाक सायकल चालावा. एखाद्याला थांबायचे असेल तर रस्त्याच्या किनाऱ्याला थांबा. मागून येणाऱ्याला वाट द्या'.

 सोनाळे गावातून दिडेश्वर महादेव मंदिर फाट्यावरून उंच चढाई सुरू झाली. तीन किमी चढाई होती. आदित्य, राजेश, चिराग, प्रिन्स पुढे सरकले. माझ्या सोबत विजय, अतुल, यशवंत, प्रशांत आणि सिद्धार्थ अतिशय धीम्या गतीने चढाई करत होतो. थोड्याच वेळात अतुल सायकल ढकलायला लागला.  माझ्या मागोमाग विजय अतिशय आत्मविश्वासाने घाट चढत होता. दहा वाजून गेल्यामुळे सूर्याचा पारा चढला होता. पंधरा वीस मिनिटातच मी नाका ऐवजी तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात केली. आता हायड्रेशन ब्रेक घेणे गरजेचे होते. 
 

माझ्या पुढे  यशवंत, प्रशांत आणि सिद्धार्थ होते. पाऊण तासातच त्यांची दमछाक झाली. हळूहळू पुढे सरकताना, यशवंत म्हणाला, 'तुम्ही व्हा पुढे, आम्ही थांबतो इथेच'.

जवळपास पाऊण घाट चढून गेलो होतो.  एका झाडाखाली पाणी प्यायला थांबलो. पाच मिनिटे विश्रांती घेऊन सायकलला पेडल मारायचा प्रयत्न केला, परंतु तो पॅच एकदम स्टीफ होता. त्यामुळे सायकल ढकलतच तो चढ चढावा लागला. पुढे थोडा प्लेन रस्ता आल्यावर पुन्हा पेडलिंग सुरू केले. शेवटचा शंभर फुटाचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होता. तसेच पावसामुळे तेथे शेवाळ जमलेले होते. तो  पॅच पुन्हा सायकल ढकलत चढावा लागला. 

आदित्य आणि चिराग पुन्हा खाली गेले आणि यशवंत,  प्रशांत, विजय यांना ऊर्जा देऊन, त्यांना सुद्धा वर घेऊन आले. जवळपास दीड तास लागला संपूर्ण चढ पार करायला. आदित्य आणि चिरागची कमाल होती.  कोणालाही गिव्ह अप करू दिलं नाही. आदित्यच एकच म्हणणं होतं. वरून दिसणारा अप्रतिम निसर्ग तुम्हाला खालून दिसणार नाही. थोडे आणखी परिश्रम घ्या आणि निसर्गाचा आनंद लुटा. 

मंदिराच्या पायथ्याला सर्व सायकली लॉक करून शेवटचा पाचशे फुटाचा ट्रेक सुरू केला.  एका उंच टेकाडावर दिंडीगड महादेवाचे मंदीर होते. ओम नमः शिवाय चा घोष सुरू होता. अतिशय पवित्र वातावरणात, निसर्गाचा हिरवागार आविष्कार पाहताना मन अतिशय उल्हसित झाले. चढाचा थकवा क्षणात नाहीसा झाला. चिरागच्या प्रयत्नांना मूर्त रूप मिळाले होते.

आजच्या सायकल सहलीची गम्मत एक होती. सुरुवातीला फक्त पाच सदस्य होते, परंतु ऐनवेळी दहा सदस्य झाले होते. आजच्या  नेतृत्वाचा झेंडा आदित्यच्या साथीने चिरागच्या खांद्यावर होता. त्याने समर्थपणे तो पेलला होता. डॉ राजेशने त्याला स्पेशल थँक्स दिले.  देवदर्शन झाले, आता निसर्ग दर्शन होते. राजेशने कल्याण परिसर आणि डोंबिवली परिसर दाखवला. दोन्ही बाजूंनी जाणारी पाईप लाईन पहिली.  त्या मध्ये ठाणे खाडीचा तयार झालेला पाचूचा हार पहिला. 


त्यातून जाणारी रेल्वे लाईन आणि गर्द हिरवाई, जसेकाही एखाद्या विमानातूनच आमचे निसर्गदर्शन सुरू होते.

आकाशाची अथांग गहिरी निळाई, शुभ्र ढगांच्या पक्ष्यांचा विहार, तजेलदार हिरवीगार झाडे, पायवाटे जवळची हिरवट पोपटी झुडुपे, त्यात हळूच डोकावणारी नाजूक लहानशी पिवळी तृण फुले वाऱ्यावर डोलताना डोळ्यांना सुखावत होती. मंद वाऱ्यासोबत हिरव्यागार पानांची हळुवार चाललेली कुजबुज कानी येत होती. 

ती मंद सुरावट मन आनंदित करत होती. झाडांच्या हिरव्या रंगाचा ओला दर्प नाकाला जाणवत होता . वातावरणातील हिरवाई डोळे, नाक, कान याद्वारे मनाला आनंद देत होती. आजूबाजूला बागडणारी असंख्य फुलपाखरे निसर्गाचा आनंद आणि  जिवंतपणा साजरा करीत होती. एकमेकांच्या पंखाला पंख लावून या फुलावरून त्या फुलावर त्याचे विहरणे मला बालपणात घेऊन गेले.

फुलपाखरू  छान किती दिसते,  फुलपाखरू ।।

या वेलीवर फुलांबरोबर

गोड किती हसते फुलपाखरू ।।

पंख चिमुकले निळे जांभळे

हालवुनी झुलते फुलपाखरू ।।

डोळे बारिक करिती लुकलुक

गोल मणी जणु ते फुलपाखरू ।।

मी धरू जाता येइ न हाता

दूरच ते उडतें फुलपाखरू ।।

निसर्गाचा मनोरम नजारा मनाच्या गाभाऱ्यात ठासून भरला. 

आता परतीची राईड सुरू झाली. पायथ्याला आलो. सर्वांना भूक लागली होती. खाली एका दुकानाजवळ थांबलो. अमूल दूध आणि मिठाईवर ताव मारला. 

काका आणि राजेशला महत्वाचे काम असल्यामुळे दोघे तातडीने ठाण्याकडे  निघाले. आता आम्ही कल्याण ठाणे हायवे वरूनच परतीची सफर सुरू केली. उन्हाचा पारा चढला होता. तसेच गाड्या, ट्रेलर यांची उदंड रहदारी सायकलचा वेग सीमित करत होती. 

ठाणे गाठण्यासाठी दोन ठिकाणी हायड्रेशन ब्रेक घेतला. दुपारचे अडीच वाजले ठाण्यात पोहोचायला. येथून चिराग, प्रशांत, यशवंत, प्रिन्स आणि सिद्धार्थ ठाण्यातच राहत असल्यामुळे जेवायला घरी जाणार होते. परंतु अतुल, विजय आणि मला आणखी तीस किमी राईड करायची होती. त्यामुळे माजीवडे जंक्शन जवळ दुर्गा हॉटेल मधून पार्सल दालखीचडी घेऊन हॉटेलच्या पायरीवर बसून जेवलो. 

जेवण झाल्यावर अतुल घोडबंदर मार्गे गोरेगावकडे निघाला, तर मी आणि विजय पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईकडे निघालो.  दुपारचे ऊन आणि पोटातले जेवण यामुळे अतिशय धीम्या गतीने आम्ही सायकलिंग सुरू केले. सायंकाळी पाच वाजता सुखरूप घरी पोहोचलो. आज 105 किमी राईड झाली होती.

आजच्या सायकलिंग मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आदित्य आणि चिरागने गृपमध्ये मोटिव्हेशनचे काम केले, त्यामुळेच सर्वजण दिंडीगड टॉपला पोहोचू शकले.
दिंडीगड सायकल राईड हा माईंड गेम होता

आझाद पंछी....

Friday, July 24, 2020

मनाली-लेह-खारदुंगला सायकलिंग (दिवस पहिला)


*सोलांग व्हॅली*
०८.०७.२०१९

आज सकाळी साडेसात वाजता मनाली जवळच्या  15 माईल्स येथील युथ हॉस्टेल बेस कॅम्प मध्ये प्रवेश केला. गेल्याच वर्षी सायकलिंग सुरू केले आणि  आज मनाली लेह सायकलिंग करण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी करून कॅम्प मध्ये दाखल झालो होतो. यामधे समर्पयामि ग्रुपचा सर्वात मोठा वाटा आहे. मधल्या काळात झालेले वेगवेगळे सायकलिंग ट्रेल, माथेरान, कसारा घाट,  जुन्नर माळशेज घाट आणि खंडाळा घाट सायकलिंग,  हिमालयन जालोरी पास सायकलिंग तसेच पंढरपूर सायकल वारी, या सर्व सायकल सफरीमुळे मनाली ते लेह  सायकलिंगसाठी प्रचंड मनशक्ती ऊर्जा प्राप्त झाली होती.



बेस कॅम्पचा पहिला दिवस  विश्रांतीचा होता.  अतिशय निसर्गरम्य परिसर होता बेस कॅम्पचा. मागे हिमालयाच्या हिरव्यागार पर्वत रांगा होत्या. कॅम्पच्या बाजूने बियास नदी वाहत होती. नदीच्या बाजूलाच हिरवळीवर तंबू ठोकण्यात आले होते. एक तंबू दहा सदस्यांना देण्यात आला होता. आजूबाजूला सफरचंदाची झाडे बहरली होती. सिमेंटच्या जंगलापासून दूर निसर्गात राहण्याचा अनुभव रोमांचकारी होता.


विश्रांतीचा दिवस असल्यामुळे लक्ष्मण नवले, ब्रिजेश सिंग आणि भरत दळवी यांच्या सोबत सोलांग व्हॅली पाहण्याचे ठरविले. कॅम्पमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट घेऊन आम्ही मेनरोड वरील स्पॅन हॉटेल जवळ मनाली बस पकडली. बसमध्ये एक वयस्क तिबेटीयन महिला पुढील सीटवर बसली होती. तिच्या बाजूला बसायला जागा मिळाली. साधारण 80 वर्ष वय असावे तिचे. हातातील जपमाळेचे मणी ओढत मंत्र म्हणत होती. तिच्या परवानगीने मी तिच्यासह सेल्फी काढला. 

तेव्हढ्यात एक रुबाबदार व्यक्ती बस मध्ये चढली. "कुठे निघालात तुम्ही" या त्याच्या मराठीतून विचारलेल्या प्रश्नाने मी आश्चर्य चकित झालो. मी मुंबईकर, पार्ल्याचा डोंगरे, या ठिकाणी मनाली नगरपलिकेसाठी घन कचरा व्यवस्थापनाचे प्रोजेक्ट् राबवतो, डोंगरेने सांगितले. मनालीमध्ये दररोज एक टन प्लास्टिक बॉटलचा कचरा निर्माण होतो  त्याची विल्हेवाट लावण्यासाठी   मनाली शहराच्या जवळच रांगडी येथे थर्मल प्लांट उभारला आहे. ह्या प्लांटचे वैशिट्य की याचे प्रदूषण शून्य टक्के आहे. 1400 सेंटिग्रेडला हा कचरा जाळला जातो. एक मराठी माणूस पर्यावरणावर प्रचंड काम करतो आहे हे पाहून खूप बरं वाटलं.

मनाली बस स्टँडला उतरून सोलांगला जाणाऱ्या बसची चौकशी केली. ती बस दुपारी दीड वाजता होती, म्हणून आम्ही चौघांनी टॅक्सीने सोलांगला जाण्याचे नक्की केले.  बाराशे रुपयात अन्नू ड्रायव्हर तयार झाला. मनाली पासून साधारण चौदा किमी वर सोलांग व्हॅली आहे.

रस्त्याच्या डाव्या बाजूने बियास नदी खळखळाट करत वाहत होती. थोडे अंतर गेल्यावर सीबीएस  शाळा लागली त्या शाळेजवळच मोठी संरक्षक बांधली होती.  बियास नदीला पूर आला तरी शाळेला आणि रस्त्याला कोणतीही हानी होऊ नये या साठी ही संरक्षक भिंत उभारली आहे.  ह्या भिंतीवरून समोरील व्हॅलीचे खूप फोटो काढले. 


पाच किमीवर पाण्याचे नेहरूकुंड लागले. अतिशय थंडगार आणि मिनरल पाण्याचा वाहणारा झरा होता. जवळील बाटल्या पाण्याने भरून घेतल्या तसेच ओंजळीने मनसोक्त पाणी प्यालो.

गाडीत ड्रायव्हर अन्नूची बडबड चालूच होती. येथील घोडेवाले, गाडीवाले, BMX  बाईकवाले तसेच पॅराग्लायडिंग करणारे टुरिस्टना कसे फसवतात याचे किस्से सांगत होता. टुरिस्ट बरोबर सचोटीने वागत नसल्यामुळे बियास नदीला खूप मोठी बाढ येणार असे छातीठोकपणे अन्नू सांगत होता. खरंतर त्याच्या मनातील भडास तो बाहेर काढत होता.

सोलांग टुरिस्ट स्पॉटवर पोहोचल्यावर समोरच पॅराग्लायडिंग सेंटर होते. सर्वात मोठ्या  पॅराग्लायडिंगसाठी गंडोलाने दोन हजार फूट उंचीवर नेत होते.  तेथून साधारण पंधरा मिनिटे आकाशात विहार करून खाली व्हॅलीमध्ये लँडिंग करत होते. अन्नूने सांगितल्या प्रमाणे आम्ही हिमालय डोंगरात दोन किमी अंतरावर असलेल्या अंजनी महादेव मंदिर आणि धबधबा यांना भेट द्यायचे ठरविले. ब्रिजेश ट्रेकिंग करायचे टाळत होता तरी त्याला आम्ही घेऊन गेलो.

सर्वत्र हिरवळ पसरली होती. बाजूने  BMX टॉय जीप टुरिस्टना घेऊन मंदिराकडे चालल्या होत्या.  काही जण पायीसुद्धा चालले होते. अर्ध्या तासातच अंजनी महादेव मंदिराकडे पोहोचलो.

एका भल्यामोठ्या चौथऱ्यावर विशाल शिवलिंग होते आणि  डोंगराच्या उंच कपारीतून प्रचंड पाण्याचा धबधबा त्या शिवलिंगावर पडत होता. त्याचे थंडगार तुषार आसमंतात पसरले होते. या तुषारांमुळे मन उल्हासित झाले.  

समोरच्या हिरव्यागार टेकडी वरून पाण्याचा पांढराशुभ्र  ओढा खाली वाहत होता. निळ्याभोर नभातील शुभ्र ढगांची प्रतिमाच जलधारा होऊन सुरूंच्या डोंगरातून खाली कोसळत होती. तो पांढराशुभ्र जलप्रपात हिरव्या  धरणीवर कोसळताना खळखळत वाहणारे पाणी  आसमंतात अवखळ नाद निर्माण करत होते.


आसमंती निळ्या निळ्या
धवल पहा या मेघमाला

हिरव्या गर्द पाचू राशी
हिऱ्यामोत्याची त्यावर नक्षी 

जल प्रपात अति अधिर
अलींगनास ते भूशीर

रम्य निसर्ग हा मनोहारी
किमयाच  आहे ही भारी

उन्हाळातल्या  ऊन झळांनी
तप्त जाहले सगळे डोंगर

पावसातल्या  टपोर थेंबानी
शांत कसे ते झाले सत्वर

मऊ मखमली हिरव्या शाली
डोंगर माथी  लेवून सजली 

पायवाटांची  साद हळुवार
त्यास देऊनी प्रतिसाद सत्वर

घेतली बळे ही धाव पहा
आनंद सभोवार अहा अहा !!!

सोलांग व्हॅलीचा मनमुराद आस्वाद घेत, आनंदाच्या जल तुषारांवर तरंगतच बेस कॅम्पकडे परतलो.

सतीश विष्णू जाधव

Thursday, July 23, 2020

पवई सायकल राईड

*पवई सायकल राईड*

सकाळी सहा वाजता सायकलवर टांग मारली आणि निघाली स्वारी निसर्गाकडे. सकाळी बायकोने विचारले, 'कुठे आजची राईड'  म्हणालो, 'माहीत नाही'.

खरं तर आज निसर्गात राईड करायची एव्हढेच ठरविले होते. कुठे जायचे तर मन नेईल तिकडे, हा एकच विचार. 

सेनापती बापट मार्गावरून दादरकडे निघलो आणि पाऊस सुरू झाला. दादर स्टेशन जवळचा केशवसुत पूल ओलांडला. समोर भाज्यांच्या टेम्पो आणि ट्रकची तुडुंब गर्दी होती. अजूनही प्लाझा भाजी मार्केट सुरू न झाल्यामुळे बाहेरगावावरून येणाऱ्या गाड्या रस्त्यावरच भाजीपाल्याची विक्री करत होते. 
पावसाच्या सरीसारखा भाजीपाला ओसंडून वाहत होता. त्यातून वाट काढत माहीम गाठले. माहीमच्या खाडी जवळ पावसाने वाऱ्यासह फेर धरला होता. 

 पाडगावकरांची कविता मनात फेर धरू लागली.

कुरवाळित येतिल मजला  श्रावणांतल्या जलधारा  /
सळसळून भिजलीं पानें  मज करतिल सजल इषारा //

पावसात भिजण्याची मजा काही औरच असते. सकाळच्या मंद प्रकाशात रस्त्यावरच्या पाण्यावर समोरून येणाऱ्या गाडीचे लाईट परावर्तित होतात, तेव्हा पाण्याखालून आणखी एक गाडी चालल्याचा भास होतो.

बांद्राचा पूल ओलांडून पश्चिम द्रुतगती महामार्गावर आलो. येथे रहदारी खूपच वाढली होती. आता पावसासह वाऱ्याचा वेग वाढला होता, त्यामुळे सायकलचा वेग कमी झाला. हायवे रस्त्याच्या डाव्या बाजूने पाण्याचे पाट वाहत होते.  त्यातून सायकल चालविताना पाणी बाजूला उडत होते, परंतु मडगार्ड लावल्यामुळे रस्त्यावरचे पाणी तोंडावर येत नव्हते. बाजूने जोरात जाणाऱ्या गाड्या रस्त्यावरच्या पाण्याचा तिरकस मारा अंगावर करीत होत्या. 

आता नखशिखांत भिजलो होतो. पावसाच्या धारा शरीरावरुन खाली ओघळत होत्या. जसेकी पाण्यात स्पीडबोट चालवतोय. जोगेश्वरीला हायड्रेशन ब्रेक घेतला. विक्रोळी लिंक रोडला सायकल वळवली आणि चढाचा रस्ता सुरू झाला. या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याचा मध्यभाग पत्रे मारून बंद केला आहे.  त्यामुळे चिंचोळ्या रस्त्यावरून सावधपणे सायकल चालवीत होतो. थोड्या वेळातच एका ब्रिजवर आलो.  समोरच पवई तलाव परिसर दिसू लागला. 


आता पाऊस थांबला होता. दोन फोटो काढून पवईच्या मुख्य व्हिव पॉईंटवर आलो. व्हिव पॉईंटचा हिरवागार परिसर तसेच पवई जलाशयाचे शांत पाणी आणि पलीकडे डोंगरमाथा हा निसर्गाचा नयनरम्य नजारा पाहिल्यावर मन मोहरून गेले.

सायकल रेलिंगला लावली. त्या पॉईंट वर मी एकटाच होतो. बसायची पायरी सुद्धा ओलसर होती. सुकामेव्याचा डबा काढला आणि बदाम काजूचा एक एक दाणा खात तो विहंगम निसर्ग मनात साठवू लागलो.


आकाशात विहारणारे काळे सावळे मेघ, तलावा जवळील टेकड्यांचे पाण्यावरील प्रतिबिंब, ते धारण केलेला तलाव ,त्याभोवतीची हिरवी हिरवळ,त्यानंतर दिमाखात उभी सायकल आणि तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा आनंदी भटक्या !!!   हे रेखाचित्र मनात तयार झाले. 

तेथे काढलेले फोटो गृपवर शेअर केले आणि पंधरा मिनिटांनी विक्रोळी हायवेकडे निघालो. येथून विक्रोळीकडे उताराचा रस्ता आहे. त्यामुळे सायकल भन्नाट वेगाने पळू लागली. पूर्व द्रुतगती हायवेला आलो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला निसर्गरम्य हिरवाई दिसू लागली. पश्चिम महामार्गावर दोन्ही बाजूला सिमेंटच जंगल दिसत तर पूर्व महामार्गावर एका बाजूला हिरवाईने नटलेले कांदळवन तर दुसऱ्या बाजूला गच्च हिरवीगार वनराई दिसते. 

येथून मार्गक्रमण करताना कवयित्री शांताबाई शेळकेंची कविता गुणगुणू लागलो.

पावसाच्या धारा, येती झरझरा 
झांकळलें नभ, वाहे सोसाट्याचा वारा

रस्त्यालें ओहळ, जाती खळखळ 
जागोजागीं खाचांमध्यें तुडुंबलें जळ 

ढगांवर वीज, झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज 

झोंबे अंगा वारे, काया थरथरे 
घरट्यांत घुसूनिया बसलीं पांखरें

झाडांची पालवी, चित्ताला मोहवी 
पानोपानीं खुलतसें रंगदार छवी

थांबला पाऊस, उजळे आकाश 
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश 

किरण कोंवळे, भूमीवरी आले 
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुलें

पावसात न्हाली, धरणी हांसली,
देवाजीच्या करणीने, मनी संतोषली !

या कवितेच्या स्वरांचा पाऊस अंगावर घेत निवांत घरी पोहोचलो


सतीश विष्णू जाधव

Saturday, July 18, 2020

ईशावास्योपनिषद

ईशावास्योपनिषद  (भाग  दुसरा)

परमेश्वर सर्वत्र आहे


ईशावास्यमिदम् सर्वम् यत्किञ्च जगत्यां जगत् ।

तेन त्यक्तेन भुञ्जीथा  मा गृधः कस्य स्विद् धनम् ।। 

या श्लोकातील पहिली ओळ अतिशय महत्वाची आहे.

"ईशवास्यमिदम् सर्वम्" "यत्किञ्च जगत्यां जगत्"

म्हणजेच ईश्वराचा वास सर्वत्र आहे. जी सृष्टी निर्माण झाली आहे, तिच्यात तो भरून उरला आहे. त्याच्याविना एक कणही नाही. 

हे सर्व विश्व  ईश्वराचेच असल्यामुळे माझे काहीच नाही.  इतरांकडे असलेले सुद्धा माझे नाही.  हीच भावना सतत मनात असेल तर मनात कोणतेही ताणतणाव निर्माण होत नाहीत. जीवन आहे तसे स्वीकारले की जीवन जगण्याचा आनंद आपण पूर्णपणे घेऊ शकतो. यामुळे आपण  सुखी, समाधानी होतोच आणि इतरांना सुद्धा सुखी करतो.

"यत्किञ्च जगत्यां जगत्"

 हा देव सर्व चराचरात भरलेला आहे, तो कणाकणात, अणुरेणुत आहे.  या जगात किंचितही अशी जागा नाही, जी ईश्वराने व्यापलेली नाही.

'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः

  'जो त्यागतो, जो सोडतो   तो भोगतो' असा या सूत्राचा अर्थ आहे. 

 वाक्य म्हणजे विरोधाभास आहे. तुझ्या वाट्याला जे आले आहे ते तुझे झाले असे समजू नकोस. तुझ्याकडे आहे ते अनासाये आलेले आहे. त्याचा विवेकाने उपभोग घे. याचाच अर्थ तुला आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा निर्लेपपणे उपभोग घे. जे दुसऱ्याकडे आहे त्याचा लोभ ठेऊ नकोस. तुला जे मिळाले ते तुझे झाले असे समजू नकोस. 

कोणत्याही गोष्टीवर ताबा सांगणे सोडून दिले की ती गोष्ट भोगण्यात मजा येते. माझे माझे म्हणतो तेव्हा त्या गोष्टींच्या किमतीचे गणित आपण मांडत बसतो, त्यामुळेच मोकळेपणाने त्या गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही.

तुमच्या वाट्याला आलेल्या सर्व गोष्टींचा भोग घ्या, तुमच्या साठीच आहेत त्या.   परंतु हे सर्व माझेच आहे,  असा भ्रम ठेऊ नका.  प्रकाशमान तेजोमय सूर्य माझ्यासाठीच आहे, हे शक्य आहे काय.

सारे तुमचेच आहे याचाच अर्थ असा असतो की, तुमचे काहीही नाही !

 त्यामुळे  "तेन त्यक्तेन भुञ्जीथाः" या श्लोकात जीवन कसे जगायचे या बद्दल सुद्धा अर्थबोध होतो.

या जगात आपण आहोत तो पर्यंत असे काम करा की जेंव्हा तुम्ही होता त्यापेक्षा आपण जाऊ तेव्हा जग जास्त चांगले झालेले असेल.

आपल्या सहवासात असलेली माणस थोडी जास्त हसायला.. बोलायला लागलेली असावीत. 

आपल्यामुळे त्यांना सुद्धा प्रकाशमान करता आले पाहिजे....  ज्ञानाच्या प्रकाशाने...

आपण कुठलेलंही चांगले काम करत असतो, त्या वेळी कामातला आनंद, यश वाटून घ्यायचे असते.

 प्रेम याचा अर्थच मुळी देण्याची चढाओढ हा आहे.

अशा प्रकारे प्रेम करणारी, देणारी माणसे असतात  ती सूर्य असतात.  आपल्या तेजाने इतरांना सुद्धा प्रकाशमान करतात.
म्हणूनच आपली कामे प्रसन्न मनाने पूर्ण करा, ती कुशलतेने करणे हाच कर्मयोग आहे.

 मा गृधः कस्य स्विद् धनम् 

 दुसऱ्याच्या धन संपत्तीवर कधीही नजर ठेऊ नकोस. हे जग ईश्वराचे आहे, या विश्वात तुला पाठविले आहे ते कर्तव्य करण्याकरिता. दुसऱ्याच्या ऐश्वर्याकडे लक्ष देणे. तसेच दुसऱ्याची वेळ वाया घालविणे चोरी आहे.

 एखाद्याला दिलेल्या वेळेपेक्षा उशिरा भेटणे  अथवा तुमच्यामुळे सभेला दहा मिनिटे उशीर झाला असेल तर,  त्या सभेत उपस्थित असलेले सर्वजण गुणिले दहा मिनिटे, तेवढी मिनिटे उपस्थितच्या आयुष्यातील चोरली आहेत.
 दुसऱ्याचे श्रेय घेणे, मेहनत केल्याशिवाय यश अधिकार घेणे, ही सुद्धा चोरी आहे. 

 जेव्हा माझे माझे करणे, मागत राहणे सोडू त्या दिवशी मनाची शांती, गाढ सुखाची झोप,  आनंद हे सर्व आपल्याकडे धावत येईल. 

हा चराचरात भरून राहिलेला ईश, तुझा माझा आपल्या सर्वांचा स्वामी आहे. त्यानेच आपल्या सर्वांचे आयुष्य एकमेकांत गुंफलेले आहे.

हा श्लोक अहंकारमुक्तीचा आणि चिंतामुक्तीचा मार्ग दाखवितो.

 एक राजा रथामधून जात होता. त्याला एक माणूस डोक्यावर जड ओझे घेऊन जाताना दिसला. राजाला त्याची दया आली. त्याने त्या माणसाला रथात घेतले. तो माणूस  ओझे तसेच डोक्यावर घेऊन रथात बसला. 

राजाने ओझे खाली ठेवण्यास सांगितल्यावर तो म्हणाला 'महाराज, तुम्ही मला रथात घेतले हेच मोठे उपकार आहेत. आता या ओझ्याचे वजन मी रथावर का टाकू?"

"आपली अशीच अवस्था झालेली असते"

 परमेश्वराने आपले ओझे वाहण्याची जबाबदारी घेतली आहे. हे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले तरी ते वाहणारा तोच परमेश्वर आहे. मग हे  चिंतांचे ओझे आपण आपल्या डोक्यावर का घ्यायचे ?



// श्री कृष्णार्पणमस्तु //

Thursday, July 16, 2020

ईशावास्योपनिषद

ईशावास्योपनिषद  (भाग पहिला)

वेद आणि उपनिषद् 


ईशावास्योपनिषद् हे प्रथम आणि श्रेष्ठ उपनिषद् मानले आहे. कर्म व ज्ञान यांचा  समन्वय हा या उपनिषदाचा मुख्य विषय आहे.

 हे उपनिषद कर्मयोग सांगते. 'ईशावास्य' म्हणजेच ईश्वरच सर्व काही आहे. ईश्वर सर्वत्र आहे.  म्हणूनही त्याला 'ईशावास्य उपनिषद' म्हणतात.

माणसाचे जाणतेपण म्हणजेच ऋग्वेद होय. त्यामुळेच ऋग्वेदाची निर्मिती अव्याहत आहे. जे जे पाहिले, ऐकले, त्याचे अनुभवसिद्ध ज्ञान ऋग्वेदातून होते.

 या ज्ञानाचा ठेवा जीवनात कसा उतरवावा आणि सगळीकडे कसा पसरवावा याचे ज्ञान देणारा यजुर्वेद होय.
 
 त्यानंतर मंत्र आणि विचार यांचे स्वरबद्ध, तालबद्ध रूप म्हणजे सामवेद होय.
 
 तसेच आपण अनेक प्रकारची कामे करतो, स्वयंपाक, नोकरी, बागकाम, साफसफाई, विणकाम इत्यादी... ही सर्व कामे कशी  चांगली करता येतील. त्याचे आवश्यक साधनसामुग्री, तंत्रविषयक माहितीचे भांडार म्हणजे अथर्ववेद आहे.
 
परंतु या चार वेदांनी वेद पूर्ण होत नाहीत.
वेदांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पना, विचार, आशंका यांचा मेळ घालताना गुरू शिष्यांमध्ये झालेली चर्चा, संवाद म्हणजे उपनिषदे होय. त्यामुळेच उपनिषदांना वेदांत म्हणतात.

या उपनिषदाच्या प्रारंभी एक प्रार्थना येते.  हा शांतीमंत्र  सर्व उपनिषदांचे सार आहे.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥

ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

ते परब्रम्ह पूर्ण आहे; तसेच हे  इंद्रियगोचर विश्वही पूर्ण आहे. 

पूर्ण असलेल्या परब्रह्मातून पूर्ण असलेल्या विश्वाचा उदय झाला आहे. 

एका पूर्णातून दुसरे पूर्ण काढून घेतल्यानंतर पूर्णच शिल्लक राहाते.

पूर्णातून जे जन्मते ते पूर्णच असते....

जसे की साखर घालून केलेली बर्फी, सरबत, श्रीखंड साखरेचा गोडपणा घेऊनच तयार होते. 

सागराच्या एका थेंबात सुद्धा संपूर्ण सागराचे गुणधर्म सामावलेले असतात. 

पणती असो किंवा मडके त्यातून मातीपण वेगळे करता येत नाही.

तसेच पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्णच शिल्लक राहते...

गंगेतून लोटा भरून घेतला म्हणून गंगा लहान होत नाही.  रिकाम्या पेल्यात आकाश असते, पेला फुटला  की पेल्यात असलेले आकाश अनंतात, आकाशात मिसळून जाते. पेला फुटला म्हणून आकाश फुटत नाही.

तद्वत मनात फुलणारे प्रेम ही अशीच अमर्यादित भावना आहे. प्रेम कोणालाही कितीही दिले तरी अमर्यादितच राहते.  

एका दिव्याने दुसरा दिवा पेटविला तरी पहिल्या दिव्याचा प्रकाश तेवढाच राहतो. 

अथवा आई मुलाला जन्म देते तरी ती आई पूर्ण आईच राहते.

ब्रह्म हे पूर्ण आहे आणि त्यातून निर्माण झालेले  हे विश्व ही पूर्ण आहे.

विश्व नष्ट झाले अथवा अशी अनेक विश्वे निर्माण झाली.  तरी ब्रह्माला काहीच फरक पडणार नाही असा या शांतीमंत्राचा अर्थ आहे. 

या ब्रम्हात अनेक विश्व आहेत, याचा शोध विज्ञानाने घेतला आहे.

वेद आणि उपनिषद् हे मानवी कल्याण आणि मानवी सुख याच्याशी निगडित आहेत.

// श्री कृष्णार्पणमस्तु //

Wednesday, July 15, 2020

माना गावाची कथा

*// माना गावाची कथा //*

मित्रांनो !!!,  
आज तुम्हाला एक गमतीदार कथा सांगणार आहे "माना" गावाची !  खूप जणांनी चारधाम यात्रेतील बद्रीनाथ धाम पाहिले असेलच. या बद्रीनाथ पासून चार किमी अंतरावर आहे माना गाव.

"भारतका आखरी गाव" असे या गावाच्या प्रवेशद्वारावर लिहिले आहे.  

येथून पांडव स्वर्गारोहणासाठी गेले होते. पांडवांना पाहण्यासाठी या गावात सरस्वती नदी अवतीर्ण झाली. तीच्या  प्रचंड मोठ्या रोरावत वाहणाऱ्या  प्रवाहातून  पलीकडे जाणे पांडवांना शक्य नव्हते, त्यामुळे युधिष्ठिराच्या आज्ञेने भीमाने भलीमोठी शिळा या प्रवाहावर टाकली आणि याच शिळेवरून सरस्वती नदी ओलांडली. हीच महाकाय शिळा भीमपूल म्हणून प्रसिद्ध आहे. 

माना गावाच्या वेशीवर भीमपुलाचे दर्शन होते. तसेच पुढे स्वर्गारोहिणीच्या दिशेने सहा किमी गेले की वसूधारा धबधबा लागतो. पांढरे शुभ्र दुधासारखे दवबिंदू जेव्हा अंगावर पडतात तेव्हा मन मोहरून जाते. हवेच्या जोरदार झोताबरोबर हा जलप्रपात अक्षरशः नाचत असतो. 

या गावात एक चहाचे दुकान आहे. येथे सुद्धा भारताचे शेवटचे चहाचे दुकान हा बोर्ड आहे. येथे जरूर चहाचा आस्वाद घ्या.

   व्यास रचित महाभारताचे लिखाण जेव्हा गणपती बाप्पा करत होते त्यावेळी सरस्वतीच्या रोरावत वाहणाऱ्या आवाजामुळे बाप्पाची एकाग्रता भंग पावत होती. गणपतीच्या शापामुळे सरस्वती नदी भीम पुलाजवळच भूमीत लुप्त झाली आहे. त्यामुळे भीम पुलाच्या एका बाजूला सरस्वतीचे रौद्र रूप दिसते तर पुलाच्या दुसऱ्या बाजूला नदीच्या पाण्याचा थेंब सुद्धा दिसत नाही. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी माना गावाला भेट द्यायलाच हवी. 

जवळच व्यास गुंफा आणि गणेश गुंफा आहेत. या गुंफे मागचा डोंगर व्यास पोथी म्हणून प्रसिद्ध आहे. तो डोंगर महाभारताच्या ग्रंथाची पाने असल्याचा भास होतो.

 "महाभारत" व्यास महर्षींनी लिहिले हे सर्वांना माहीत आहे. प्रत्यक्षात, व्यास मुनींना अंतचक्षूंनी महाभारत दिसले, स्फुरले. व्यासांच्या लक्षात आले, ज्या प्रचंड वेगाने आपल्याला महाभारत स्फुरते आहे, त्या वेगाने आपण ते लिहू शकणार नाही, म्हणून ते लिहिण्यासाठी त्यांना लेखनिकाची आवश्यकता होती.

तिन्हीत्रिकाळ भ्रमंती करणाऱ्या नारद मुनींना, व्यास महर्षींनी या बाबत विचारणा केली, " मुनिवर मला महाभारत स्फुरते आहे, ते लिहिण्यासाठी लेखनिक हवा आहे". नारद मुनी म्हणाले, " महर्षी, कुशाग्र बुद्धीचा आणि विद्येची देवता असणारे गणपती बाप्पा यांच्याकडे विचारणा करा".

महर्षी व्यास मुनी गणेशकडे गेले आणि विनंती केली, " गणराया मला प्रचंड वेगाने महाभारत स्फुरत आहे आणि त्याच वेगाने ते लिहायला मला लेखनिकाची आवश्यकता आहे, तुम्ही मदत कराल काय". हे विचारताना व्यासांच्या मनात एक शंका आली, बाप्पाचे मोठे पोट, हत्तीचे तोंड, सावकाश चालणे यामुळे गणपती खरच महाभारत प्रचंड वेगाने लिहू शकेल काय?

बाप्पानी त्यांचे बारीक असलेले डोळे आणखी बारीक केले आणि गालात हसू लागले, अंतचक्षूंनी गणरायांनी व्यासांच्या मनातील शंका जाणली होती. बाप्पा हसत म्हणाले, " महाभारत लिहायला मी लेखनिक म्हणून जरूर तुम्हाला मदत करीन, पण माझी एक अट आहे". मुनिवर म्हणाले, "बोला, काय अट आहे" बाप्पा म्हणाले, " तुम्हाला प्रचंड वेगाने स्फुरणारे महाभारत मी लिहायला तयार आहे, परंतु जो पर्यंत तुम्ही बोलत आहात तो पर्यंत माझी लेखणी चालेल, पण जेव्हा तुमचे बोलणे थांबेल, तेव्हा माझी लेखणी ही थांबेल".

महर्षी व्यास एकदम भानावर आले, त्यांचे बाप्पाच्या लिखाणाबद्दल शंका निरसन तर झालेच, पण स्फुरणारे महाभारत सांगताना मध्ये मध्ये आपल्याला उसंत घ्यावी लागणार आहे, याची जाणीव सुद्धा झाली. मुनिवरांनी थोडावेळ विचार केला आणि खजील होऊन गणपती बाप्पाला नमस्कार केला. महर्षी म्हणाले, "तुमची अट मान्य आहे, पण माझी सुद्धा एक अट आहे " बाप्पांनी होकार दिला. व्यास म्हणाले, "गणेशा, मी महाभारत तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही समजून उमजून लिहायचे आहे". 

गणेशाने ही अट मान्य केली. त्यानंतर व्यास महर्षींनी प्रचंड वेगाने स्फुरणारे महाभारत बाप्पाला सांगायला सुरुवात केली. तसेच त्यांना उसंत मिळण्यासाठी महाभारतात व्यासानीं काही कूट प्रश्न निर्माण केले, ते समजून उमजून घेण्यासाठी गणपती बाप्पाला काही वेळ लागायचा, तेवढा वेळ व्यासांना उसंत मिळायची. अशा प्रकारे व्यासांनी अव्याहतपणे महाभारत सांगितले आणि बाप्पानी ते अखंडितपणे लिहून घेतले. 

असे रचले महाभारत, "व्यासांना स्फुरले आणि गणेशाने लिहिले".

मित्रांनो, आपल्या जीवनात सुद्धा आपण प्रत्येक गोष्ट जर समजून उमजून केली, तर ती अतिशय अचूक होईल आणि ती कधीही आठवावी लागणार नाही. ती गोष्ट आपली अंतर्मनाच्या गाभाऱ्यात कोरली जाईल. 

कोणतीही गोष्ट "समजून उमजून" करणे म्हणजेच वर्तमानात राहुन काम करणे हे आहे.

आजच्या या सुंदर दिवशी चला आपण संकल्प करूया, "मी प्रत्येक गोष्ट समजून उमजून करीन"

सतीश विष्णू जाधव

Tuesday, July 14, 2020

जीवनातली घडी अशीच राहू दे !!!

जीवनातली घडी अशीच राहू दे !!!


                                      अत्यंत चैतन्यमय आणि जीवन दर्शक निसर्गचित्र!!!

ठायी ठायी भरलेली सजीवता दृष्टीस पडते. निळ्या नभात  पांढुरके ढग विहरताना दिसतात.

नभीच्या सूर्य तेजामुळे पाण्याची वाफ होते. हीच वाफ थंड झाल्याने ढग बनून पुन्हा  धरेवर येते. अव्याहतपणे  हे जलचक्र चालू आहे म्हणूनच पृथ्वीवर सजीवता आहे.

ही चक्राकार गती  खूप काही शिकवते. जेव्हढे देऊ तेव्हढे परत येते... आणि त्यामुळेच जगण्याचा आनंद द्विगुणित होतो....

ह्या चित्रात कड्यावरून कोसळणाऱ्या जलधारा दिसतात, तसेच डोंगरावर उंच उभे वृक्षही. ह्याच वृक्षांची मुळे जमिनीत खोलवर जाऊन पाण्याला धरून ठेवतात आणि हा जलसाठा मग झऱ्याच्या रूपाने वाहू लागतो..

वाहताना जमिनीवरील खाच खळगे भरून पाणी पुढे वाट काढते, कड्यावरून खाली उडी मारून मार्गक्रमणा करत राहते.

जीवनाची गती ही अशीच असावी. कितीही अडचणी आल्या तरी मार्ग काढून पुढील वाटचाल करावी.

किती बरं छान शिकवण मिळते आहे या धबधब्याकडून !

जीवनात साहस ही हवेच !!

 कड्यावरून कोसळल्यावर  जलाशयाची निर्मिती किती आनंददायी...

 पुढचा प्रवास ही तितक्याच आनंदाचा !!

भलेही खाचखळग्यातला असूदे, जीवनदायी असाच आहे...

वाटेतल्या झुडुपाचे जीवन त्याच्या तुषारांमुळेच आहे...

हे झुडूप सुध्दा आपल्या जीवनाचे प्रतीक आहे... 

सृष्टीची सृजनता... 

जीवन जगण्यास आवश्यक बाबींची उपल्ब्धता झाली  जीव मूळ धरते...

प्राप्त परिस्थितीत आनंदाने जगायला शिकवीते ...

जीवन हे असेच राहू दे...

स्वतः आनंदाने जगता जगता दुसऱ्याला आनंदाने जगविणारे....

Monday, July 13, 2020

विपश्यना (भाग तीन)

१३.०७.२०२० 

धर्म, निसर्गाचे नियम आणि विपश्यना.



विपश्यना, म्हणजे जे जसे आहे, तसे त्याला पाहणे.

 विपश्यना ही भारतातील अतिप्राचीन ध्यानपद्धतींपैकी एक आहे. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी तिचे पुनरुज्जीवन केले.

या विद्येद्वारे  जीवन जगण्याची कला शिकता येते. 

 या ध्यानपद्धतीचे प्रमुख लक्ष्य  मानसिक अशुद्धता पूर्णपणे काढून टाकणे आणि मुक्तीचा सर्वोच्च आनंद मिळवणे हे आहे. 

विपश्यना ही आत्म-निरीक्षणाद्वारे स्व-परिवर्तन करण्याचा एक मार्ग आहे. याद्वारे मन आणि शरीरामध्ये असलेल्या खोल आंतरिक संबंधावर लक्ष केंद्रित करता येते.

शरीरामध्ये चेतना निर्माण करणाऱ्या भौतिक, शारीरिक संवेदनांवर शिस्तीने लक्ष देऊन विपश्यना अनुभविली जाऊ शकते. स्थितप्रज्ञ राहून स्वनिरीक्षणद्वारे करायचा हा  मनाचा प्रवास आहे. याद्वारे मानसिक अशुद्धता नाहीशी होते व मन प्रेम आणि करुणायुक्त स्थितीमध्ये परिवर्तित होते.

आपले विचार, भावना, निर्णय आणि संवेदना ह्या निसर्ग नियमानुसार चालतात हे स्पष्ट होऊ लागते. प्रत्यक्ष अनुभवाने आपल्याला समजते की, विकार कसे उत्पन्न होतात, बंधने/गाठी कशा बांधल्या  जातात आणि त्यापासून कशी मुक्तता मिळू शकते. जागृतता, भ्रांतीमुक्तता, स्व-नियंत्रण आणि शांतता हे जीवनाचे गुणधर्म बनून जातात.

ही संपूर्ण प्रक्रिया वस्तुत: मनाचा व्यायाम आहे. शरीराच्या व्यायामातून जसे आपण शरीराला सुदृढ ठेवतो, तसेच सुदृढ मन विकसित करण्यासाठी विपश्यनेचा उपयोग होतो.

विपश्यना साधनेचा अभ्यास करताना निसर्गाचे नियम काय आहेत याची जाणीव होते. यालाच धर्म म्हटले आहे. (स्वभावधर्म किंवा गुणधर्म).

मानवास होणारे सुख किंवा दुःख याची निर्मिती आणि त्याचे निराकरण याचा मार्ग विपश्यना साधनेद्वारे अवगत होतो.

 सृष्टीतील प्रत्येक गोष्ट  नित्य परिवर्तनशील आहे, अनित्य आहे. तर  जी नैसर्गिक तत्वे आहेत त्यावर या जगाचे रहाटगाडगे चालल आहे. 

निसर्गातील दृष्य ,अदृश्य सर्व गोष्टी ह्या नैसर्गिक तत्वाने बांधील आहेत आणि मनुष्यप्राणी सुद्धा या नैसर्गिक तत्त्वांचा भाग  असल्यामुळे ही तत्वे  समजून घेऊन जर आपण  आपले आयुष्य जगलो तर आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. 

 विपश्यनेचा अभ्यास करताना  "धर्म"  बाबत एक महत्वाची गोष्ट लक्षात येते.

  धर्म म्हणजेच "निसर्गाचे नियम" (विधिका विधान) होय. ते त्रिकालाबाधित आहेत आणि चिरंतन सत्य आहे.

विपश्यनेचा दररोज सराव केल्यावर आपले मन विकार-रहित होते आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या प्रकृतीवर तसेच  कार्यक्षमतेवरही होतो.

हे निसर्गाचे नियम सर्वांना सारखेच लागू आहेत.  राजा आहे की रंक, गरीब अथवा श्रीमंत, स्त्री असो वा पुरुष, कोणत्याही संप्रदायाचा असो, भारतीय असो की परदेशी, काळा असो की गोरा, या सर्वांवर निसर्ग नियमांची सारखीच हुकूमत आहे.

मग काय आहेत निसर्गाचे नियम, काय आहे धर्म...

धर्म म्हणजे गुणधर्म, स्वभावधर्म...

आगीचा धर्म काय आहे ?....

जळणे आणि जाळणे....

या आगी पासून आपण अन्न शिजवू शकतो किंवा एखाद्याचे घर पण जाळू शकतो. 

आग तिचा धर्म सोडणार नाही.


झाडाचा धर्म काय आहे....

फुले देणे, फळे देणे, शीतलता देणे...

मग त्या झाडाखाली चोर येवो की साव येवो, डाकू येवो की सज्जन येवो; झाड  अव्याहतपणे सर्वांना फुले, फळे आणि शीतलता देण्याचे कार्य करीतच राहते.

झाड त्याचा धर्म सोडत नाही.

माणसाच्या जीवनात हेच निसर्गाचे नियम  कार्यरत आहेत...

क्रिया तशी प्रतिक्रिया....

पेराल तसे उगवेल...

जर आपण एखाद्याला प्रेमाने हसून नमस्कार केला तर त्याची प्रतिक्रिया सुद्धा तशीच असणार आहे, तो सुद्धा तुम्हाला प्रेमाने नमस्कार करील. एखाद्यावर आपण रागावलो तर, तो सुद्धा आपला राग करील. 

विपश्यनेद्वारे ह्या निसर्गाच्या त्रिकालाबाधित सत्याची आपल्याला अनुभूती होते. त्यामुळे प्रत्येक घटनेकडे आपण स्थितप्रज्ञ दृष्टीने, साक्षीभावाने पाहू शकतो. 

आपण लिंबाचे बीज लावले तर त्याच्या झाडाला आंबे येतील काय?  बिलकुल नाही.

त्यामुळे कसले बीज पेरायचे हे आपण ठरवू शकतो.

"शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी"

हा तुकाराम गाथेतील श्लोक हाच निसर्ग नियम सांगतोय.

निसर्गाचे नियम कळले की ते जीवनात उतरविण्याचे काम विपश्यनेच्या अध्ययनाद्वारे करता येते. याच्या चिरंतन अभ्यासाने, अध्ययनाने स्वतःचे जीवन सुखमय, शांतीमय आणि निरामय करता येते.

त्यातून मिळणारा आनंद हा चिरंतन असतो.

 विपश्यना हे जीवनात सुख-शांती प्राप्त करण्यासाठी एक प्रभावशाली तंत्र आहे.


सतीश विष्णू जाधव

Sunday, July 12, 2020

विपश्यना (भाग एक)

विपश्यना 

विपश्यना म्हणजे स्वतःला विशेष रीतीने पाहणे. 

विपश्यना ध्यानाची सुरुवात  "आनापान" द्वारे होते. नाकपुड्यातून आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे मन एकाग्र होते. त्या नंतर ह्या एकाग्र झालेल्या मनाला नाकपुड्याच्या खाली तसेच वरील ओठाच्या वर होणाऱ्या सवेदनांकडे लक्ष देण्याची कामगिरी दिली जाते. हा अभ्यास सतत तीन दिवस केल्यावर चौथ्या दिवशी विपश्यना दिली जाते. 

आनापानाची पुढील पायरी विपश्यना आहे. या मध्ये सूक्ष्म झालेले मन टाळूवर, ब्रम्हरंघ्रावर नेऊन तेथे होणाऱ्या संवेदना मनचक्षुने पहायच्या असतात. त्यानंतर मन संपूर्ण शरीरातील प्रत्येक अवयवावर नेऊन तेथील संवेदना समता भावाने, स्थितप्रज्ञतेने पहायच्या.  सुखद किंवा दुःखद संवेदनावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही.  याद्वारे शरीरात आणि मनात चाललेल्या घडामोडींची अनुभूती होते. ही झाली विपश्यना साधनेची व्यवहार्य बाजू.

विपश्यना एक विद्या आहे, जीच्या नियमित साधनेमूळे आपण शांतीचे निरामय जीवन जगू शकतो. 

अडीच हजार वर्षांपूर्वी "सिद्धार्थ गौतम" याने या विद्येचे पुनरुज्जीवन केले आणि विपश्यना साधना करून वयाच्या 35 व्या वर्षी निर्वाण (अरहत) अवस्था प्राप्त केली. जन्म मरणाच्या भवचक्रातून तो मुक्त झाला, सम्यक संबुद्ध झाला. ही विद्या त्याने पुढील 45 वर्ष सर्व मानव समाजाला वाटली. या कालावधीत हजारोनी निर्वाण अवस्था प्राप्त केली, तर करोडो गृहस्थाश्रमी आणि भिक्षुक, आसक्तीमुक्त आणि क्रोधमुक्त अवस्था प्राप्त करून सुखशांतीचे जीवन जगू लागले.  ह्या विद्येचा प्रसार प्रचार कंबोडिया थायलंड  लाओस श्रीलंका ब्रम्हदेश या पूर्वेकडील देशात सुद्धा झाला. 

त्या पुढील 500 वर्षानंतर ही विद्या भारतातून लुप्त झाली. ब्रह्मदेशात हीच विद्या गुरुशिष्य परंपरेने तिच्या मूळ आणि शुद्ध रुपात टिकून राहिली. ही विद्या भारतात 1969 साली पुन्हा श्री सत्यनारायण गोयंका यांनी आणली आणि आता तिचा प्रचार प्रसार भारतात आणि भारताबाहेर सुद्धा होत आहे.

विपश्यनेचे पाहिले निवासी केंद्र इगतपुरी येथे 1976 साली बांधले गेले. आता भारतात आणि जगभरात मिळून एकूण 185 विपश्यना केंद्र आहेत. लाखो व्यक्तींनी विपश्यनेचा अभ्यास, साधना करून आपले जीवन सुख शांतीमय केले आहे.


आपल्या जीवनात येणाऱ्या जवळपास 99 टक्के व्याधी, आजार;  मनोविकारामुळे (सायको सोमॅटीक आजार) निर्माण होतात. डायबिटीज, रक्तदाब, मायग्रेन, हृदयविकार, अर्धांगवायू, ब्रेन हामरेज इत्यादी सर्व आजार मानसिक ताणतणावामुळे निर्माण होतात. जीवनात ताणतणाव निर्माण होण्याचे मुख्य कारण आसक्ती आणि क्रोध हे आहे. विपश्यना साधनेद्वारे आसक्ती आणि क्रोध या पासून मुक्तता मिळविता येते आणि जीवनात सुख, शांती, समाधान याची प्राप्ती होते. 

स्त्री असो किंवा पुरुष, धनवान असो की गरीब, हिंदू असो की मुस्लीम किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही प्रांताचा असो की कोणत्याही देशाचा असो; प्रत्येकाला सुख, समाधान आणि शांती हवी असते. हे सार्वजनिन त्रिकालाबाधित सत्य आहे.

प्रत्येकाला रात्रीची निवांत झोप हवी असते. पण असे घडते का? याचे मूळ कारण आहे, मानसिक अशांतता आणि ताणतणाव; तसेच आसक्ती आणि क्रोध.   विपश्यना, जीवनात निर्माण होणाऱ्या दुःखातून बाहेर पडण्याची कला शिकवते. त्यामुळे आपण तर सुखी होतोच असेच  आपले कुटुंब, समाज, देश आणि सारे विश्व सुखी होते.

 विपश्यना जीवन जगण्याची कला तर शिकवतेच तसेच मरणाला सुद्धा कसे सामोरे जावे ही मरण मरण्याची कला सुद्धा शिकविते.

विपश्यना " बहुजन हिताय, बहुजन सुखाय" हाच संदेश सर्व विश्वाला देते. निसर्ग नियमांचे पालन आपल्या जीवनात कसे करायचे याचे प्रशिक्षण देते. धर्माचे पालन करणे म्हणजेच निसर्गाचे नियम आपल्या जीवनात उतरविणे. या निसर्ग नियमाच्या विपरीत वागला की ताणतणावाचे दुःख होते तर अनुरूप वागण्यामुळे शांतीचे, समाधानाचे सुख मिळते.

मंगल हो !

सतीश विष्णू जाधव

विपश्यना (भाग दोन)

कर्म सिद्धांत आणि विपश्यना
(संतोष कारखानीस यांच्या ब्लॉग वरून संकलित)


 भगवान गौतम बुद्धांनी या जीवनातील दु:खावर उपाय शोधताना अनेक प्रयोग केले. त्यातून तथागत भगवान बुध्दांना जे ज्ञान झाले त्यात कर्म सिद्धांताला  महत्व आहे. 

भगवान बुद्धांनी याला  'कर्म'  नाव न देता 'संस्कार' (पाली भाषेत 'संखर') असे नाव दिले.
 तथागतांनी  'भवचक्र' ('भव' म्हणजे 'असणे' 'भवचक्र' म्हणजे परत परत जन्म घेणे ) कसे चालते हे सांगताना या संस्कारांची किंवा कर्माची त्यामागे  काय भूमिका असते हे स्पष्ट केले आहे. 
 भगवान बुद्धांचा आग्रह प्रत्यक्ष अनुभूतीवर होता.
 ही अनुभूती मिळविण्यासाठी आणि त्याद्वारे दु:खातून आणि भवचक्रातून सुटका होण्यासाठी बुद्धांनी  विपश्यना (विपस्सना) ध्यानाचा मार्ग सांगितला आहे. विपश्यनेत प्रगती केल्यावर  संस्कार (कर्म) साठविण्याची प्रवृत्ती, तिचा जीवनावर होणारा  परिणाम याची स्पष्ट अनुभूती होते.

विपश्यना ह्या विद्येचे पुनरुज्जीवन भगवान गौतम बुद्धांनी केलं आणि ह्या विद्येच्या मार्गाने जाऊन निर्वाण अवस्था प्राप्त केली.

बुद्धांनी सांगितलेला सिद्धांत अगदी सरळ, सोपा आहे.

आपल्या पाच इंद्रियांना आणि मनाला बाह्य गोष्टीचा स्पर्श होतो. उदा, डोळ्याला काहीतरी दिसते, त्वचेला स्पर्श होतो, कानावर आवाज पडतो, जिभेवर चवीची जाणीव होते, नाकाला वास येतो, मनात विचार येतात. आपली  इंद्रिये ही केवळ ती संवेदना ग्रहण करण्याचे काम करतात.

ही संवेदना  मेंदूपर्यंत पोचल्यावर मेंदूचा एक हिस्सा जागृत होतो आणि त्या संवेदनेचे विश्लेषण करतो. आपल्या पूर्व-स्मृतीतून अशी संवेदना या पूर्वी कधी झाली होती काय हे आठवतो.


ही आठवण झाल्यावर मेंदूचा दुसरा हिस्सा काम करू लागतो आणि ही पूर्वी संवेदना सुखद होती का दु:खद याची चाचपणी करतो. 

यावेळी पूर्वीचे संस्कार (कर्मे) जागृत होतात आणि वेगाने मनाच्या पृष्ठभागावर येऊ लागतात. हे संस्कार सुखद असतील तर संपूर्ण शरीरावर सुखद तरंग अनुभवास येतात, दु:खद असेल तर दु:खद तरंग अनुभवास येतात. सुखद तरंग सुद्धा काही काळच टिकतात. तसेच सुखद तरंगांच्या इच्छेमुळे परत दु:खच वाट्याला येते.

हे संस्कार शरीरावर प्रकट झाल्यावर आपण अनवधानाने प्रतिक्रिया देतो. हे संस्कार आपल्या अंध प्रतिक्रियेमुळे वृद्धिंगत होतात, त्यांना बळ मिळते आणि ते परत अंतर्मनात खोलवर जातात. पुन्हा संधी मिळताच ते उफाळून वर येतात. परंतु प्रतिक्रिया न दिल्यास त्यांची उर्जा संपते (निर्जरा होते) आणि ते नष्ट होतात.

हे संस्कार देहाच्या (रूपस्कंद) पुढील क्षणाला सतत जन्म देतात आणि आपल्याला देहाचे सातत्यीकरण जाणवते.

माणसाच्या मृत्युच्या क्षणी यातील एखादा संस्कार (इच्छा) डोके वर काढते आणि हे संस्कारांचे (पूर्वसंचीत कर्मांचे ) गाठोडे नवीन  शरीराला (रूपस्कंद) जाऊन चिकटते आणि नवा जन्म मिळतो. यालाच भवचक्र म्हणतात.  हा मृत्युच्या क्षणी जागा झालेला संस्कार आपले पुढील आयुष्य ठरवितो.

विपश्यनेत ध्यानात खोलवर गेल्यावर हे पूर्वसंस्कार जागृत कसे होतात आणि आपण नकळत त्याला प्रतिक्रिया करून त्यांचे सामर्थ्य कसे वाढवितो हे स्पष्ट जाणवते. संस्कार जागृत झाल्यावर त्याला प्रतिक्रिया न करणे आपल्या हातात असते. त्यामुळे पूर्वसंस्कार (कर्मे) निर्जरा होऊन नष्ट होतात आणि मानसिक शांतता अनुभवास येते. 

हा वैयक्तिक अनुभव असल्याने त्याचे सामाजीकरण होऊ शकत नाही.

सुखद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पुण्यकर्म म्हणता येईल तर दु:खद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पापकर्म म्हणता येईल. पुण्यकर्म आणि पापकर्म हे एकमेकांना Cancel करीत नाहीत.

 पुण्यकर्म आणि पापकर्म यांना पांढऱ्या आणि काळ्या दगडांची उपमा देता येईल. माणूस या पुण्यकर्म आणि पापकर्म या दगडांनी भरलेली झोळी घेऊन फिरत असतो. काळ्या आणि पांढऱ्या दोन्ही प्रकारच्या दगडांना वजन असते आणि ते नेताना तो माणूस थकून जातो.

विपश्यना ध्यान हे संस्कारांना प्रतिक्रिया न देण्याची प्रक्रिया आहे. त्याचा कोठल्याही देवाशी, परमेश्वराशी संबंध नाही. 

 संस्कार जागृत होतात तेव्हा सावध राहून प्रतिक्रिया न दिल्यास अंतर्मनात दडलेले (अनुशय) संस्कार वेगाने बाह्यमनावर येतात आणि प्रतिक्रिया न दिल्याने त्यांची निर्जरा होते.

ज्यावेळी सर्व कर्मसंस्कार शून्य होतात तेव्हा माणूस कैवल्यावस्थेत / मुक्तावस्थेत / निर्वाण अवस्थेत पोहोचतो. 

तसेच कोठलेही काम करताना मनाच्या समतोल अवस्थेत असलो म्हणजेच,  चांगले/वाईट, हर्ष/दु:ख याच्या पलीकडे जाऊन मन समतोल असेल तर नवी कर्मे निर्माण होत नाहीत. 
विपश्यना ध्यानाच्या सहाय्याने अशा समतोल अवस्थेपर्यंत पोचता येते.
कर्माचा अर्थ बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अनुभवातून समजण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. 

विपश्यनेच्या नियमित साधनेद्वारे स्थितप्रज्ञ अवस्थेत पोहचून, आत्मिक समाधान, शांती प्राप्त करता येते.


सतीश विष्णू जाधव

Saturday, July 11, 2020

भयसापळा आणि मोहसापळा

 भयसापळा आणि मोहसापळा
(संतोष कारखानीस यांच्या ब्लॉग वरून संकलित)

         आपण नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट उलगडा करणारा एक दृष्टांत संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला आहे.


    पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपट आकर्षित होईल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. 
    
जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते.

 खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो.  पण हे "ज्ञान‘ त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेल्या अवस्थेत  राहतो व पकडणाऱ्याच्या हाती सापडतो.  याला  भयसापळा  असे म्हणता येईल.
 "जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते"  व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे.
 "हा आधार गेला तर," अशी भीती असते तेव्हा जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. 
पडायची शक्‍यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही!

----------------------------------------------------------------------------------------

           माकडे पकडायची देखील एक खास पद्धत आहे.

 एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्‍यात एक फळ असते.  माकड ते फळ काढण्यासाठी मडक्‍यात हात घालते. मडक्‍याचे तोंड हे अगदी नेमक्‍या आकाराचे बनविलेले असते;  असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल. पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकतो.

  माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हातही मडक्याबाहेर काढता येत नाही.  निर्णय न घेता येण्याच्या या  अवस्थेत माकड मनाने अडकते व   शरीराने मडक्‍यापाशी.
  
 या सापळ्याला  मोहसापळा असे म्हणता येईल.
 आपले ज्या परिस्थितीत "माकड‘ झाले असेल, त्यात असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये.

 हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा !

थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? 

निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग" नक्कीच मुक्तिदायक नाही काय?

----------------------------------------------------------------------------------------

एक जण कमरेइतक्या पाण्याच्या हौदात  उतरून बराच थयथयाट करतोय.  हातांनी पाणी खळबळवतोय. या हौदानं माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून मी संतापलोय.

 "अरे तू शांत हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ दिसेल व वस्तूही सापडेल !" कोणीतरी समजावत आहे. पण तो  ऐकूनच घ्यायला तयार नाही.

"हौदाचा तळ रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ होता,  हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर तो पाणी फेसाळलेलं ठेवत नसेल?"

---------------------------------------------------------------------------------------

"दमलास?  चल परत जाऊ.

 आज इतकं पुरे. पुन्हा कधीतरी जाता येईलच.

"नाही गुरुजी...  मी दमलोय;  पण आपण इतके वर आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच !  कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय, असं झालंय मला.‘‘

"माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत, जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते सत्य सांगेन‘ असं म्हणालो होतो.‘‘

"होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे...‘‘

"कितीही वर आलो असू !  तरी मी सांगतो म्हणून, हे सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस का नाही ?‘‘

"ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर परत जाऊ या.‘‘

""शाबास ! आता मी तुला ते सत्य सांगतो‘‘.

""पण शिखर न येताच ?‘‘

""तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून !

 ते सत्य हे आहे...  की शिखर असं नाहीच. ही अंतहीन चढण आहे आणि ज्या तळापासून आपण निघालो ना, तेच खरं पोहोचण्याचं स्थान होतं !  
तू उत्तीर्ण झालास. चल आता तिथं जाऊ, जिथं आपण असतोच; फक्त "पोहोचलो" असं वाटत नसतं इतकंच !

----------------------------------------------------------------------------------------

पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा...

माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं...

थयथयाट करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा...

चढणाऱ्यानं एकदा तरी शिखराचा हट्ट सोडून पाहावा...

 हे जमायला अवघड नसतं. पटायला अवघड असतं.

भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.

----------------------------------------------------------------------------------------

माकडें मुठीं धरिलें फुटाणे । 

गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥

काय तो तयाचा लेखावा अन्याय ।

हित नेणे काय आपुलें तें   ॥ध्रु.॥ 


शुकें निळकेशीं गोवियेले पाय । 

विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥


तुका म्हणे एक ऐसे पशुजीव ।

न चले उपाव कांही तेथें ॥३॥ 


वरील तुकोबांच्या गाथेतील अभंगात,  मानवी मनाचे अत्यंत मार्मिक विश्लेषण दिले आहे.

जय जय रामकृष्ण हरी

सतीश जाधव